Monday 14 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग २

रोगाची लागण चीनच्या सर्वदूर प्रांतामध्ये (तिबेट वगळता) झाल्याचे दिसल्यामुळे भारतीय दूतावासाने २६ चा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही रद्द केला होता. २९ जानेवारीपर्यंत अमेरिकेने आपल्या वुहानमधील दूतावासामधले तसेच शहरामध्ये अन्यत्र राहणारे १००० नागरिक मायदेशी नेले होते. दक्षिण कोरिया आणि फ्रान्सही अशीच योजना कार्यान्वित करत होते. इथे भारतात आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले. ३० जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संस्थेने ही साथ म्हणजे जागतिक आणीबाणी असल्याचे जाहीर केले. पण भारताने तर त्या आधीच नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. भारतीय दूतावासाने कसे अथक प्रयत्न करून भारतीयांना मायदेशी आणले त्याची कथा मार्च २०२० मध्ये द मिंट या वृत्तपत्राने छापली. २०१४च्या  बॅचमधील ३३ वर्षीय दीपक पद्मकुमार या दूतावासातील अधिकाऱ्याने वुहान शहरामध्ये राहून भारतीयांशी संपर्क करून त्यांना परत आणण्यामध्ये मोलाची कामगिरी केली. वुहानमध्ये पाऊल टाकायलाही कोणी धजावत नव्हते तेव्हा दीपकने तिथे जाण्याचे धाडस दाखवले आणि आपल्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. असे म्हणतात की वुहान शहरामधल्यालोकांना वकिलातीने कुठे जमायचे आहे ते कळवले. जवळ जवळ एक आठवडा शहरामध्ये लॉक डाउन होता त्यामुळे भारतीयांना विमानतळावर पोचणे  सोपे नव्हते. त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवल्या गेल्या. विमानाची सोय आधीच करण्यात आली होती. आपल्याला असे दिसून येते की शुक्रवारी संध्याकाळी विमान वुहान मधून निघायला  हवे होते पण ते शनिवारपर्यंत उडू शकले नाही. यामध्ये अडवणूक कशी झाली याची कथा माहिती नाही. भारताने एक फ्लाईट केवळ वुहानमधील नागरिकांसाठी सोडली होती. वुहान ज्या हुबे प्रांतात येते त्यामध्ये आणखी नागरिक अडकले होते. त्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी एक फ्लाईट शनिवारी सोडण्यात आली. तर अशा अडचणींवर वकिलातीला मात करायची होती. सुमारे २००० भारतीय नागरिकांना अशा परिस्थितीमध्ये मायदेशी आणणे सोपे नव्हते. ते सरकारने करून तर दाखवलेच पण जितक्या चपळाईने मोदी सरकारने ही पावले उचलली त्याने आश्चर्यचकित व्हायला होते. जेव्हा रोगाच्या भीषणतेचे गांभीर्य लपवण्यात चीन सरकार गुंतले होते तेव्हा मोदी सरकारने संकटाच्या स्वरूपाची कल्पना कशी केली असेल? 

एकीकडे चीन सरकार साथीच्या रोगाबद्दल फारसे काही गांभीर्य दाखवत नव्हते तर दुसरीकडे अमेरिका फ्रान्स दक्षिण कोरिया भारत सरकार मात्र तातडीने आपल्या नागरिकांना चीन मधून बाहेर काढण्याचे प्रयत्न का करत होते? आपल्या नागरिकांना चीनमध्ये धोका आहे असे त्यांना केवळ "वाटत" होते की त्यांची तशी खात्री पटली होती बरे? आणि खात्री पटलीच असेल तर ती कशामुळे? त्यांनी असे काय वेगळे पाहिले - अनुभवले होते की त्यांना अशी आणीबाणीची पावले उचलावीशी वाटत होती? अर्थ आणि संकेत उघड आहेत. चीन सरकारने कितीही माहिती दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाभयानक रोगाच्या आगमनाची बातमी केवळ वूहान नव्हे तर अन्य शहरातही जनसामान्यांपर्यंत पोचली होती. आणि हेच माहितीचे ओघ वेगवेगळ्या दूतावासांपर्यंत पोचत असावेत. 

Wechat app असो किंवा अन्य मार्गानी - हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि मृत पावणाऱ्या नागरिकांच्या बातम्या पसरत होत्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्सदेखील रोगाला बळी पडत आहेत हे बघितले जात होते. एखादा रोगी आढळला तर तो राहत असलेल्या संपूर्ण इमारतीला टाळे ठोकले जात होते. नागरिकांनी बंड करू नये म्हणून सुरक्षायंत्रणा सज्ज केली गेली होती. शहरामधली आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्याची जाणीव होत होती. शहरामधली वाहतूक बंद केल्यामुळे लोकांना गरजेच्या वस्तूही मिळेनाशा झाल्या होत्या. आरोग्यसेवेत काम करणाऱ्या लोकांकडून प्रथमदर्शनी समाचार लोकांपर्यंत येत होता. सगळे दबलेल्या आवाजात असले तरी बातम्या पसरतच होत्या. घडतंय ते काहीतरी वेगळे आहे - महाभयंकर आहे - ही काही नेहमीची साथ नाही याची जाणीव होत होती. मृत्यूचे प्रमाणही मोठे असावे म्हणूनच लोक जागृत दिसत होते. मुख्य म्हणजे जनसामान्यांमधल्या या भावना जाणून घेण्यात परकीय सरकारच्या व्यवस्थांना यश आले असावे अन्यथा चिनी सरकारतर्फे अधिकृतरीत्या कोणतीही बातमी नसूनही इतकी निर्णायक पावले झपाट्याने उचलली गेली याला काहीही सबळ कारण उरत नाही. 

इथेच लक्षात येते की भारतीय दूतावासाच्या तिथे जाळे किती घट्ट विणले गेले आहे आणि संकटसमयीसुद्धा प्रभावीपणे काम करू शकले होते. १९८९ साली जेव्हा तियान आन मेन चौकामध्ये बंद करून उठलेल्या तरुणांना रणगाड्याखाली चिरडण्यात आले होते तेव्हा पाश्चात्य माध्यमे त्याच्या अतिरंजित कथा छापत होते. पण भारतीय वकिलात मात्र अत्यंत संयमी आणि वास्तववादी अहवाल मायदेशी पाठवत होते अशी आठवण त्या काळी चीनमधील दूतावासात काम करणारे व पुढील आयुष्यात परराष्ट्र सचिव झालेल्या श्री विजय गोखले यांनी नमूद केली आहे. "वृत्तपत्रांवर अवलंबून न राहता आम्ही तरुण अधिकारी चीनच्या विद्यापीठांमधून फिरलो व तेथील विद्यार्थ्यांचे मत अजमावून  घेऊन मग आमचे अहवाल पाठवत होतो. विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रत्यक्ष विद्यापीठामधील वातावरणावर या घटनांचा काय परिणाम झाला आहे याची छाननी करून मग पाठवलेले अहवाल प्रचारकी थाटाचे नव्हते तर सर्वात जास्त वास्तववादी होते" असे गोखले म्हणतात. साधारणपणे अशीच अवस्था देशाने २०२० साली बघितली आहे असे दिसते. फरक एवढाच  की  १९८९ साली पाश्चिमात्य माध्यमे अतिरंजित अहवाल छापत होते तर २०२० साली चीनने मिंध्या करून ठेवलेल्या या माध्यमांनी सत्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे चीनमधील हाहाःकाराच्या कोणत्याही बातम्या म्हणजे अफवा असल्याचे ही माध्यमे २०२० साली कोविदची साथ उसळली असताना आपल्याला ठामपणे सांगत होती. 

चीनमध्ये पसरलेल्या झाल्यामुळे येणाऱ्या बातम्यांची छाननी करून मोदी सरकार अत्यंत सावधपणे वागले आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित राहावेत म्हणून त्याने अथक प्रयत्न केले याची नोंद सर्व जगाला घ्यावी लागली.  योग्य वेळी उचललेल्या सावधगिरीच्या पावलांमुळे पहिल्या लाटेमध्ये कमीतकमी  नुकसान आपल्या वाट्याला आले. गंमत अशी की आज मात्र एकामागोमाग एक खुलासे येत आहेत त्यातून जाणवते की साथीच्या दाहकतेची जाणीव असूनही या बाबी जगापासून लपवल्या गेल्या. त्यामध्ये जसे चीन सरकार होते तसेच काही डेमोक्रॅट्स आणि लिबबू माध्यमे. पण एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती ही की भारत सरकारकडे मात्र याची तंतोतंत माहिती असावी. आणि ती तशी आहे याची चीनला कल्पना आली असावी. दोनच दिवसां पूर्वी  मी एक विडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये असे सांगितले गेले आहे की चीनने अमेरिकन सीआयए चे अनेक अधिकारी पकडून तुरुंगात डांबल्यामुळे चीनच्या भूमीवरून गुप्त माहिती मिळवणे सीआयएला अशक्य झाले होते. असेच जर असेल तर ही गुप्त माहिती कोण बरे काढत होते? कोणाकोणापर्यंत ती पोचवली जात होती? त्यासाठी सहकार्य करण्याचे करार पाळले जात होते की "कागदाबाहेर" येऊन हे सहकार्य केले जात होते? कोविद १९ च्या तडाख्यातून भारत सावध व्हायच्या आत म्हणजे एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसात चीनचे सैन्य उत्तर सीमेवर आक्रमक पावले उचलू लागले होते. लॉक डाउनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेला भारत लष्करी प्रत्त्युत्तर देणार नाही हा आडाखा होता की भारताकडे असलेली "माहिती" त्याने चीनविरोधात "वापरू" नये म्हणून दिलेला हा इशारा होता याचे उत्तर काळच देणार आहे. (जब भी कभी कोई आवाज मेरे खिलाफ जोर से आती  है तो समझ लेना मोदी ने चाबी टाईट कर दी है.......)

ली मेंग यान याना सुखरूपपणे हॉंगकॉंग मधून बाहेर काढले - त्यांना अमेरिकेत नेण्यात आले - त्यांच्याकडे जी माहिती होती तिची कल्पना कोणाकोणाला होती? ली मेंग यान यांच्याप्रमाणेच अन्यही काही व्यक्ती अशा प्रकारची माहिती देत होत्या का? भारतीय वकिलातीने यामध्ये काही कामगिरी बजावली काय हे प्रश्न उत्सुकता वाढवणारे आहेत. आणि ट्रम्प यांचा पराभव झाला तरी जी माहिती बाहेर आली नव्हती ती आता अचानक का बाहेर येऊ लागली आहे आणि ही माहिती बाहेर आणण्याचा सूत्रधार कोण आहे - त्याचे लक्ष्य काय आहे याची उत्तरे काढायची तरी कशी? असो! जसजशी परिस्थिती वळणे घेईल तसतसा अंदाज येत जाईल. गेल्या वर्षी केलेल्या विडिओ मध्ये मी म्हटले होते की कोविद १९ म्हणजे चीनसाठी चेर्नोबिल ठरू  शकतो. त्या माझ्या भाकिताचे काय होणार याचेही उत्तर कालौघामध्ये जवळ येत आहे असे वाटत आहे. 

कोंबडे झाकून ठेवले म्हणून पहाट व्हायची थांबत नाही. कधी ना कधी बिंग फुटणारच होते. बायडेन यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न निकालात काढला की उर्वरित तीन वर्षे बिनधोकपणे राज्य करता येईल असा बेत असावा. प्रश्न आता इतकाच उरला आहे की याचे खापर कोणावर फुटणार आहे - अमेरिकेत डेमोक्रॅट्स यासाठी चीनला जबाबदार धरणार की ट्रम्प तात्यांना? याचे उत्तर उण्यापुऱ्या नव्वद दिवसात मिळणार आहे. जर चीनला जबाबदार धरण्याचा डाव असेल तर ९० दिवस पूर्ण होण्याआधीच चीनमध्ये सत्ताबदलाच्या हाका ऐकायला मिळतील. आणि जर ट्रम्प तात्यांना दोषी ठरवण्याचे घाटत असेल तर चक्रव्यूहाची रचना हळूहळू तशी होताना दिसेल.

Friday 11 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग १

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय?

भाग १

 कोविड १९ चा उगम नेमका कुठे झाला - त्याच्या प्रादुर्भावासाठी चीन जबाबदार आहे का - माणसाकडून माणसाकडे याचा संसर्ग आणि प्रादुर्भाव होतो हे माहिती असूनही ही माहिती चीनने जगापासून लपवून ठेवली का - आपल्या देशांतर्गत लोकांना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जाऊ देण्यास प्रतिबंध घालणाऱ्या चीनने आपल्या व अन्य नागरिकांच्या परदेश प्रवासावर बंदी का घातली नाही असे प्रश्न आज उपस्थित झाले आहेत. शिवाय काही मान्यवर आणि विश्वसनीय शास्त्रज्ञांनी याबाबत विशेष माहिती दिली होती तिची प्रकाशात आणली गेली नाही असे आता दिसून येत आहे. या सर्वांमध्ये पंतप्रधान मोदी यांची कामगिरी विशेष उठून दिसत आहे. त्याविषयी थोडे लिहिते आहे.

या संसर्गजन्य रोगाची लक्षणे आणि त्याचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव बघून डिसेंबर २०१९ मध्येच वुहान शहरामधील डॉक्टर्स भयचकित झाले  होते. न्यूमोनियाचा हा प्रकार त्यांनाही नवा होता. आणि येणाऱ्या रोग्यांना नेमकी काय औषध योजना करावी याच्या बुचकळ्यात ते पडले होते. साहजिकच डॉक्टर्सच्या मित्रगटांमध्ये त्याची दबक्या आवाजात का होईना चर्चा चालू होती. त्यामध्येच होते एक डॉक्टर लिन वेन लियांग. साधारणपणे २५ डिसेंबरच्या आसपास त्यांनी आपल्या डॉक्टर मित्रांना याची माहिती देऊन सावध राहण्यास सांगितले. या वेळेपर्यंत ४०-५० पेशंट दाखल होऊनही त्यावर अधिकृत खुलासा दिला गेला नव्हता. लिन यांनी वी चॅट या व्हाट्सअप सदृश चिनी ऍप वरती  हा संदेश देऊन दोन तीन दिवस झाले नसतील की तेथील पोलिसांनी त्यांना बोलावणे पाठवले. आपण हा संदेश का लिहिलात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यांनी उत्तर देऊनही पोलिसांचे समाधान झाले नाही. अखेर २८ डिसेंबर  आसपास या डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. शेवटी दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यांना सोडण्यात आले. यातून अन्य डॉक्टर्सना प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात आले होते. शिवाय ३० डिसेंबर रोजी प्रथमच चीन सरकारने अधिकृतरीत्या नव्या प्रकारच्या न्यूमोनियाचे रोगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत असे जाहीर केले. सोबतच ह्या रोगाचा प्रसार माणसाकडून माणसाकडे होत नसल्याचे सांगण्यात आले होते. या खुलाशामधून रोगाचे गांभीर्य कितपत आहे ते डॉक्टर्सना तसेच लोकांनाही समजणे कठीण होते.

याच दरम्यान म्हणजे चीन सरकारने ३० डिसेंबर रोजी खुलासा केल्यानंतर  १ जानेवारी रोजी हॉंगकॉंगमध्ये याच विषयावर काम करणाऱ्या डॉक्टर ली मेंग यानना त्यांच्या वरिष्ठांनी बोलावून घेतले व ह्यामध्ये काय माहिती मिळते ते तपासून बघ असे सांगितले. ली मेंग यान यांनी शास्त्रीय पद्धतीने आपला शोध चालू ठेवला. ते करत असताना आपल्या डॉक्टर सहकाऱ्यांशी खास करून वुहान संस्थेमध्ये काम करणाऱ्या परिचितांशीही त्या बोलत होत्या, तेव्हा त्यांच्या अनेक गोष्टी ध्यानात येत गेल्या. अखेर गुणसूत्रांचा अभ्यास केल्यावर १६ जानेवारी रोजी त्यांनी हे अनुमान काढले की हा व्हायरस नैसर्गिक नाही - तो कोणत्याही प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे माणसाला झालेला नाही - हा व्हायरस प्रयोग शाळेत "बनवला" गेला आहे. त्याच्या एकूण सुमारे ३०००० पैकी ३००० गुणसूत्रांमध्ये बदल केला गेला आहे ज्या बदलामुळे त्याची दाहकता वाढली आहे असे त्यांच्या लक्षात आले होते.  ह्या बाबीचा त्यांनी अधिक कसून तपास केला. अखेर आपल्या वरिष्ठांकडे हा विषय त्यांनी काढला. १९ जानेवारी रोजी वरिष्ठांनी त्यांना हा विषय बाजूला ठेव व अमुक अमुक विषयावर लक्ष केंद्रित कर म्हणून सांगितले. एक प्रकारे ली मेंग यान याना त्या तपासातून बाहेर काढण्याचा विचार वरिष्ठ करत होते असा त्यांचा समज झाला होता.

ली मेंग यान यांचे हे काम चालू होते तोवर जगामध्ये अन्य पावले उचलली जात होतीच. एकीकडे चीन सरकारने नव्या न्यूमोनियाच्या रोग्यांची भरती झाल्याची कबुली दिली होती तर दुसरीकडे वुहान प्रयोगशाळेची सूत्रे हाती घेण्यासाठी एका चिनी लष्करी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आले. ही बाब धक्कादायक होती. एका वैद्यकीय संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेच्या सर्वोच्च पदावर लष्करी अधिकारी नेमण्याचे प्रयोजन काय होते? की ही प्रयोगशाळा चिनी लष्करासाठी जैविक हत्यारे बनवण्याचे काम करत असल्यामुळे या संकटसमयी तिची सूत्रे सांभाळण्यासाठी आणि नको ती गुपिते बाहेर पडू नयेत म्हणून कडक शिस्त अमलात आणण्यासाठी एका कठोर लष्करी अधिकाऱ्याला तिथे आणावे लागले होते? एकंदरीत व्यवसायाने केवळ डॉक्टर असलेली मंडळी इथून पुढे संस्थेचा कारभार हाकण्यात कमी पडतील अशा अंदाजाने हे पाऊल उचलले गेले असावे.

५ जानेवारी रोजी पहिल्यांदाच ट्विटर वरती गार्बो गुरुंग नामक व्यक्तीने कोविड १९ च्या संदर्भातले एक ट्विट टाकले.

"18 years ago, #China killed nearly 300 #HongKongers by unreporting #SARS cases, letting Chinese tourists travel around the world, to Asia specifically to spread the virus with bad intention. Today the evil regime strikes again with a new virus.

"१८ वर्षांपूर्वी चीनने सार्स रोगाविषयी माहिती दडपून ठेवून दुष्ट हेतूने आपल्या नागरिकांना जगभर फिरू दिले त्यातून  ३०० हॉंगकॉंगवासी जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता एका नव्या व्हायरसचा हल्ला ह्या सत्तेने आपल्यावर केला आहे" अशा अर्थाचे हे ट्विट होते. त्यामुळे अनेक जण बुचकळ्यात पडले. कारण या वेळपर्यंत रोगाच्या भीषण स्वरूपाची कोणालाच कल्पना आली नव्हती. २३ जानेवारी रोजी प्रथमच डेली मेल या वृत्तपत्राने एक लेख छापला होता.  वुहान सदृश प्रयोगशाळेमधून एखादा भीषण व्हायरस निसटू शकतो असा इशारा शास्त्रज्ञांनी २०१७ साली दिला होता असे या लेखामध्ये म्हटले होते. २६ जानेवरीच्या वाशिंग्टन टाइम्सच्या अंकामध्ये वुहान येथील प्रयोग शाळेमधून कोविड १९ व्हायरसचा प्रसार झाला असण्याची शंका व्यक्त केली गेली होती. याच दिवशी लॅन्सेट या प्रतिष्ठित सायन्स मासिकामध्ये सुमारे ४० ख्यातनाम शास्त्रज्ञांनी व्हायरसचा उगम वुहानच्या मच्छी बाजारात झाला नसल्याचे म्हटले होते.

या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरती भारत सरकार काय करत होते हे पहिले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

२७ जानेवारी रोजी केरळच्या त्रिसूर गावामध्ये एक २० वर्षीय युवती सुका खोकला व घसा दुखत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरकडे गेली. तिला ताप आलेला नव्हता तसेच श्वास पण लागलेला नव्हता. पण २३ जानेवारी रोजी तिने  वुहान शहर ते  कुमिनटांग शहर असा प्रवास ट्रेनने केला होता. आणि प्रवासामध्ये तिला स्टेशनवर आणि ट्रेन मध्ये अनेक प्रवासी खोकल्यामुळे बेजार झालेले दिसले होते. २६ तारखेपर्यंत तिला कोणताही त्रास नव्हता. ती कोणत्याही कोविड रोग्याच्या संपर्कात आल्याचे तिला आठवत नव्हते. तसेच ती वुहानच्या (भविष्यात प्रकाशझोतात आलेल्या) मच्छी बाजारातही गेली नव्हती.

ही बातमी येण्याच्या एक दिवस आधी बिझिनेस स्टॅंडर्ड या वृत्तपत्राने बातमी छापली होती की  वुहान शहरामध्ये सुमारे २५० भारतीय अडकले असून भारत सरकार त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी चीन सरकारच्या संपर्कात आहे. या तारखेपर्यंत चीनमध्ये मृतांची संख्या ५६ झाली होती आणि २००० हुन अधिक व्यक्तीना रोगाची लागण झाली होती, त्यामध्ये सुमारे २३ जण परदेशी नागरिक होते. २६ जानेवारी रोजी भारतीय दूतावासाने तिसरी हॉट लाईन चालू केली होती त्यावर सुमारे ६०० कॉल्स येऊन गेले होते. वुहान शहरामध्ये लॉक डाउन  २३ जानेवारी पासून लागू झाला  होता. चीनच्या अन्य १२ शहरांमध्ये हे हीच दक्षता घेतली जात होती त्यामुळे या शहरांमधूनही भारतीय नागरिक अडकले होते. साधारणपणे जानेवारी शेवटचा आठवडा व फेब्रुवारी पहिल्या आठवड्यामध्ये चीनमध्ये चिनी नव्या वर्षाचा सोहळा धुमधडाक्यामध्ये साजरा केला जातो त्या निमित्ताने मिळालेली सुट्टी पकडून अनेक भारतीय  विद्यार्थी दोन आठवड्यापूर्वीच मायदेशी परतले होते. २३ जानेवारी पासून लागू झालेल्या लॉक डाउनच्या कचाट्यातून ते सुटले होते तरी काही विद्यार्थी मागे  रेंगाळले होते. ते आता मायदेशी परतण्यास अधीर झाले होते. साथीच्या रोगाचे नियंत्रण करणाऱ्या चिनी संस्थेच्या डॉक्टर्सनी सांगितले होते की हे विद्यार्थी भारतात परतले की त्यांना हॉस्पिटल  मध्ये ठेवण्याची गरज नाही, नुसते घराबाहेर न पडण्याचे बंधन पुरेसे ठरेल. त्यांना रोगाची काही लक्षणे दिसली तरच हॉस्पिटलमध्ये वेगळे ठेवावे.  हा सल्ला तरी कितपत बरोबर होता - खरे तर दिशाभूल करणारा होता हे भविष्यात दिसून आले.

भाग २ पुढे चालू