Tuesday 29 May 2018

उत्तर कोरिया ५

File:Kim Tu-bong.png


(वर्कर्स पार्टी ऑफ नॉर्थ कोरियाचे नामधारी अध्यक्ष आणि हानगुल भाषेचे तज्ञ किम तु बॉन्ग - किम इल सॉन्ग ने ह्यांची १९५७ मध्ये हकालपट्टी केली)


उत्तर कोरियामधील परिस्थिती रशियनांनी तीन टप्प्यांमध्ये नियंत्रित केली होती. पहिला टप्पा होता - ऑगस्ट १९४५ ते जानेवारी १९४६ चा. कोरियामधील स्थानिक मान्यवरांनी रशियनांशी सहकार्याची भूमिका घेतली होती. रशियनांनी आयोजित केलेल्या लोकसमित्यांमध्ये अशा मान्यवरांना सामावून घेण्यात आले. ह्या काळामध्ये रशियनांनी जाणीवपूर्वक किम इल सॉन्ग आणि त्याच्या सोव्हिएत कोरियनांना दूर ठेवले होते. लोकसमित्यांमध्ये जसे कोरियन कम्युनिस्ट होते तसेच डावे-राष्ट्रवादी विचाराचे सदस्यही सामिल होते. हे डावे रशियामध्ये कधी गेलेले नव्हते पण स्थानिक जनतेमध्ये त्यांच्या कामामुळे त्यांना स्थान व प्रतिष्ठा मिळाली होती. परंतु ही मंडळी रशियनांना कोरियामध्ये कम्युनिस्ट राजवट स्थापण्यासाठी मनापासून मदत करत होती. रशियनांनी त्यांना आणि सोव्हिएत कोरियनांना कधी एकत्र येऊ दिले नाही. सोव्हिएत कोरियन त्यांच्यामध्ये मिसळत नसत. मनापासून मदत करणरे असले तरी रशियनांना ही मंडळी नको होती कारण रशियन सांगतील तसे ते वागतील ह्याची हमी नव्हती. रशियनांनी त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्यातल्या उणिवा टिपल्या. या ना मार्गाने त्यांच्यामध्ये भांडणे लावून दिली. रशियन स्वतः नामानिराळे राह्त. ही बुद्धिवादी मंडळी असे समजत होती की आपल्यामध्ये खरोखरीचे मतभेद आहेत. अशा तर्‍हेने हे गट स्वतःहून स्वतःला विनाशाकडे नेत होते. त्यांनी सदस्यत्व सोडले की त्यांची जागा हळूहळू सोव्हिएत कोरियनांना दिली जात होती. अजून राष्ट्रवादी सदस्यांना रशियनांनी हात लावला नव्हता. 

दुसरा टप्पा सुरु झाला फ़ेब्रुवारी १९४६ मध्ये - हा १९४८ पर्यंत चालू होता. याही काळामध्ये सोव्हिएत घटक बोगस आघाडीच्या नावाने राजकारण करत त्याच्या बुरख्या आड लपले होते. स्थानिक जनतेचा विश्वास प्राप्त करायचा तर हे करणे भाग होते. रशियनांना स्थानिक कोरियन कम्युनिस्ट सत्तेमध्ये भागिदार म्हणून नकोच होते. कारण त्यांची निष्ठा युरोपियन कम्युनिस्टांकडे होती. ते रशियाला फारसे मानत नसत. तसेच कोरियाचे नियंत्रण उत्तरेकडून नव्हे तर दक्षिणेकडून (सोल शहरातून) व्हावे असे त्यांना वाटत होते. ह्यांची हकालपट्टी नजरेत येणार नाही अशा बेताने केली जात होती.  त्यासाठी सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या पीपल्स कमिटी रद्द अरण्यात आल्या आणि त्या ऐवजी नॉर्थ कोरियन प्रोव्हिजनल पीपल्स कमिटीची स्थापना झाली. ह्यामध्ये विविध् गट सामावून घेतले होते पण त्याचे नेतृत्व किम इल सॉन्गकडे दिले गेले होते आणि पूर्ण नियंत्रण रशियाच्या हाती होते. लोकशाही सुधारणा असा कार्यक्रम हाती घेऊन ही कमिटी काम करू लागली. समाजामधल्या सर्व टोकाच्या मंडळींनी त्यामध्ये सामिल व्हावे म्हणून प्रयत्न करण्यात आले. खरे म्हणजे रशियनांना अशा व्यक्तींची गरज नव्हती पण त्यानिमित्ताने आपले राजकीय विरोधक कोण असू शकतात ही माहिती त्यांच्या आयतीच हाती पडण्याची सोय झाली होती. रशियनांची गुप्त हेर व्यवस्था अशांना हेरून त्यांचा बंदोबस्त परस्पर आवाज न करता करून टाकत होती. ह्याच काळामध्ये किम इल सॉन्गने स्वतःला राष्ट्रवादी भूमिकेच्या साच्यात बसवण्याचे काम केले त्यामुळे देशामध्ये किम इल सॉन्ग एक लोकप्रिय राष्ट्रनिष्ठ नेता म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे सोव्हिएत कोरियन सहकारी सरकारी यंत्रणेमध्ये आपला जम बसवत होते. अजूनही रशियन्स पडद्या आड राहून नियंत्रण ठेवत होते. सुरक्षेच्या नावाखाली रशियन फौजांनी अनेक एतद् देशीय लढाऊ आणि बंडखोर गट संपवून टाकले. हेतू हाच होता की केवळ नागरी राजकीय विरोधक नव्हेत तर लढाऊ विरोधक सुद्धा किमच्या मार्गात येणार नाहीत अशी व्यवस्था केली जात होती. जुलै १९४६ मध्ये किम इल सॉन्गने स्वतंत्ररीत्या वर्कर्स पार्टीची स्थापना केली आणि सोल शहरातून चालवल्या जाणार्‍या कोरियन कम्युनिस्ट पार्टीशी फारकत घेतली. नव्या पार्टीचे अध्यक्ष म्हणून किम इल सॉन्गची नव्हे तर ज्येष्ठ कम्युनिस्ट आणि हानगुल भाषातज्ञ किम तु बॉन्गची निवड झाली. किम इल सॉन्ग ह्या पार्टीमध्ये व्हाईस चेयरमन होता. बॉन्गच्या अध्यक्षतेखाली अनेकांची हकाल पट्टी करण्यात आली. अर्थात अध्यक्ष म्हणून त्याचे खापर जनता सॉन्गवर नव्हे तर बॉन्गवर फोडू लागली. अशा प्रकारच्या राजकीय खेळींमध्ये आपण सर्वोत्तम आहोत हे आपल्या वागणुकीमधून सॉन्गने पुन्हा एकदा रशियनांना पटवले. 

१९४८ च्या सुरुवातीला रशियनांच्या हे लक्षात आले होते की आता किमचे पक्षावरती पुरेसे नियंत्रण आहे. पण अजून एक गट उरला होता. आता किमसोबत असे काही कोरियन कम्युनिस्ट होते की  ज्यांनी मॉस्कोचे वर्चस्वही मान्य केले होते पण ते मॉस्कोशी "निष्ठावंत" नव्हते. कल्पना करा की खरे निष्ठावंत कोण आहेत हे ठरवण्याचे निकष कसे बनवले गेले असतील आणि ते पार्टीमध्ये आलेल्या प्रत्येक सदस्यासाठी ताडून पाहण्याची व्यवस्था कशी काम करत असेल. आता किम इल सॉन्गने उमेदवार द्यावेत आणि पार्टीने ते मान्य करावेत अशी स्थिती आली होती कारण आव्हान देणारे कोणीच पार्टीमध्ये उरले नाही. ह्यानंतर त्याचा मार्ग निर्वेध झाला होता. सप्टेंबर १९४८मध्ये किमने डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया DPRK ची स्थापना झाल्याचे घोषित केले. ह्यानंतर डिसेंबर १९४८ मध्ये सोव्हिएत फौजा माघारी परतल्या. त्यांची लष्करी सामग्री कोरियामध्येच ठेवण्यात आली होती. तसेच सामग्री सांभाळण्यासाठी रशियन सल्लागारही कोरियातच थांबले. मांचुरियातील लढाईमध्ये चिनी सेनापती लिन बि यओ ह्याच्या हाताखाली जवळजवळ दीड लाख कोरियन सैनिक होते. हे सैनिक आता कोरियन लष्करामध्ये किम इल सॉन्गच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले. १९४९ पर्यंत उत्तर कोरियाने सोव्हिएत संघ राज्यामध्ये सामिल व्हावे म्हणून रशियाने सर्व तयारी पूर्ण करत आणली होती. चीनमध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करून जर राष्ट्रवादी शक्तींचे राज्य वाचवले असते तर कोरिय संघ राज्यात सामिल झालाही असता. पण एकदा चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट येणार हे स्पष्ट झाल्यावरती कोरियाला संघ राज्यात घेण्याचे प्रयोजन उरले नाही. 

(आज जे पक्ष भारतामध्ये कम्युनिस्टांशी चुम्बाचुम्बी करत आहेत त्यांच्यासाठी तसेच कम्युनिस्ट पक्षातलेही प्रामाणिक सदस्य ह्यांच्यासाठी हा धडा आहे. आपले काय होणार ह्याचा त्यांनी विचार करायचा आहे - अर्थात आत्मपरीक्षा करायची असेल तर) 


हे सर्व घडेपर्यंत अमेरिका काय करत होती असा प्रश्न पडेल. ६ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने शरणागती पत्करली त्यानंतर ताबडतोब एका रात्रीत सोल शहरामध्ये एक सरकार स्थापण्यात आले.  अमेरिकन फौजा कोरियामध्ये पोचल्यावरती त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रवादी विचाराच्या मंडळींना एकत्र करून कोरियन डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना केली. आणि सोल शहरामध्ये रिपब्लिक ऑफ कोरिया ROK ची स्थापना करून सिन्गमन र्‍ही ह्यांना अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. सिन्गमन कोरियाच्या सुशिक्षित च्चभ्रू आणि श्रीमंत गृहस्थ होते. ते व त्यांचे सहकारी ह्यांचा कल पाश्चात्य जीवनाकडे झुकलेला होता. अमेरिकेच्या भरघोस मदतीवरती ह्या गटाने राज्य चालवले होते. ह्या दरम्यान उत्तर कोरियामधल्या ख्रिश्चनांना तेथील रशियन कम्युनिस्ट राजवट नको होती. त्यामुळे तिथे त्यांचा छळ चालला होता. त्यांच्या मदतीला दक्षिण कोरियातील उच्चभ्रू वर्गाने पोसलेले आक्रमक गट पाठव्ण्यात आले. दक्षिणेकडेही परिस्थिती शांत नव्हती. इथेही पीपल्स कमिटीची स्थापना झालेली होती आणि त्यांना दक्षिणेतील सरकारही कम्युनिझमला बांधलेले हवे होते. तसेच ते दुसर्‍या महायुद्धात  हाती आलेली शस्त्रे खाली ठेवायला तयार नव्हते. त्यामुळे दक्षिणेकडेही काळ अशांततेचा होता. ह्या कम्युनिस्टांनी साउथ कोरियन लेबर पार्टी SKLP ची स्थापना केली. त्यांच्यातही रशियनांनी आपली माणसे घुसवली. हळूहळू हा पक्षदेखील उत्तरेच्या ताब्यात आला. १९४९ च्या अखेरीपर्यंत दक्षिण कोरियातील सर्व भागामध्ये रशियाप्रणित गट उभे राहिले होते. तर उत्तर कोरियामध्ये सक्षम सैन्य उभे राहिले होते. त्यामुळे उत्तर कोरियाने हल्ला केलाच तर अगदी झपाट्याने प्रगती करत किम इल सॉन्गचे सैन्य दक्षिण कोरिया गिळंकृत करेल अशी खात्री पटल्यानंतर रशियाने किमला तसे आदेश दिले. अशाने उत्तर व दक्षिण कोरियामध्ये युद्ध सुरु झाले. 



उत्तर कोरिया ४

File:Soviet military advisers attending North Korean mass event.jpg

(१४ ऑक्टोबर १९४५ रोजी प्योनग्यान्ग येथील सार्वजनिक सभेमध्ये किम इल सॉन्ग ह्याच्या बरोबरीने व्यासपीठावरती सोविएत लष्करी अधिकारी दिसत आहेत.)


हा भाग काळजीपूर्वक वाचा. आपल्याला हवे ते बाहुले सरकार एखाद्या देशामध्ये आणण्यासाठी सोव्हिएत रशिया कशाप्रकारे पावले उचलत होती त्याचे मनन करा. म्हणजे आजही आपल्या देशामध्ये काय चालले आहे हे तुमच्या लक्षात येईल. कोरिया प्रकरणावरती लिहा म्हणून अनेक जण आग्रह धरत होतेच पण आज ज्या घटना आपल्यासमोर उलगडत आहेत त्यातून माझ्या लेखाचे महत्व अधोरेखित होणार आहे. आजच्या घटना घडलेल्या नसत्या तर अनेकांना असे इथेही घडू शकते ह्याचा विचारही करावा असे वाटले नसते.

दुसर्‍या महायुद्धामध्ये सोव्हिएत रशिया आणि जपान ह्यांच्यात मंगोलिया - मांचुरियाच्या सीमेवरील खल्कनमध्ये शर्थीची लढाई झाली. पण बराचसा काळ सोव्हिएत रशियाने सुदूर पूर्वेतील लढायांमध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नव्हता. असे असले तरी युद्ध संपताच तिथे काय परिस्थिती असेल आणि त्यावेळी काय करता येईल ह्याची मात्र योजना रशियाकडे तयार होती. फार आधी पासून त्यांनी विविध देशांमध्ये स्थानिक कम्युनिस्ट चळवळींना सक्रिय मदत केली होती. वेळ येताच ह्या सोव्हिएत रशियाशी इमान राखणार्‍या स्थानिक गटांनी त्या त्या देशांमध्ये सत्ता काबिज करावी ह्या दृष्टीने तयारी चालू होती. ह्या व्यापक योजनेमध्ये कोरियाला महत्वाचे स्थान होते. जपानची नांगी ठेचण्यासाठी कोरिया महत्वाचा होता. अनेक वर्षांपासून जपानमध्ये राहणार्‍या कोरियन प्रजेला हाताशी धरून तेथील सरकारविरोधात असंतोष निर्माण करणे ही एक महत्वाची योजना होती. (आजदेखील जपानमधील ही प्रजा दक्षिण कोरियातील राजवटीशी नव्हे तर प्योनग्यान्गशी निष्ठावंत असल्याचे दिसते.) तसे पाहिले तर स्टॅलिन व माओचे फारसे पटत नसून देखील सोव्हिएत रशिया चिनी कम्युनिस्टांना मदत तर करतच होता. पण अजूनही चीनमध्ये सत्ता कम्युनिस्टांच्या हाती आलेली नव्हती. तेव्हा जर कदाचित चीनमध्ये राष्ट्रवादी शक्ती प्रबळ ठरून कम्युनिस्टांचा पराभव करून सत्तारूढ झाल्या असत्या किंवा  कम्युनिस्ट जिंकल्यानंतर माओशी असलेले हे विवाद जर हाताबाहेर गेले तर चीनमार्गे पॅसिफिकपर्यंत पोचणे शक्य होणार नाही हे सोव्हिएत रशियाने गृहित धरले होते. अशी परिस्थिती उद् भवलीच तर पॅसिफिकपर्यंत पोचण्यासाठी रशियाला हक्काचा दुसरा मार्ग म्हणून कोरिया सोयीचा होता. तेव्हा कोरियाचे स्थान सोव्हिएत रशियासाठी वैशिष्ट्यपूर्ण होते. दुसरे महायुद्ध संपताक्षणीच कोरिया हाती घेण्याचा रशियाचा बेत तयार होता. आपल्याच अखत्यारीमध्ये सोव्हिएत रशियाने एक समांतर कोरियन सरकार बनवले होते. त्यामध्ये "सोव्हिएत" कोरियन लष्करी अधिकारी, सुरक्षा व्यवस्था आणि पक्षाचा अधिकारीवर्ग हे अंतर्भूत केले होते. युद्ध संपले की रशियन फौजांनी कोरियामध्ये हे सरकार "स्थापन" करायचे असे ठरले होते. असे आरोपण केलेले सरकार स्थानिक जनतेने स्वीकारले असते का? असे सरकार त्यांना आपलेच आहे असे वाटावे म्हणून समांतर योजना कार्यान्वित केली होती. कोरियामधील अनेक स्थानिक नेत्यांना हाताशी धरून विभागवार लोकसमितींचे (People's Committees) जाळे विणण्यात आले होते. युद्धकाळामध्ये अशा समित्यांना रशियाकडून राजकीय आणि संरक्षणात्मक मदत मिळत असे. जेव्हा सरकार स्थापायची वेळ आली तेव्हा रशियाने त्यांचा खुबीने वापर करून घेतला. ९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर १९४५ ह्या २४ दिवसात रशियाने मांचुरियामध्ये जपानविरोधात तुंबळ युद्ध छेडले. ह्या युद्धामध्ये वापरण्यात आलेले युद्धतंत्र पुढील काळामध्ये रशियाचे एक महत्वाचा नमुना तंत्र बनून गेले. (१८ ऑगस्ट रोजी सुभाषचंद्र बोस फोर्मोसावरून मांचुरियामध्ये पोहोचले तेव्हा जपान आणि रशियामध्ये युद्ध चालूच होते. तिथून ते रशियामध्ये प्रवेशले असे म्हणतात. रशियाने याअगोदर त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्यामुळे जपानपेक्षा रशियामध्ये जाणे त्यांना श्रेयस्कर वाटले असावे. पण रशियाने त्यांना ताब्यात तर घेतलेच पण युद्धकैद्यासारखी वागणूक दिली असे दिसते.) ह्यानंतर सप्टेंबरमध्ये रशियन फौजा कोरियामध्ये घुसल्या. प्रत्यक्षात दोन स्वतंत्र रशियन फौजा कोरियामध्ये पाठवया गेल्या होत्या. एकीचे काम होते राजकीय दृष्ट्या कोरियाच्या स्वातंत्र्याची लढाई लढण्याचे. त्याचे नेतृत्व होते इव्हान चिस्तियाकोव ह्यांच्याकडे. दुसरी छोटी फौज होती निकोलाय लेबेदेव ह्यांच्या कडे. लेबेदेवकडे महत्वाची कामगिरी सोपवण्यात आली होती. कोरिया "स्वतंत्र" झाल्यानंतर तिथे मॉस्कोला हवी ती माणसे (सोव्हिएत कोरियन्स) गादीवरती बसवून कोरियाला सोव्हिएत साम्राज्यातील एक सॅटेलाईट देश बनवायचे. लेबेदेवच्या दिमतीला दोन गुप्तहेर अधिकारी देण्यात आले होते. एकाला जपानी भाषा अवगत होती - त्याचे कोरियन भाषेचे ज्ञान जुजबी होते - त्याने जपानमध्ये राहून तिथे काम केले होते. दुसर्‍याला रशियन वकिलातीमध्ये नेमले होते. त्याचे काम होते त्यावेळपर्यंत भूमिगत राहून काम करणार्‍या कोरियन गटांच्या संपर्कात राहण्याचे. कोरियामध्ये येणे सुरक्षित असल्याचे रशियन फौजांनी कळवल्यानंतर किम इल सॉन्ग आपल्या ४० सहकार्‍यांसह रशियन युनिफॉर्म धारण करून तिथे आला. ह्या धोंड्याला सुरक्षितपणे गादीवरती बसवून कोरियन जनतेच्या गळी उतरवण्यापर्यंतची सर्व कामे रशियन अधिकारीच करत होते. ह्या कामासाठी किमचीच निवड क करण्य़ात आली होती? त्याचा प्रशिक्षक म्हणतो की " Kim was a simple and obidient border-crosser who came within the sights of our intelligence authorities. More precisely, he was obliging, far from having any ideas of his own, and capable of repeating what was suggested to him."

लक्षात घ्या की कोणत्या गुणांसाठी किमची निवड झाली होती. कोरियाची हद्द ओलांडून रशियामध्ये प्रवेशलेल्या बंडखोरांपैकी किम हा एक साधा तरूण होता - आम्हाला हवे तसे वागायला तो तयार होता - त्याच्या डोक्यामध्ये कोणत्याही स्वतंत्र कल्पना नव्हत्या (ज्या कार्यन्वित करण्याची त्याने हौस बाळगली असती आणि तसे करताना कदाचित रशियन डाव उढळले असते) - त्याला सूचना दिल्या की त्याबरहुकूम तंतोतंत बोलण्याचे काम तो उत्तमरीत्या करू शकत होता. एखाद्या देशाचा राज्यकर्ता होण्यासाठी असा माणूस बुद्धिमान असावा अथवा देशाशी आणि जनतेशी प्रामाणिक असावा - त्याच्यामध्ये नेतृत्व गुण असावेत - त्याला स्वतंत्र बुद्धीने कारभार हाकता यावा हे निकष इथे गैरलागू ठरवले गेले होते. कोणते गुण एखाद्या व्यक्तीमध्ये असायला हवेत ह्याचे निकष रशियाच्या लेखी काय होते हे नीटपणे समजावून घ्या. ही वाक्ये परत परत वाचा. तर तुम्हाला आजदेखील असे गुण असलेला आपल्यामधलाच राजकीय नेता सहज ओळखता येईल. खरे ना? आणि तसे असेल तर अशा नेत्यापासून आपल्याला नेमका काय धोका आहे हेदेखील स्पष्टच नाही का?

प्योनग्यान्गला परतल्यानंतर किम इल सॉन्गने कोरियामधील वरिष्ठ स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांची भेट घेतली आणि त्यांचा पाठिंबा आपल्या सरकारला मिळावा अशी विनंती केली. पण हे वरिष्ठ नेते किमला स्वीकारण्याच्या मनःस्थितीमध्ये नव्हते. १४ ऑक्टोबर रोजी सोव्हिएत रशियाने एक भव्य सभा आयोजित केली. तिथे ह्या वरिष्ठ नेत्यांना बोलावून व्यासपीठावरती स्थानापन्न करण्यात आले. सभेला अर्थातच प्रचंड गर्दी होती. कोरियामध्ये असलेले सर्व वरिष्ठ रशियन्स सभेमध्ये हजर होते. इथे किम नागरी वेष परिधान करून आला होता. त्याने रशिय्न अधिकार्‍याने लिहून दिलेले भाषण तिथे केले. रशियन्स कोणतीही घाई न करता पावले टाकत होते. सुरूवातीला पीपल्स कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावरती स्थानिक वरिष्ठ नेते अंतर्भूत केले गेले होते. त्यांच्यासोबत "सोव्हिएत कोरियन्स" सुद्धा होते. पण त्यांना दुय्यम स्थान होते. ते फारसे प्रकाशात येऊ नयेत अशा तर्‍हेने कामकाज चालवले जात होते. सरकारी काम हाकण्यासाठी रशियन अधिकारी कामाला लागले होते. ते देखील कुठेही पडद्यासमोर न येता काम उरकत होते. स्थानिक वरिष्ठ नेत्यांना न दुखावता गाडा चालवला जात होता. १९४६ च्या शेवटाला रशियनांना परिस्थिती आपल्या हातून निसटण्याची भीती नसल्याची खात्री पटली. आता वेळ आली होती "निवडणुका" घेऊन सोव्हिएत कोरियनांच्या हाती सूत्रे सोपवण्याची. अशा तर्‍हेने मार्क्सिस्ट लेनिनिस्ट सरकार कोरियामध्ये कायदेशीर मार्गाने प्रस्थापित झाले असे जगासमोर आणणे शक्य होणार होते. त्याची कहाणी पुधील भागामध्ये पाहू. 



Monday 28 May 2018

उत्तर कोरिया ३


Image result for kim il sung

(सोबत स्टॅलिन व किम इल सॉन्ग)

जपानचा वरचष्मा सहन करत का होईना कोरियाने आपली प्रगती सोडली नाही. जपानला देखील कोरिया ही आपली वसाहत म्हणून वापरायची होती. त्याच्या लष्करी महत्वाकांक्षा भागवायच्या तर युद्धाच्या तयारीसाठी जपानला मजूर हवेच होते. हाती आलेल्या कोरियन प्रजेचा पुरेपूर वापर करून घेण्याचे जपानने ठरवले. कोरियामध्ये युद्धसामग्रीच्या उत्पादनाचे कारखाने चालवायचे तर त्या आधी कोरियन प्रजेला तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आवश्यक होते. जपानी लोकांनी ह्याला प्रोत्साहन दिले. परचक्रामध्ये राहणे जरी नशिबी आले होते तरीही एक प्रकारे कोरियन प्रजेच्या आधुनिक जीवनाचा पाया घातला असे दिसून येते. आज दक्षिण कोरियाने आपले आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. त्याची सुरूवात जपानने केल्याचे दिसून येते. औद्योगिकीकरणाला पोषक असे विस्तीर्ण रस्ते - बंदरे - विमानतळ आदि वाहतुकीची व्यवस्था अस्तित्वात आली. कोरियाचे विद्युतीकरण करण्यात आले. फार काय पण जपानने कोरियन शेतीमध्येही आधुनिक तंत्रज्ञान आणून त्याही व्यवसायामध्ये प्रगती घडवून आणली. कमीत कमी लोकांच्या श्रमावरती अधिआधिक लोकांचे पोट भरण्याची व्यवस्था होईल अशी शेती कोरियामध्ये हो ऊ लागली. मग त्यातून जे शेतमजूर बेकार झाले - "अतिरिक्त" ठरले ते आपोआपच कारखान्यांमध्ये कामासाठी उपलब्ध झाले. कोरियावरती कब्जा मिळाल्यानंतर जपानने मांचुरियादेखील गिळंकृत केला होता. मांचुरिया हाती असल्यामुळे जपानला आशियाच्या मध्यवर्ती भागांमध्ये जाण्याची सोय झाली होती. जपानचे आर्थिक साम्राज्य त्याही भागामध्ये पसरत होते. त्या काळी विणल्या गेलेल्या ह्या आर्थिक जाळ्याचा उपयोग आजदेखील दक्षिण कोरियाला होत आहे.

सोन्याच्या पिंजर्‍यात ठेवले आणि गोडधोड खाऊ घातले तरी पिंजरा तो पिंजराच असतो. स्वाभिमानी कोरियन जनता जपानी महत्वाकांक्षेपायी भरडून निघत होती. आणि वारंवार बंडाचे प्रयत्न करत होती. १९१० मध्ये स्वातंत्र्य गमावल्यापासूनच कोरियन जनता बंडाची तयारी करू लागली होती. पहिला उठाव झाला तो १९१९ मध्ये. सुरूवात झाली ती एका निषेध निदर्शनमधून. शहरी सुसंस्कृत प्रजेच्या पुढाकाराने हा निषेध नोंदवला जात होता. त्यामध्ये विद्यार्थी - शिक्षक आणि इतर घटक सामिल झाले होते. शिक्षण पद्धतीचे जपानीकरण आणि कोरियन सांस्कृतिक जीवनाचा क्रमाक्रमाने जाणीवपूर्वक केला जाणारा र्‍हास हे ह्या मोर्चाचे तात्कालिक कारण होते. सर्व जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळेच आंदोलन बघताबघता पसरले. जपानी राजवटीला ते आटोक्यात आणण्यासाठी पुरेसा वेळ मिळायच्या आत त्याची व्याप्ती प्रचंड झाली. अखेर कोरियाच्या सर्वदूर पसरलेल्या विभगांमधून जवळजवळ २० लाख कोरियनांनी आंदोलनात भाग घेतला - बंड मोडून काढताना ७००० व्यक्ती मारल्या गेल्या तर कित्येक लाख तुरुंगात डांबले गेले. त्यामधल्या शेकडॊंना फाशी देण्यात आली. आंदोलन दीर्घ मुदतीचे नव्हते. म्हणता म्हणता पेटले आणि तसेच विझूनही गेले. पण त्याने एक मोठे काम केले. कोरियामध्ये एक विरोधी विचाराची फळी उभी राहिली. त्यांच्यात दोन शकलेही झाली. एक गट होता तो राष्ट्रवादी विचाराचा. तर दुसरा होता कम्युनिस्ट. ह्यामधले कम्युनिस्ट जे होते त्यांच्यावरती पाश्चात्य कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता. तर आजच्या घडीला उत्तर कोरियामध्ये जो कम्युनिस्ट पक्ष राज्य करत आहे तो म्हणजे राष्ट्रवादी विचारधारा आणि उत्तर आशियामध्ये त्या काळामध्ये खेळल्या देलेल्या राजकारणाचा परिपाक आहे. 

१९१७ सालच्या रशियन राज्यक्रांतीनंतर रशियन राज्यकर्त्यांनी चीन तसेच सुदूर पूर्वेतील देशांमध्ये कम्युनिस्ट क्रांती घडवून आणण्याची मोहिमच आखली होती. त्या त्या देशातील कम्युनिस्टांन प्रशिक्षण देण्याचे आणि त्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचे काम रशिया जोमाने करत होता. चीनमध्ये क्रांती घडवून आणण्याचे रशियाचे प्रयत्न अपयशी झाले पण त्याच प्रयत्नातून कोरियामध्ये रशियाला यश प्राप्त झाले. १९२० साली शांघाय आणि कॅन्टनमध्ये कम्युनिस्टांचा पराभव झाला आणि तिथे राष्ट्रवादी शक्ती विजयी झाल्या. ह्यानंतर रशियाने आपल्याला धार्जिणे असणार्‍या क्रांतिकारकांन मांचुरियामध्ये आश्रय दिला. मांचुरिया रशियाला जवळ असल्याने कम्युनिस्ट क्रांतीचे केंद्र आता मांचुरियामधून काम करू लागले. क्रांतिकारकांच्या ह्या प्रयत्नांमध्ये अनेक कोरियनांचा पहिल्यापासून सहभाग होता. कालांतराने हे कोरियन क्रांतिकारकांच्या सैन्यामध्ये वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले. अशा तर्‍हेने ३० च्या दशकामध्ये चिनी आणि कोरियन कम्युनिस्ट जपान्यांविरोधात खांद्याला खांदा लावून लढा देत होते. जपान्यांविरोधात लढणार्‍या कम्युनिस्टांमध्ये ४६ पैकी आठ कोरियन कमांडर्स होते. ह्या गनिमी युद्धाची मुख्य सूत्रे होती यांग जिंग यु ह्या चिनी लढवय्याच्या हाती. यांगच्या भोवती विस्मयाचे एक प्रभावी वलय निर्माण झाले होते. १९४० मध्ये एका चढाईमध्ये यांग मारला गेला. त्याच्या पट्टशिष्यामधल्या एकाचे नाव होते किम सॉन्ग जू. शाळेमध्ये शिकत असताना त्याने एका आंदोलनात भाग घेतला म्हणून त्याला शाळेमधून काढून टाकण्यात आले होते. सरकारने त्याला तुरुंगात टाकले. तिथून निसटून तो मांचुरियामध्ये गेला आणि तिथल्या कम्युनिस्ट सैन्यामध्ये सामिल झाला. त्याने आपले नाव बदलून किम इल सॉन्ग असे ठेवले. (अर्थ एक तारा). १९४१ मध्ये जपानने ह्या लाल सैन्याला पुरते मागे रेटले - किम इल सॉन्ग आपल्या कोरियन सहकार्‍यांसह रशियामध्ये गेला. तिकडे रशियामध्ये बरीच कोरियन प्रजा राहत होती. पण एके काळी जपानी वर्चस्वाखाली रहिलेल्या ह्या जनतेवरती स्टॅलिन विश्वास टाकायला तयार नव्हता. त्याला शंका होती की ही मंडळी जपानशी आपले इमान राखून आहेत आणि ते रशियाशी सहकार्य करणार नाहीत. ह्या शंकेमुळे रशियामधील कोरियन प्रजेला राज्यकर्त्यांनी जबरदस्तीने स्थलांतर करायला भाग पाडले. ही प्रजा स्टॅलिनने पुढे कझाकस्तान व उझबेकीस्तानमध्ये बळजबरीने पाठवली. दुसरीकडे रशियामध्ये पोचलेले कोरियन सैन्य मात्र डाव्या विचारांशी आणि रशियाशी प्रामाणिक होते. सुरुवातील स्टॅलिनने त्यांना चिनी कमांडर्सच्या हाती काम करायला सांगितले. हळूहळू त्यांच्यामधल्या हुशार सैनिकांना उच्च लष्करी शिक्षण देण्यात आले. सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली कोरियावरती अंमल गाजवण्यासाठी त्यांचा उपयोग करून घ्यायचे ठरले होते. ह्या गडबडीच्या दिवसात किमची पत्नी त्याच्यासोबत रशियामध्येच राहत होती. तिथेच त्यांचे लाडके अपत्य किम जोन्ग इल ह्याचा जन्म झाला. लहानपणी जोन्ग इलचे युरा हे रशियान नाव संबंधितांमध्ये प्रचलित होते. ह्या कोरियनांना सोव्हिएत कोरियन असे नाव पडले होते. १९४५ नंतर सुदूर पूर्वेमध्ये रशियाने हस्तक्षेप करण्याचे ठरल्यानंतर कोरियन तुकडीमध्ये वाढ करण्यात आली. कोरियन तुकडी स्वतंत्र नव्हती ती सोव्हिएत सैन्याचाच एक भाग म्हणून काम करत असे. 

दरम्यान कोरियाच्या भूमीवरील विरोधी शक्तींचे काय झाले होते? त्यांच्यामधल्या ज्यांना जपानने हाकलले होते ते चीनच्या अश्रयाला गेले होते आणि तिथे राहून ते कोरियामध्ये हिंसक घटना घडवत होते.जपानच्या जाचातून सुटका करून घ्यायची म्हणून काही जण निसटून अमेरिकेत गेले. दक्षिणेकडील राष्ट्रवादी विरोधकांना अमेरिका ही जपानचा शत्रू म्हणून जवळची वाटत होती. अशा तर्‍हेने कोरियामधील विरोधक आता भूमिकांच्या ध्रुवीकरणामुळे दोन स्वतंत्र गटात गणले जात होते. १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांनी कोरियाचे विभाजन करण्याचा निर्नय घेतला. ३८ अक्षांशाची सीमारेखा निश्चित करण्यात आली. त्यातूनच आजच्या संघर्षाची बीजे रोवली गेली. 

Sunday 27 May 2018

उत्तर कोरिया २


Image result for king sejong korea
(सोबत छायाचित्र सम्राट सेजोन्ग आणि त्याने निर्मिलेली नवी कोरियन लिपी)


फेक्यूलर लिब्बुंना राष्ट्रीयत्व कल्पनेचे वावडे असते. इतिहासाचे वावडे - संस्कृतीचे वावडे - भाषा प्रांत सगळ्याचेच वावडे असले तरी मानवी समाज मात्र तसे जगू इच्छित नाही. उदा. एखाद्या माणसाला स्मृतीभ्रंश झाला की आपण कोण आपले घर कोणते आपण काय करत होतो आपले नातेवाइक मित्रपरिवार कोणता ह्याची आठवण राहत नाही. थोडक्यात काय असा माणूस असूनही नसल्यासारखाच होईल. खरे ना? मग अशा माणसाला घरात पुनश्च सामावून घेण्यासाठी कशी धडपड करावी लागते बघा. लिब्बुंचे ऐकले तर आपली ओळख आपण विसरून जाऊ. सुदैवाने माणूस लिब्बुंचे हे म्हणणे ऐकायला तयार नसतो. उत्तर कोरियाचेही वेगळे काय असणार? एका तोंडाने कम्युनिझमची आचमने करताना उत्तर कोरिया आपला इतिहास संस्कृती विसरू शकलेला नाही. तीच त्याची ओळख आहे. मग तिची निदान तोंडओळख तर करून घेऊ.

कोरिया हा एक अगदी छोटा देश आहे. हजारो वर्षांचा इतिहास त्याला आहे. त्याकाळापासून ह्या देशाचे तीन मोठे तुकडे बघायला मिळतात. नैऋत्येकडे पेक्चे - आग्नेयेकडे सिला आणि उत्तरेकडे कोगुर्यो ह्या पुरातन प्रांताच्या स्मृती कोरियन समाजाने जपल्या आहेत. एका बाजूला जपान तर दुसर्‍या बाजूला चीन मांचुरिया रशिया आणि मंगोलिया कोरियाच्या इतके जवळ होते की ह्या देशांनीही कोरियावरती आपला प्रभाव टाकला आहे. तीन हजार वर्षांपूर्वी कोरियामध्ये पोचलेल्या चिनी तत्वज्ञ सजे किजा आणि त्याचे ५००० अनुयायी ह्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रभाव तिथे नेला. कोरियाने तो पचवला. आपली ओळख पण जपली. सजेने एक तत्कालीन आधुनिक राज्यव्यवस्था - लिखित इतिहास अशा संस्कृतीच्या देणग्या कोरियन समाजाला दिल्या. त्याच्यानंतर सुमारे हजार वर्षांनी  उत्तर कोरियामध्ये आलेल्या चिनी स्थलांतरितांनी तिथे किमान चार मोठ्या वसाहती वसवल्या. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच होता. आपल्या शेतीच्या आणि त्यातून मिळणार्‍या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी हे चिनी स्वतःचे सैन्यही घेऊन आले होते. तेच सैन्य आपल्या वसाहती तसेच इतरही कोरियन लोकांचे संरक्षण करू लागले. अशा रीतीने चिनी प्रजा कोरियामध्ये स्थिरावत होती. कालांतराने कोरिया म्हणजे अशा चिन्यांचे जणू एक तैनाती फौज स्वीकारलेले मांडलिक राष्ट्र बनून गेले. सुमारे १२०० वर्षांपूर्वी आग्नेयेकडील सिला राजवटीने संपूर्ण कोरियाला एकत्र आणले. यानंतर कोरियावरती सर्वाधिकार केंद्राकडे एकवटलेली राजवट सुरू झाली. ह्या स्थिर काळाला आव्हान मिळाले ते मांचुरियाचे. आणि त्यानंतर आलेल्या मंगोलियन राज्यकर्त्यांचे. चिनी कोरियात आले तेव्हा त्यांनी सोबत आपली संस्कृती आणली पण कोरियाची संस्कृती दडपली नाही. मंगोल आक्रमकांनी मात्र कोरियाच्या संस्कृतीवरती आणि सामाजिक जीवनावरती जबर आघात केले. कोरियाचे पारंपरिक पुरातन ज्ञान लाकडी ठोकळ्यांवरती कोरून ठेवण्यात आले होते. पण मंगोल आक्रमकांनी असे ठोकळे जाळून टाकले. ह्या जबर धक्क्यामधून कोरियन समाज जागा झाला तोवर मंगोल आक्रमकांनी तिथे मैत्रीचे संबंध स्थापन करण्यचे प्रयत्न सुरु केले होते. मंगोलांच्या आधुनिक राज्यतंत्राचा लाभ कोरियातील लोकांना मिळाला. पुढे त्याच लोकांच्या मदतीने मंगोल लोकांनी जपानवरही आक्रमण केले. मंगोल राजवटीचा एक परिणाम कोरियन समाजावरती असा झाला की तिथे एक लढाऊ वर्ग जन्माला आला. ह्या वर्गाच्या हातामध्ये राजकीय निर्णयशकेतीही आली होती. त्या बळावरती १३६४ मध्ये कोरियाने चिनी वर्चस्वाविरुद्ध बंड केले आणि त्यातून त्यांचे स्वतःचे यी राजघराणे उदयाला आले. ह्या घराण्याने चिनी मिंग राजघराण्याशी सूत जुळवून त्यांचे संरक्षण मिळवले. ह्यानंतर कोरियातील बौद्ध धर्म बाजूला पडला आणि कन्फ्यूशियसच्या तत्वज्ञानाने समाजात पकड घेतली.

१४४६ मध्ये कोरियामध्ये स्थापना झालेल्या सेजोन्ग ह्या सम्राटाने कोरियाचे भविष्य बदलले असे म्हणता येईल. कोरियन लिपीमध्ये त्याने आमूलाग्र बदल केले आणि त्यातील मूळाक्षरे कमी करून त्यांची संख्या २८ वरती आणली. ही मूळाक्षरे ध्वनीवरती आधारित होती. तार्किकदृष्ट्या ती लिपी सर्वथा यथार्थ होती. हुनमिन चोंगम म्हणजे "लोकांसाठी बरोबर ध्वनी". Correct sounds for people - सोप्या शब्दात ह्या लिपीला हनगुल असे म्हटले जाऊ लागले. त्या लिपीचे वैशिष्ट्य असे होते की की ती तार्किक दृष्ट्या यथायोग्य (most logically arranged alphabets) असल्याने काही तासात शिकणे शक्य होते.  ह्या बदलानंतर राजाने आपल्या सर्व प्रजेला लिहिता वाचता यावे म्हणून एक मोहीमच हाती घेतली.  ह्याचा फायदा असा झाला की सामान्य जनता लिहायला आणि वाचायला शिकली - सोप्या लिपीमुळे जनतेला लिहिणे वाचणे अगदी सुलभ झाले. पाश्चात्यांनी आशियामध्ये पदार्पण केले तेव्हा लिहिता वाचता येणाऱ्या प्रजेचा सर्वात मोठा टक्का कोरियामध्ये असल्याचे नोंदले गेले. साक्षरतेची पातळी अशी उंचावल्यामुळे एकंदरीत समाजजीवनावरती त्याचे खोलवर परिणाम झाले. आज देखील कोरियाच्या लहान सहान गावांमध्येही ही परंपरा चालू आहे सेजोन्ग राजाने राज्यकारभार  - सामाजिक - आर्थिक आणि विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक चांगल्या सुधारणा घडवून आणल्या. अशा तर्‍हेने चीनच्या भक्कम संरक्षणाचे छत्र असलेल्या कोरियन राजवटीला भरभराटीचे दिवस काही शतके पाहायला मिळाले. पुढे १५९२ मध्ये जपानने चीनवरती हल्ला चढवला तो कोरियाच्या मार्गाने. (ह्या वर्षी भारतात शहाजहान जन्मला.). त्याचा प्रतिकार म्हणून चीनकडूनही हल्ले होत राहिले. अशा तऱ्हेने सुबत्तेच्या काळानंतर आलेली ही अस्थिरता कोरियन प्रजेला आवडली नाही. १६३८ पासून कोरियाने स्वतःला कोंडून घेतले आणि जगाशी संपर्क बंद केला. कोणत्याही परकीय माणसाला देशाची दारे बंद केली गेली. हा नियम तोडणाऱ्याला देहांताची शिक्षा सुनावली जात असे. कोरियावरती चीनचा अनेक शतकांचा प्रभाव होता. परकीयांना देशाची दारे बंद झाली तरी तो चिनी प्रभाव काही पुसला गेला नाही. ही बंदी सुमारे अडीचशे वर्ष चालू होती. इथे लक्षात येईल की आजदेखील कोरिया जगापासून आपला सगळं संपर्क तोडून एखादे Hermit Kingdom असल्यासारखा मानसिक दृष्ट्या कसा तगू शकला. 

१८७६ मध्ये जपानने कोरियाला पटवून त्याची काही बंदरे व्यापाराकरिता तरी आम्हाला वापरू द्या म्हणून गळ घातली आणि अनुमती मिळवली. एकदा कोरियाने दारे किलकिली केल्यावरती जपानने झपाट्याने तिथे आपला प्रभाव वाढवण्याची पावले उचलली. जपानने कोरियामध्ये जनतेमध्ये असंतोष निर्माण करण्याकडे लक्ष दिले. त्यांना कोरिया गिळंकृत करायचा होता. जपानच्या प्रभावामुळे चिंतेमध्ये पडलेल्या चीनच्या हे लक्षात आले की कोरियाच्या संरक्षणामध्ये आपण एकटे काही जपानी प्रभावाला पुरे पडू शकणार नाही. त्याने कोरियाला अमेरिकेशी मैत्री करण्याचा सल्ला दिला. अशा तऱ्हेने १८८२ मध्ये म्हणजे जपानला परवानगी मिळाल्यानंतर सहाच वर्षात अमेरिकेचे पदार्पण कोरियामध्ये झाले ते जपानी प्रभावाला अटकाव करण्यासाठी. अमेरिकेपाठोपाठ आशियामध्ये आधीच पोचलेल्या अन्य युरोपियनांनी देखील कोरियाच्या बंदरांचा आम्हालाही वापर करू द्यावा म्हणून विनंती केली. त्यानंतर अमेरिकेसकट उर्वरित युरोपियन देशांनी कोरियन राजवटीशी व्यापारविषयक करारही केले. ह्या काळामध्ये कोरियाचे एकलकोंडे जीवन संपुष्टात आले. १८८३ मध्ये कोरियाने चीनच्या सल्ल्यावरून अमेरिकेशी मैत्री करार करण्याचे पाऊल उचलले. जपानने मात्र कोरियन प्रजेमध्ये दुफळी माजण्याची कारस्थाने करण्याचे तंत्र चालू ठेवले. त्यासाठी बंडखोरांना पैसे प्रचार साहित्य शस्त्रास्त्रे आणि हे सर्व आयोजन करू शकतील असे तज्ज्ञही पुरवले. कोरियाच्या उत्तर भागामध्ये चिनी वस्ती होती. तिथे हे बंड अधिक जोर धरत होते. हळूहळू चीनलाही गप्प बसणे अशक्य होऊ लागले. १८८४ मध्ये चीनने बंडाचा बीमोड करण्याचा प्रयत्न केला पण जपानने त्याचा पराभव केला. १८९४-९५ मध्ये चीनने पुन्हा एकदा "कोरियन लोकांच्या मदतीच्या हाकेला प्रतिसाद" म्हणून कोरियाच्या भूमीवरती जपानशी मुकाबला केला पण जपानने त्यांचा पुन्हा प्रभाव केला. जपानने कोरियाच्या यि राजघराण्यातील राजाला ताब्यात घेतले. अन्य कुटुंबियांना ठार मारले. ह्यानंतर कोरियाच्या अंतर्गत कारभारावरती देखील जपानचे वर्चस्व प्रस्थापित झाले. कोरियामधली परिस्थिती गंभीर होती. त्याची दखल रशियालाही घ्यावी लागली. असेच चालू राहिले तर जपान रशियाच्या हद्दीतही पोहचू शकला असता. सावधगिरी म्हणून आता रशियाने आपले सैन्य मांचुरियामध्ये आणून ठेवले. 

त्यातच १८९६ मध्ये जपानच्या ताब्यात असलेला राजा तुरुंगातून सटकला आणि मांचुरियामध्ये पोचला. त्याने आपल्याला मदत करावी म्हणून रशियाला गळ घातली. मांचुरियामधून तो कोरियाचे परागंदा राज्य चालवू लागला. पण रशियालाही जपानचे आक्रमण थांबवता आले नाही. ३८ अक्षांशाची सीमा मान्य करून कोरियाचे दोन तुकडे करू व आपापल्या प्रभाव क्षेत्रामध्ये काम करू असा प्रस्ताव जपानने रशियाला पाठवला. पण रशियाने तो अमान्य केला. १९०० ते १९०१ ह्या वर्षांमध्ये रशियाने सुमारे दीड लाख सैन्य चीनमध्ये बॉक्सर बंडाळी मोडण्यासाठी पाठवले. त्याची जपानने गंभीर दखल घेतली. बंडाळीनंतर हे सैन्य रशियामध्ये परतलेच नाही. ते गेले कोरियामध्ये. शिवाय १९०३ मध्ये रशियाने ट्रान्ससैबेरियन रेल्वेचे काम पूर्ण केले. आता अगदी दूरच्या युरोपियन सीमेवरूनही रशियन सैन्य कोरियामध्ये त्वरित पाठव्ण्याची सोय झाली हे पाहून जपान बिथरला. १९०४-०५ ह्या वर्षांमध्ये दोन्ही देशांमध्ये युद्धाला प्रारंभ झाला. जपानने रशियाला नाकी नऊ आणले. सायबेरियन किनार्‍यावरची बेटे ताब्यात घेतली. रशियाच्या काही संपूर्ण आरमारी तुकड्या गारद केल्या. 1907 नंतर कोरियावरती जपानचे निर्विवाद राज्य प्रस्थापित झाले. जपानची वसाहत म्हणून १९४५ पर्यंत कोरिया त्यांच्या ताब्यात राहिला. परागंदा राजा कोजोन्ग रशियामध्येच राहिला. 

दुसर्‍या महायुद्धाचे परिणाम कोरियावरती काय झाले हे पुढील भागामध्ये पाहू. 

Friday 25 May 2018

उत्तर कोरिया 1


Related image

(परराष्ट्र राज्यमंत्री जनरल डॉ. व्हि. के. सिंग प्योनग्यांगमध्ये. मागे भारतीय राजदूत श्री गोटसुर्वे)

सामान्य वाचकाला उत्तर कोरिया हा एक गूढ विषय वाटतो. कारण त्याविषयी माध्यमांमध्ये फारसे वाचायला मिळत नाही. २७ एप्रिल २०१८ रोजी जेव्हा १९५३ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते आणि तेथील वर्कर्स पार्टीचे अध्यक्ष किम जॉंन्ग उन आपली सीमा ओलांडून दक्षिण कोरियामध्ये गेले आणि त्यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जए इन ह्यांनाही सीमा ओलांडून आपल्या हद्दीमध्ये नेले तेव्हा त्या नाट्याचा थरार आपण अनुभवत असताना हे जाणवू लागले की मराठीमध्ये ह्या विषयामध्ये फारसे लिखाण झालेले नाही. एप्रिल - मे २०१८ महिन्यात उत्तर कोरिया ह्या विषयावरील अनेक घडामोडी पाहता आल्या. उत्तर कोरियाकडे असलेली आण्विक शस्त्रास्त्रे - ती सोडण्यासाठी लागणारी क्षेपणास्त्रे - ह्या विषयामधली त्यांची तंत्रज्ञानात्मक प्रगती - उत्तर कोरियाचा अननुभवी तरूण विक्षिप्त लहरी रागीट "सत्ताधीश" अशी किम ह्यांची प्रतिमा - लहान वयामध्ये हाती असलेली अण्वस्त्रे - त्याने अधूनमधून थेट अमेरिकेलाच आण्विक हल्ल्याच्या धमक्या - उत्तर कोरियाकडून जगाला असलेला धोका - त्यांचे आणि रशिया तसेच चीन ह्यांजबरोबरचे जवळीकीचे संबंध असेच काहीसे मुद्दे विषय आपण वाचत असू. असा हा चक्रम विक्षिप्त तरूण सत्ताधीश खरोखरच एखादे दिवशी जगामध्ये अणुयुद्ध तर सुरू नाही ना करणार ही भीती. कोरियाकडे इतके आधुनिक तंत्रज्ञान आले कुठून? त्या प्रजेमध्ये खरोखरच उच्च विद्याविभूषित अभियांत्रिक आहेत का? हे सगळे ज्ञान त्यांनी कुठून मिळवले? जर इराण इराक लिबिया आदिंच्या अणुकार्यक्रमाबद्दल सजग राहून अमेरिकेने त्यांच्या हाती अण्वस्त्रे पडू नयेत म्हणून प्रयत्न केले तर मग असेच प्रयत्न कोरियाच्या बाबतीत का होऊ शकले नाहीत हे बुचकळ्यात टाकणारे प्रश्न आहेत. 


खरे म्हणजे गेल्या दोन दशकामध्ये भारतामधून मंत्रीपदावरील एकही व्यक्ती उत्तर कोरियाच्या दौर्‍यावरती गेलेली दिसली नाही. त्या देशामधून मात्र राजकीय नेतृत्व भारतामध्ये येत राहिले. पण त्याला प्रसिद्धी फारशी मिळाली नाही. मोदी ह्यांनी २०१४ मध्ये सूत्रे हाती घेतल्यानंतर उत्तर कोरियाकडे लक्ष वळवले. तेव्हा त्यांच्या हाती काय होते? पहिले म्हणजे उत्तर कोरियामध्ये भारताची रीतसर वकिलात होती. जगामधल्या अगदी मोजक्या देशांपैकी भारत हा एक देश होता ज्याने प्योनग्यांगशी आपले राजनैतिक संबंध चालू ठेवले होते.  १९५३ च्या किरियाच्या दोन तुकड्यामधील युद्धामध्येही भारत मध्यस्थी करण्याची लटपट करत होता. २००४ मध्ये आलेल्या त्सुनामी संकटात उत्तर कोरियाने भारताला एक टोकन स्वरूपात ३०००० डॉलर्सची मदत पाठवली. २०१३ पर्यंत कोरियाशी व्यापर करणार्‍या देशांमध्ये चीन व रशिया ह्यांच्यानंतर भारताचा नंबर लागत होता. आज भारत दोन नंबरवरती आहे. युनोने घातलेले आर्थिक निर्बंध सांभाळून भारताने उत्तर कोरियाला औषधे - अन्न पदार्थ - काही रसायने आणि खनिज तेल दिले आहे तर बदल्यात कोरियाकडून सुकवलेली फळे - नैसर्गिक गोंद आणि हिंग आयात केला आहे.

ह्या मूठभर साधनांनिशी मोदींनी उत्तर कोरियाच्या आघाडीवरती काय साध्य केले ते लोकांसमोर हळूहळू येण्याची वेळ जवळ येत आहे. प्रथमतः जानेवारी २०१५ मध्ये बातम्या येऊ लागल्या की उत्तर कोरिया प्रश्नावरती निर्माण झालेली कोंडी फोडण्याचे भारत प्रयत्न करत आहे. ह्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये कोरियाचे परराष्ट्र मंत्री नवी दिल्लीमध्ये येऊन गेले. मानवतेच्या दृष्टीने भारताने उत्तर कोरियाला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. त्यानंतर आजपर्यंत दोन्ही देशांमधील व्यापार दुप्पट झाला आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये केंद्रीय मंत्री श्री किरण रिजिजु ह्यांनी दिल्लीमधील उत्तर कोरियाच्या वकिलातीला भेट देऊन त्यांच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये भाग घेऊन एक सुखद धक्का दिला. अशा प्रकारे मंत्रीपातळीवरील सामाईक घटना सुमारे दोन दशकांनंतर होत असावी. पुढे ऑक्टोबर २०१७ मध्ये जेव्हा अमेरिकन स्टेट सेक्रेटरी श्री रेक्स टिलरसन भारत भेटीवरती आले तेव्हा भारताने उत्तर कोरियाशी संबंध तोडावेत म्हणून त्यांनी दडपण आणण्याची भूमिका घेतली खरी पण त्याला शरण न जाता उलटपक्षी वेळ आलीच तर प्योनग्यांगमध्ये निदान बातचित करण्यासाठीतरी मित्रत्वाचे संबंध असलेला एखादा देश असावा असा भारताकडून युक्तिवाद केला गेला आणि कोरियाशी असलेले संबंध तसेच राहिले. 

असे असले तरी २०१८ च्या मे पर्यंत भारताने उत्तर कोरियातील वकिलातीमध्ये आय एफ एस पातळीवरचा राजदूत नेमला नव्हता. त्या भागातील परिस्थितीचे अचूक निदान असलेला आणि चिनी भाषा येणारी व्यक्ती तेथून काम बघत होती. ३ मे रोजी पहिल्यांदा श्री अतुल मल्हारी गोटसुर्वे ह्यांची उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून कारकीर्दीला सुरूवात केली. मार्च महिन्यामध्ये ही नेमणूक होणार हे ठरल्यानंतर ही बाब गैरसमज नको म्हणून आगाऊ माहिती दिल्यागत अमेरिकेच्या कानी पडायची सोय करण्यात आली. तसेच नेमणुकीची बातमी प्रसिद्धीस देण्यात आली नाही.  प्रथम उत्तर कोरियाला गोटसुर्वे चालतील का याचा अंदाज घेऊन त्यांचा होकार घेण्यात आला. त्यानंतर गोटसुर्वे ह्यांनी प्रथम दक्षिण कोरियाच्या दिल्ली येथील वकिलातीला भेट देऊन माहिती करून घेतली. जुलै २०१८ मध्ये दक्षिण कोरियाचे अध्यक्ष श्री मून भारत भेटीवरती येणार आहेत. त्यामध्ये ह्या नेमणुकीने गैरसमज होऊ नयेत म्हणून त्यांनाही आगाऊ कळवण्यात आले. ह्यानंतर श्री गोटसुर्वे ते कामावरती रुजू झाले व त्यांनी कोरियामधील अनेक महत्वाच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. ह्यानंतर दोनच आठवड्यामध्ये परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री जनरल व्हि. के. सिंग ह्यांनी उत्तर कोरियाला भेट दिली. उत्तर व दक्षिण कोरियामधील परिस्थितीविषयी त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. 

उत्तर कोरियाशी भारताने बांधलेले संधान - त्या देशाने दक्षिण कोरियाशी बोलणी करून दोन्ही देश विसर्जित करण्यास दिलेली अनुमती हे सर्व जगासाठी धक्कादायक होते. पुढे किम आणि ट्रम्प ह्यांची भेट ठरत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा ही भेट घडवण्यामागे भारताचे प्रयत्न आहेत काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला. बीबीसीने जनरल व्हि. के. सिंग ह्यांची भेट घेऊन प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये त्यांचे विधान छापले आहे. "We can only speculate. Mr Trump does not want to jeopardise his summit meeting. Maybe the Americans are seeking some Indian support to ensure that the summit is saved," says Dr Singh. "India is a bit player here, but is also the only major country in the region that is not a party to the problem but has good contacts with North Korea." (श्री सिंग म्हणाले की (ट्रम्प-किम भेटीविषयी) आपण फक्त अंदाज बांधू शकतो. अर्थातच ट्रम्प ह्यांना शिखर परिषद यशस्वी करायची आहे. ही परिषद बारगळू नये म्हणून कदाचित अमेरिकन्स भारताची मदत घेऊ पाहत असतील. ह्यामध्ये भारत तसा नगण्य असला तरी ह्या प्रदेशातील आम्ही एक प्रमुख देश आहोत - समस्येमध्ये आमचा काही स्वार्थ नाही - आमचे उत्तर कोरियाशी चांगले संबंध आहेत." 

अमेरिका उत्तर ओरिया संबंध सुधारावेत म्हणून ट्रम्प ह्यांनी प्रथमपासून प्राधान्य दिले आहे. किंबहुना रशिया व चीनने ह्याकामी मदत करावी अशी अपेक्षाही कळवण्यात आली होती. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर आपले फारसे वजन तेथील राजवटीवरती नाही असे रशियाने सुचवले तर चीननेही असेच काही सांगत हात झटकले. ह्या नकाराचे पडसाद त्यांच्या अमेरिकेशी असलेल्या संबंधांवरती विपरीत झाले कारण ट्रम्प ह्यांना खरोखरच ह्यात पुढचे पाऊल पडले पाहिजे अशी इच्छा होती व आहे. म्हणूनच जिथे रशिया आणि चीनने हात झटकले तिथे भारताने आपले स्थान काय आहे हे दाखवून तर दिले नाही ना? भारताच्या ह्या दणक्यामुळेच तर चीन आणि रशिया दोन्ही देशांमध्ये मोदी ह्यांनी अनौपचारिक दौरा तर केला नसेल?

ट्रम्प ह्यांचे स्टेट सेक्रेटरी श्री माईक पॉम्पीओ कोरियामध्ये जाऊन आले आणि दोन्ही देशांच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिखर परिषदेची जोरदार तयारी सुरू झाली. पण लहरी किमबद्दल काय सांगणार? आजच्या तारखेला ताज्या बातमीनुसार किम ह्यांनी अमेरिकेला फटकारत आपण भेटीस येऊ शकत नाही कळवले आहे तर ट्रम्प ह्यांनी सुद्धा तसेच एक खरमरीत पत्र प्रसिद्धीस दिले आहे. दरम्यान दक्षिण कोरियाशी झालेल्या बोलण्याला धरून उत्तर कोरियाने आपल्या दायर येथील आपली अणुभट्टी पद्धतशीरपणे उद्ध्वस्त केली आहे असे सांगितले जात आहे. 

ह्या गदारोळाची मुळे नेमकी किती खोलवर गेली आहेत? उत्तर कोरियाकडून नेमका धोका काय आहे? त्यावरती काय उपाय असू शकतो? ह्या प्रश्नांची उत्तरे अर्थातच आज घडाणार्‍या घडामोडींमध्ये मिळत नाहीत. त्यासाठी पुढच्या भागामध्ये थोडी पार्श्वभूमी समजावून घेऊ. 

Sunday 20 May 2018

इराण अफगाणिस्तान पेच


बहुतांशी अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान मधून बाहेर पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर चीन रशिया पाकिस्तान आणि भारतामध्ये अफगाणिस्तान मध्ये इतरांना पाय रोवता येऊ नये म्हणून व्यूहरचना करण्याचे डावपेच चालू आहेत. त्यात भर म्हणून अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणमधील पेच प्रसंग अधिकच गंभीर होत आहे. इराणमधील जनतेचा उद्रेक - रुहानी ह्यांची पुन्हा निवड तसेच ट्रम्प ह्यांनी इराण करारातून अमेरिका बाहेर पडत असल्याची घोषणा केल्यापासून वातावरण पुन्हा ढवळले गेले आहे. आजच्या घडीला युरोप जरी करारामधून बाहेर पडला नसला तरी एकट्या अमेरिकेच्या नसण्याने मोठा फरक पडत असतो.
मध्यपूर्वेमध्ये सुद्धा सौदी प्रणित आघाडीचे आणि इराणचे पटत नाहीच. सीरिया - येमेनमधील संघर्षांसकट अन्य मुद्दे घेऊन चाललेला संघर्ष इस्राएलच्या भूमिकेमुळे अधिक तीव्र होत आहे. ह्या पार्श्वभूमीवरती पुतीन - नेतान्याहू - शी जीन पिंग आणि मोदी ह्यांच्यातील परस्पर भेटींचे गुंतागुंतीचे जाळे चक्रावून सोडणारे आहे.
नेतान्याहू ह्यांनी रशिया तसेच चीनशी संबंध सुधारण्याचे केलेले प्रयत्न - असेच प्रयत्न करणारे मोदी असे ढोबळ स्वरूप असले तरी घटनांचा क्रम बघा - जून २०१७ मध्ये मोदी प्रथम रशियात आणि लगेच नंतर इस्राएलमध्ये - मग ऑगस्टमध्ये नेतान्याहू रशियात - मागोमाग सप्टेंबरमध्ये मोदी ब्रिक्स भेटीसाठी चीन मध्ये हा २०१७ चा क्रम तर २०१८ मध्ये १ जानेवारी रोजी नेतान्याहू् ह्यांचे पुतीन ह्यांच्याशी फोनवरून बोलणे - नंतर जानेवारी १४ ला भारत भेट - लगेच जानेवारी २७ ला रशिया भेट - एप्रिलच्या शेवटाला मोदीची अनौपचारिक चीन भेट आणि आता मे मध्ये रशिया ला अनौपचारिक भेट ही सगळी लगबग कशासाठी चालू आहे असा प्रश्न जरूर पडतो.
रशिया आणि चीनला अमेरिकेची लुडबुड नको आहे - आणि भारताचे व इस्राएलचे अमेरिकेशी साटेलोटे असणे हेही पसंत नाही. पण असेच एकमेकांशी भांडत राहिलो तर आपणच अमेरिकेला लुडबुड करायला संधी देतो - ही वस्तुस्थिती ह्या नेत्यांनी मान्य केली असेल काय? वर्षानुवर्षे सगळेच अमेरिकेच्या लुडबुडीविषयी नाराजी व्यक्त करतात पण एकमेकांपासून संरक्षण हवे तर पुन्हा अमेरिकेकडे जातात ही अवस्था संपवायची असेल तर ह्या देशांनी एकत्र येऊन आपल्यामधील मतभेद मिटवून प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत.
जगाच्या राजकारणावरती जागतिक लिबरल्सचे वर्चस्व आहे आणि ज्याप्रकारे ते सर्वच देशांना आपल्या स्वार्थासाठी खेळवत असतात त्या चक्रव्यूहाला भेद द्यायला सगळे उत्सुक असले तर दोन पावले पुढे पडू शकतात. इराणचा प्रश्न सोडवायचा तर त्यामधला काटा आहे तो खामेनीचा. अफगाणिस्तानचा प्रश्न सोडवायचा तर त्यामधला अडथळा आहे पाकिस्तान चा .
ह्या चार नेत्यांच्या भेटींमधून ह्यावर तोडगा निघेल का? त्याचे स्वरूप काय असेल? ह्याची उत्सुकता आता ताणली जात आहे. बघू या - मोदींच्या सोची भेटीनंतर काय घडामोडी घडतात ते.

Saturday 19 May 2018

अति शहाणा त्याचा बैल रिकामा

बहुमत नसताना कर्नाटक जिंकण्याचा कॉंग्रेसचा डाव काय होता? By hook or crook भाजपच्या हाती सत्ता जाताच नये आणि आपलाच मुख्यमंत्री कर्नाटकात बसला पाहिजे हा दुराग्रह! हे साधण्यासाठी प्रथम स्वतःचे ऐकणारा सभापती लागतो. (फुटणार्‍या सदस्यांची मते स्वीकारायची की त्यांना बडतर्फ करायचे वगैरे निर्णय सभापती घेतो.) नेहमीची प्रक्रिया: आधी गोपनीयतेची शपथ देण्यासाठी प्रोटेम सभापती राज्यपाल नेमतात. शपथ घेऊन झाल्यावरती नवनिर्वाचित सदस्य सभापती निवडतात. अर्थातच ज्या पक्षाकडे बहुमत असते त्याचाच सभापती होतो. अशा तर्‍हेने निवडण्यात आलेल्या सभापतीच्या अध्यक्षतेखाली विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जातो.
नेहमीची प्रक्रिया अनुसरली तर आपण जिंकणार नाही हे माहिती असल्यामुळेच कॉंग्रेसने विविध कारणे सांगत सुप्रीम कोर्टाकडून प्रोटेम सभापती नेमला जावा - आणि बहुमताने निवडलेल्या सभापतीकडून नव्हे तर प्रोटेम सभापतीसमोर विश्वासदर्शक ठराव मांडला जावा - अंग्लोइंडियन सभासद नेमला जाऊ नये असे रडीचे आदेश कोर्टाकडून मिळवल्यावरती कॉंग्रेस गाजरे खात होती. सर्वात अनुभवी सभासद देशपंडे आपलाच असल्यामुळे तोच प्रोटेम होणार आणि त्याच्यासमोर विश्वासदर्शक ठरवा आला की आपल्याला हवा तसा निर्णय आणि सत्ता मिळणार हे गणित होते.
हेच काल मला भाऊने समजावले होते आणि तेच आज पुढे आले आहे.
पण बोपय्या ह्यांची प्रोटेम म्हणून नेमणूक झाल्यावरती क्ँग्रेस स्वतः रचलेल्या सापळ्यात अलगद फसली. आता प्रोटेमने विश्वासदर्शक ठराव आपल्या अध्यक्षतेमध्ये मांडून घ्यावा असा सुप्रीम कोर्टाचाच आदेश असल्यामुळे शेपूट पाचरीत सापडली आहे. पुन्हा एकदा आपणच जी विनंती कोर्टाला केली तीच मागे घेण्यासाठी दुसरा अर्ज करण्याची नामुश्की आली. आता बोपय्या ह्यांची नेमणूक चुकीची आहे असे तुम्ही मांडणर असाल तर आम्हाला त्यांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल (म्हणजेच आज विश्वासदर्शक ठराव मांडता येणार नाही हे कोर्टाने ऐकवल्यावरती शब्द फिरवत ठरावा त्यांच्यासमोर नको असा आदेश द्या म्हणून विनंती करण्यात आली पण त्यासाठी सुद्धा मतदान लांबवावे लागेल असे कोर्टाने म्हटले तसेच राज्यपालाच्या वकिलाने संपूर्ण कामकाजाचे चित्रीकरण कर्नाटकच्या टीव्ही वाहिन्यांवरती दाखवण्यात येत आहे तेव्हा एव्हढी पारदर्शिकताही पुरेशी नाही का असा प्रश्न विचारला. शेवटी सगळ्या चॅनेलना चित्रीकरण द्या अशी विनंती करून तशी ऑर्डर मिळवून बुद्दू वापस घर आये!!
याचाच अर्थ मला हवा तो न्यायाधिश हवा - मला हवा तो सभापती हवा हा हट्ट आहे असा निष्कर्ष काढला तर अयोग्य होईल काय?

इतके झाल्यावरती मूळा मुद्दा हा उरतो की समजा भाजपकडे खरोखरच बहुमत नाही हे सिद्ध झालेच तर यथावकाश कॉंग्रेसला सरकार बनवण्याची संधी मिळालीच नसती असे कुठे आहे? मग खुपते आहे तरी काय? चार दिवस मुख्यमंत्री पदावरती बसलेल्या येड्युरप्पांच्या हाती असे कोणते अधिकार येणार होते की कॉंग्रेसला हातपाय आपटत त्यांना सत्तेवरून खाली खेचायचे होते? येड्युरप्पांशी भांडण का व कशासाठी आहे? आज सरकार टिकले तर ह्याचे उत्तर लवकरच मिळेल. बाकी ज्यांनी हिंदू दहशतवादाचे भूत उभे करण्यासाठी आणि मोदी आणि शहा ह्यांना तुरुंगवास घडवण्यासाठी जी जी कारस्थाने केली ती पाहता मंडळी कोणत्याही थराला गेली तरी नवल वाटायला नको. ह्या प्रकारामध्ये आपल्या प्रतिष्ठेची काळजी ते विसरले आहेत. त्याचे करण एव्हढेच आहे की आपण कसेही वागलो तरी सामान्य जनतेला बहकवणे आणि मते लाटणे सोपे आहे ह्याचा भरवसा आहे आणि तो सामान्य जनता त्यांच्या हाती देत आहे.
वरिष्ठ कायदेतज्ञ श्री कपिल सिब्बल असोत की अभिषेक मनु सिंघवी असोत इतका साधा कायदा जो आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीला कळतो तो त्यांना कळत नाही असे नाही. मग अगदी सुप्रीम कोर्टाला रात्री बेरात्री उठवून चार पाच तास युक्तिवाद करून मी म्हणेन तसेच करून घेण्याचा आग्रह ह्या जाणत्या मंडळींचा असेल ह्यावर विश्वास बसत नाही. अर्थात हा आग्रह आणि ’राजहट्ट’ त्यांच्या अशिलाचा असावा असे दिसते.
कारण आपण भारतामधले एकमेव राजघराणे आहोत आणि राजघराणे म्हणून आपल्या पुत्राला गादीवरती बसायचा हक्क आहे आणि हा कोण टिनपाट मोदी हा हक्क नाकारून आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवत आहे ह्याचे उत्तर मिळत नाहीये. हा अहंकार कुठे घेऊन जाणार आहे कळणे मुश्कील आहे. क्लिओपात्राचे नाक जरा कमी लांब असते तर युद्ध टळले असते असे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. १० जनपथमधली नेहरूव्हियन्सची नाके चांगलीच लांब आहेत वंशपरंपरेने!!

Tuesday 15 May 2018

India’s Strategic Relationship with Oman Increases its Regional Influence

My second article in Political Insights

Here is the link

https://politicalinsights.org/2018/05/15/india-attempts-to-rekindle-ties-with-middle-east-under-modi-2/


Wednesday 9 May 2018

Modi Rekindling Ties with Middle east

My first article has been published in Political Insights - the new media start up.


Here is the link

https://politicalinsights.org/2018/05/08/india-attempts-to-rekindle-ties-with-middle-east-under-modi/


India Attempts To Rekindle Ties With Middle East Under Modi
Prime Minister Narendra Modi, in recent months, has taken steps to revive India’s ties with the Middle East. Swati Torsekar assesses India’s renewed foreign policy towards the Middle East in an attempt to expand its regional influence and power.
BY: SWATI TORSEKAR


Tuesday 8 May 2018

चीनचे एस्केप बटन - वुहान २


Image may contain: 2 people, people smiling, people standing, suit and indoor


श्री राहुल गांधी ह्यांनी "चीनमध्ये आपण नेमकी काय चर्चा केली आहेत?" असे मोदींना विचारणे ही एक बातमी आणि चीनने सुमारे १९०० कोटी डॉलर्स किंमतीच्या औषधावरील आयात कर कमी करणे ही दुसरी बातमी आल्यामुळे वुहान येथील अजेंडा नसलेल्या भारत चीन चर्चेची पुन्हा एकदा दखल घेत आहे. 
चीनसोबतच्या ग्यानबा तुकाराम मधील दिंडीत भारत आणि चीन दोन पावले मागे सरकलेले दिसत आहेत. आणि त्यामागची कारणे काही अध्याहृत आहेत तर काही स्पष्ट आहेत. दोन पावले मागे येण्याच्या तयारीमध्ये भारत असल्याचे चिन्हे दिसतच होती. डॉ. सुब्रमण्यम स्वामी ह्यांची जानेवारी २०१८ मधील यशस्वी चीन भेट - दिल्ली व मुंबई इथे झालेल्या थिंक टॅंकच्या जानेवारी व मार्चमधील बैठकीमधले सूर - परराष्ट्र सचीव श्री विजय गोखले ह्यांच्या हाती सामोपचाराची सूत्रे आणि दलाई लामा ह्यांच्या परिषदेस कोणत्याही मंत्र्याने जाऊ नये म्हणून गोखले ह्यांनी पाठवलेली सूचनावजा नोट ह्या बातम्या बघता येत्या काही दिवसात सूर बदले बदले से दिसणार हे दिसत होते.

प्रथम शी जिनपिंग ह्यांच्या परिस्थितीचा विचार करू. 

१. अमेरिकेने चीनच्या मालावरती वाढीव आयात कर लावल्यामुळे चीनला दणका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या अर्थव्यवस्थेला हा धक्का पचवता येणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२. आशियामध्ये अमेरिकेने भारत आणि जपान ह्यांच्या मदतीने चीनसमोर एक मोठे संरक्षणात्मक आव्हान उभे केले आहे. आशियामधून अमेरिकेचे उच्चाटन करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसली आहे. 
३. अमेरिकेला शह द्यायचा तर अमेरिका - जपान - भारत हे त्रिकूट जितक्या लवकर तुटेल तेव्हढे चीनच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल.
४. पाकिस्तानबाबत अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेमुळे आपले हित खड्ड्यात घातल्याशिवाय आपण पाकिस्तानला वाचवू शकत नाही याची जाणीव शी जिनपिंग ह्यांना झाली आहे.
५. उत्तर कोरिया प्रकरणी चीनने आपला प्रभाव वापरण्यास नकार देत प्रश्न सोडवण्यास अमेरिकेशी सहकार्य केले नसले तरी अन्य मार्ग - आणि खास करून भारताची मदत घेऊन - उत्तर व दक्षिण कोरिया ह्यांच्या एकत्रीकरणाचा विषय दोन पावले पुढे गेला आहे व त्यामध्ये चीनला केंद्रीय स्थान सोडा पण चर्चेपासून दूर ठेवले गेले आहे. हा चीनचा धोरणात्मक पराभव आहे.
६. चीनच्या अंतर्गत राजकारणामध्ये शी जिनपिंग ह्यांचे विरोधक अजूनही नामोहरम झालेले नाहीत. भ्रष्टाचार विरोधी मोहिमेतून शी जिनपिंग ह्यांनी त्यांच्यावरती जीवघेणा चाप बसवल्यामुळे ते चवताळले आहेत. 
७. अंतर्गत अथवा विदेशी व्यासपीठावरती आर्थिक अथवा राजकीय - कोणत्याही मुद्द्यावरती शी जिनपिंग जरा जरी अपयशी ठरले तरी त्यांचे विरोधक उचल खातील आणि अशा बंडाचे परिणाम म्हणून "कम्युनिस्ट परंपरेनुसार" शी जिनपिंग ह्यांना तुरुंगवास अथवा देहदंड ठोठावला जाऊ शकतो. 

आता भारताची परिस्थिती काय आहे ते पाहू.

१. पाकिस्तानमध्ये राजकीय आश्रयाने दहशतवादी कारवाया करणार्‍या गटांवरती एक भूमिका घ्यावी हा भारताचा आग्रह आहे,
२. भारताला एनएसजी मध्ये सदस्यत्व देण्याला चीनने विरोध केला आहे. हा विरोध चीनने विनाअट तात्काळ मागे घेणे भारतासाठी अनिवार्य आहे.
३. युनोच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कयमस्वरूपी सदस्यत्व देण्याला चीननए विरोध केला आहे. हाही विरोध चीनने मागे घेतला पाहिजे ही भारताची मागणी आहे.
४. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेथील पाकप्रणित दहशतवादी गटांना आळा घालणे आणि अफगाणी जनतेला आपले स्वतःचे राज्य करू देणे हा भारताचा पर्याय चीनने स्वीकारावा - थोडक्यात पाकिस्तान अफगाणिस्तानला आपले मांडलिक राष्ट्र करू पाहत आहे आणि हे जोवर होत नाही तोवर त्याला दहशतवादी कारवाया करून जेरीस आणण्याचे षड् यंत्र चालवत आहे. हा प्रकार तात्काळ थांबणे गरजेचे आहे. तसेच अफगाणिस्तानमध्ये भारताचे जे हितसंबंध आहेत त्याला मान्यता देणे गरजेचे आहे.
५. सध्या अफगाणीस्तान विषयात पाकिस्तान - चीन - रशिया एकत्र आहेत. ह्यामुळे अमेरिकेचा पाठिंबा असूनही भारताला अफगाण परिस्थिती अवघड जाण्याची शक्यता आहे. सबब ही युती तोडण्याचे प्रयत्न आवश्यक असून ह्या त्रिकूटातून चीनला बाहेर काढता आले तर केवळ अफगाणिस्तान नव्हे तर इराण प्रश्न हाताळणे सोपे होऊ शकते.

ह्याखेरीज आणखी एक घटक मोदींसाठी डोकेदुखी ठरू शकतो. २०१९ मध्ये ज्या निवडणुका होऊ घातल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आंदोलने आणि अन्य विघातक कृत्ये घडण्याची शक्यता असून ते घडवण्यासाठी पाकिस्तानी आयएस आय आणि लाल बावटावाले माओवादी दोघेही एकमेकांच्या मदतीला आहेत. ह्यामध्ये फूट पाडणे गरजेचे आहे. चीनच्या मदतीने जे विघटनवादी गट भारतामध्ये काम करतात त्यांचे तळागाळापर्यंत काम उभारले गेले आहे. त्यांच्याच दिमतीला शहरी फौजा उभ्या राहिल्या आहेत. आजच्या घडीला मोदी सरकारने ह्या माओवाद्यांविरोधात जी खंबीर मोहिम हाती घेतली आहे तिचा परिणाम म्हणून खेडोपाडीची त्यांची संघटना विस्कळीत होत आहेच. पण चीनने लगाम खेचले तर ते काही प्रमाणावरती थंडावतील.
मग प्रश्न उरेल तो रशियाप्रणित बोल्शेविक गट (खास करून शहरी भागात प्राबल्य) आणि आय एस आय ह्यांच्यातील सामंजस्याचा. 

मोदी चीन दौर्‍यावरती गेले त्या आधी श्रीमती सोनियाजी रशिया दौर्‍यावरती गेल्या तेव्हाच पाकिस्तानचे सेनापतीही रशियामध्ये होते हा योगायोग नाही. गेल्या चार वर्षांमध्ये श्री राहुल गांधी ह्यांनी स्कॅंडिनेव्हियन देशांना भेट देऊन नेमके कोणाशी काय चर्चा केली हे अजून गुलदस्तात असले तरी निवडणूक प्रचारादरम्यान त्याचे तपशील बाहेर येतील ही अपेक्षा आहे. ज्यांना मोदींचे सत्तेमध्ये असणे खुपते आहे त्या सर्व शक्ती हातमिळवणी करणार हे उघड आहे. तेव्हा ह्यांच्या प्रयत्नांमधून चीनला बाहेर काढण्यात यश आले तर तेव्हढाच एक शत्रू कमी अशी अवस्था आहे. चीनचा पाठिंबा निखळला तर राहुलजी अस्वस्थ होणे अगदी स्वाभाविक नाही का?

परिस्थितीचे हे विश्लेषण जर अचूक असेल तर इथून पुढच्या काळामध्ये चीनची मदत नसल्यामुळे पंगु झालेले विरोधक बघायला मिळतील आणि मोदी विरोधाची सूत्रे नॉर्वेमधून हलवली जातील असे म्हणता येईल.

वुहानमध्ये चीनने एस्केप बटन दाबून तात्पुरता का होई ना पण मोदींशी तह केला आहे व त्याच्यानुसार पावले टाकण्यास सुरुवातही केली आहे असे काळ  जाईल तसेतसे अधिकाधिक स्पष्ट होत जाईल.