Sunday 19 February 2017

तिबेट ५

नकाशामधील ईशान्य भारत चुकीच्या रंगात दाखवला आहे. पण कल्पना यावी म्हणून हा नकाशा वापरला आहे.



सोबतचा नकाशा पहा. जसा "शब्देविण संवादु" तसा तिबेटविना चीन म्हणजे आशियामधली एक दुय्यम प्रदेश - देश होऊन बसेल. जग पादाक्रांत करण्याची चीनची महत्वाकांक्षा तिबेत ताब्यात असेल तरच अस्तित्वात येऊ शकते. तिला ’उच्चार’ - ’अस्तित्व’ देण्याचे सामर्थ्य असलेला एकमेव प्रदेश म्हणजे तिबेट. तिबेट चीनच्या ताब्यात नसेल तर चीनचा पुरातन रेशीम मार्गावर (Silk Route) वर्चस्व मिळवण्याचा - एक प्रदेश एक रस्ता (OBOR) - स्थापित करण्याचा मनसुबा म्हणजे मनातले मांडे होऊन बसतील. तिबेट हातात नसेल तर पाकिस्तानशी चुंबाचुंबी करण्याचे प्रयोजन चीनला उरणार नाही. सबब भारताचे आणि चीनचे वैर निदान पाकिस्तानच्या रस्त्याने गेले नसते. तिबेट आहे म्हणून - भले कितीही दुर्गम आणि खडतर का असेना -- तिथून खुश्कीचा मार्ग काढून ग्वदर बंदरा पर्यंतच नव्हे तर मध्य आशियापर्यंत पोहोचण्याचा मार्ग चीनला मिळू शकतो. तिबेट नसेल तर आशियाच्या पूर्वेला कोपर्‍यात पडलेला एक देश म्हणजे चीन एवढीच त्याची ओळख उरेल. आणि .... आणि तिबेट नसेल तर भारत किंवा रशियासारखे देश लश्करी दृष्ट्या थेट चीनच्या सीमेला भिडू शकले असते. तिबेट हाती आहे म्हणून चीनने आपली सीमा भारताच्या डोक्यापर्यंत आणून ठेवली आहे. तिबेट हे जेव्हा स्वतंत्र राष्ट्र होते आणि ते तसेच राहिले असते तर भारताची उत्तर सीमा शांत राहिली असती. तिबेटासारखा भारताचा शेजारी म्हणजे अमेरिका व कॅनडा यांच्यासारखे सौहार्दाचे संबंध असे चित्र उभे राहिले असते. तिबेट कधीही भारताच स्पर्धक नव्हता. सांस्कृतिक दृष्ट्या तर दोघांमध्ये आपुलकीचे संबंध राहिले आहेत. हिंदू धर्मातून उगम पावलेला बौद्ध धर्म तिबेटने अंगिकारला आहे. म्हणून धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या भारत आणि तिबेट यांच्यामध्ये चीन आणि तिबेट पेक्षाही जास्त घनिष्ठ संबंध आहेत. आर्थिक आणि लश्करी दृष्ट्या वरचढ असूनही कोणत्याही भारतीय सम्राटाने तिबेटवर कधी आक्रमण केले नाही. तिबेट हे राष्ट्र स्वतंत्र असते तर भारत चीन युद्ध कधी झालेच नसते. आणि भारत ह्या देशाची शकले उडालेली असती तर तिबेटसकट किंवा शिवाय चीनला केवळ आशियामध्ये नव्हे तर जगामध्ये रोखू शकेल अशी शक्ती कोणत्या देशात उरली असती? तिबेटचे हे महत्व चाणाक्ष ब्रिटिश जाणून होते. रशियनांना आणि चिन्यांना तिबेटपासून चार हात लांब ठेवण्यासाठी लश्कराचा वापर करत तर कधी डिप्लोमसी वापरत ब्रिटिशांनी हे शिवधनुष्य पेलले होते. चीनची जनता आणि तिचे राज्यकर्ते कसे विचार करतात आणि त्यांचे मनसुबे आणि मनोरथ काय आहेत याची इत्थंभूत माहिती ब्रिटिशांनी आपल्या हेरगिरीच्या जाळ्यामधून गोळा केलेली होती. ठकासी असावे ठक ह्या सूत्राने ब्रिटिशांनी चीनला यथास्थित नियंत्रणामध्ये ठेवले होते. भारत स्वतंत्र झाला तेव्हा त्याचे लश्कर ब्रिटिश पठडीमध्ये उभारलेले असल्यामुळे चीनविषयक योग्य आणि स्पष्ट कल्पना आपल्या लश्करप्रमुखांकडे होती. पण स्वतंत्र भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू मात्र नोबेल पुरस्काराचे वेडाने पछाडलेले होते. ब्रिटिश असतानाही चीनविषयक गुप्तहेरांच्या जाळ्यामधून येणारी माहिती नेहरूंच्या डोळ्याखालून जात नव्हती असे फक्त मूर्ख इसमच म्हणू शकतो. थोडक्यात चीनने आक्रमण करून तिबेट घशात घातला तेव्हा कास्तीत जास्त ओरडा खरे तर भारताने करायला हवा होता. पण छे. आम्ही मूग गिळून बसलो. इतकेच नव्हे तर चिनी आक्रमणाचा विषय युनोपुढे नेण्याची तयारी करणार्‍या तिबेटी सरकारला तसे करण्यापासून नेहरूंनी रोखले ही बाब कागदोपत्री दडलेली आहे. चीनचा धोका लक्षात घेऊन आपल्या लश्कराची ताकत वाढवणे गरजेचे होते. पण त्याकडेही लक्ष दिले नाही. पुढे तिबेट पचल्यावर धार्ष्ट्य आणि मग्रूरी वाढलेल्या चीनने आमच्यावरच आक्रमण केले. अक्साई चीन आणि तत्कालीन नेफा प्रांतातील तवांग मध्ये चिनी सैन्य घुसले आणि त्याने भारताकडून महत्वाचा प्रदेश हिसकावून घेतला. तरी आम्ही गप्प. चीनने आक्रमण केले तेव्हा भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये तिबेटसंबंधाने संयुक्त मोहिम चालू होती. पण नेहरूंनी तुमचे सैन्य मदतीला पाठवा म्हणून अमेरिकेला विनंती केली नाही. ऐन बर्फाच्या आणि उणे तपमानाच्या प्रदेशामध्ये भारतीय सैनिक अंगात साधे कपडे आणि साधे चामड्याचे बूट घालून रक्षणासाठी पाठवण्यात आले. परिणाम अर्थातच पराभवात झाला. तरीदेखील सुरुवातीच्या आश्चर्याच्या धक्क्यातून सावरलेल्या सैन्याने पुनश्च जुळवाजुळव केली होती आणि चीनला टक्कर देण्याची तयारी केली होती असे दिसते. पण तोपर्यंत चीनने तवांग मधून माघार घेतली होती.
स्वाती तोरसेकर


No comments:

Post a Comment