Sunday 28 May 2017

ड्युरांड लाईनची कालबाह्यता

Image result for durand line




ड्युरांड लाईनची कालबाह्यता

नुकतेच युरोपियन संसदेच्या बातम्या देणार्‍या EPTODAY ह्या संकेतस्थळावरती संसदेचे उपाध्यक्ष पोलिश - ब्रिटिश नागरिक श्री. रिझार्ड झारनेकी यांनी ब्रिटिशांनी आखलेली ड्युरांड लाईन कालबाह्य झाली असून तिचा फेरविचार होणे गरजेचे आहे असे मत १२ मे २०१७ रोजी मांडले आहे. पाक - अफगाण सीमेवरती वारंवार घडणार्‍या धुमश्चक्रीच्या बातम्या हेच दर्शवतात की झारनेकी यांनी एका महत्वाच्या विषयावर केलेले प्रतिपादन आपण समजून घेतले पाहिजे.

५ मे रोजी अफगाणिस्तानने चमन सीमेजवळ चढवलेल्या हल्ल्यामध्ये ११ पाकिस्तानी ठार झाले तर ७ मे रोजी पाकिस्तानने केलेल्या चढाईमध्ये २ अफगाण नागरिक ठार झाले असे वृत्त होते. १९४७ साली ब्रिटिश भारतीय उपखंडातून बाहेर पडले तेव्हा NWFP प्रांतातील पश्तून लोकांना पाकिस्तानमध्ये अजिबात जाण्याची इच्छा नव्हती. पश्तून लोकांच्या निष्ठा धर्माकडे नसून आपल्या राष्ट्रा  कडे होत्या. पाकिस्तानातील पंजाबी मुसलमानांवरती त्यांचा विश्वास नव्हता. पश्तूनी लोकांना भारतामध्ये घ्या म्हणून त्यांचे नेते खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी असा लकडा गांधी - नेहरू यांच्याकडे लावला होता. परंतु ब्रिटिशांनी त्यांचे ऐकले नाही. तीच परिस्थिती बलुचिस्तानची आहे.

अफगाणिस्तानमध्येही पश्तून लोकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणून निर्मितीपासूनच अफगाणिस्तानने ड्युरांड लाईन कधीच मान्य केली नाही. अगदी पाकिस्तानप्रणित तालिबानांचे राज्य होते तेव्हाही पाकिस्तानने तीन वेळा प्रयत्न करूनही अफगाणिस्तानच्या एकाही सरकारने ही सीमा मान्य केलेली नाही.

१९४७ नंतर आताच्या परिस्थितीमध्ये येथील पश्तूनांमध्ये पाकिस्तानी पंजाब्यांबद्दल रोष कमी न होता वाढीला लागला आहे. १९४७ नंतर पाकिस्तानने कोणत्याही प्रकारे ह्या NWFP प्रदेशामध्ये विकासाचे नावही पोचणार नाही अशी व्यवस्था राबवली आहे. तसेच मधल्या पश्तूनांना अफगाण पश्तूनांची मदत मिळू नये म्हणून अफगाणिस्तानमध्ये कोणतेही सरकार स्थिर राहणार नाही ह्यासाठी वाटेल त्या थराला जाऊन कारवाया केल्या आहेत. होता होईल तितका पाकिस्तानने आपल्या जिहादी कारवायांसाठी मरायला तयार असलेल्या पश्तूनांचा वापर करून घेऊन त्यांच्या जीवावरती आपले NWFP प्रदेशामध्ये वर्चस्व कायम राहावे म्हणून धोरण राबवले आहे. अफगाण सरकार अस्थिर ठेवण्याच्या नादामध्ये पाकिस्तानने हाच NWFP प्रदेशही तेव्हढाच अस्थिर ठेवला आहे. इतका की इथले नागरिक मुक्तपणे अफगाणिस्तानमध्ये येऊन जाऊन असतात आणि त्यांना अडवणारी कोणतीही यंत्रणा तिथे नाही. अफगाणिस्तानमधून होणारे हल्ले थांबवण्यासाठी आता पाकिस्तानने तिथे कुंपण बांधण्याचे ठरवले आहे.

ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. जोपर्यंत ड्युरांड लाईन हीच आंतरराष्ट्रीय सीमा आहे हे जग मान्य करते तोपर्यंत पाकिस्तान आपल्या कारवाया चालूच ठेवणार आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती अस्थिर ठेवून आपल्या कह्यात कशी राहील याचा प्रयत्न करणार हे उघड आहे. पाकिस्तानला ह्या भागामध्ये शांतता असावी असे अजिबात वाटत नाही. मध्या आशियाकडे जाण्याचा मार्ग आपल्या ताब्यात असावा ह्या वेडाने त्याला झपाटले आहे आणि आज चीनही ह्याच भूमिकेला पाठिंबा देत आहे. अगदी आताआता पर्यंत पाश्चिमात्य देशांनी आणि अमेरिकेनेही ब्रिटिशांच्या घोडचुकीवर आपले शिक्कामोर्तब केले आहे.

अफगाणिस्तानमधील शांतता आज पाश्चिमात्य देश आणि अमेरिकेसाठीही अग्रक्रमाची ठरली आहे. तिथे जोवर शांतता नाही तोवर अमेरिकेला तिथले सैन्य पूर्णपणे काधून घेता येणार नाही. शिवाय प्रचंड राजकीय असंतोषामधून निर्माण होणार्‍या सामाजिक असंतोषाचा परिणाम म्हणून अफगाणिस्तानमधून निर्वासितांची रीघ पश्चिमेकडे लागली आहे. २०१५ साली सिरियामधून पश्चिमेकडे गेलेले निर्वासित ३६२००० होते तर अफगाणिस्तानमधून गेलेले १७५००० होते. यामध्ये सिरियाचा नंबर पहिला तर अफगाणिस्तानचा दुसरा लागतो.

NWFP ची भूमी अजूनही मुजाहिदीनांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते. सप्टेंबर ११ च्या हल्ल्याचे नियोजन इथूनच झाले. २००१ नंतर मूळ प्रश्नाला हात घातला गेला नाही. म्हणून अफगाण प्रश्न लांबत गेला आहे. झारनेकी म्हणतात की पाश्चिमात्य जगताला आपल्या अफगाण धोरणाचा पुनर्विचार करणे ही अत्यावश्यक बाब झाली आहे. अफगाणिस्तानमध्ये पैसा ओतून अपेक्षित विजय मिळणार नाही. तिथे शांतता नांदली तरच काही हाती लागेल ही बाब महत्वाची आहे असे झारनेकी म्हणतात.

झारनेकी यांनी स्पष्ट सांगितले नाही तरी आपण त्यात लपलेला अर्थ समजून घेतला पाहिजे. पाश्चात्यांचे अफगाण धोरण फसले आहे कारण त्यांचे पाकिस्तान धोरण फसले आहे. तेव्हा अफगाण धोरण बदलायचे म्हणजेच पाकिस्तान धोरण बदलावे लागेल् असे वस्तुनिष्ठ विचार झारनेकी यांनी मांडले आहेत. युरोपियन युनियनच्या उपाध्यक्ष पदावर बसलेल्या ह्या महत्वाच्या व्यक्तीकडून केले गेलेले हे विश्लेषण भारतासाठी अर्थातच उपयुक्त आहे हे सांगायला नको.

१९७९ साली अफगाणिस्तानमधील रशियनांना हुसकावून बाहेर काढण्याच्या अमेरिकन धोरणाला श्रीमती इंदिराजींनीही विरोध केला होता. तुम्ही जी शस्त्रे रशियाशी लढण्यासाठी देत आहात ती भारताविरुद्ध वापरली जात आहेत असे बजावून सुद्धा अमेरिकेने त्याकडे ढुंकून बघितले नाही. रशियाच्या बंदोबस्तासाठी चीनशीही दोस्ती केली. आज त्याची फळे हे पाश्चात्य भोगत आहेत. कोणताही डेमोक्रॅट अध्यक्षाने ह्या धोरणामध्ये बदल करण्याचा विचारही केला नसता. आज ट्रम्प साहेब कदाचित असा विचार करतील ही अंधुक का होईना आशा आहे. किंबहुना परिस्थितीच असा बदल घडवायला कारणीभूत ठरेल.

एका बाजूला अफगाणिस्तान तर दुसरीकडे इराण पाकिस्तानच्या सीमेवरती धुमश्चक्री च्या बातम्या येत आहेत. भारतीय बाजू तर आपल्याला चांगलीच माहिती आहे. सगळीकडून घेरला गेला तरी खुमखुमी जात नाही कारण चीन आपल्या पाठीशी आहे ही मस्ती आहे. ही मस्तीच पाकिस्तानला कुठे घेऊन जाईल हे स्पष्ट आहे.

Saturday 27 May 2017

झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की

Image result for brzezinski zia



श्री. झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की यांचे २६ मे २०१७ रोजी निधन झाले. ब्रेझेझिन्स्की हे अमेरिकन राष्ट्रध्यक्ष जिमी कार्टर यांच्या राजवटीमध्ये म्हणजे १९७७ ते १९८१ या कालावधीमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत होते. ब्रेझेझिन्स्की यांच्या कार्यकाळामध्ये तैवान प्रश्नावर चीनची भूमिका स्वीकारत सामंजस्य घडवणे - स्ट्रेटेजिक आर्म्स लिमिटशन ट्रीटी २ -   इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादात आणि इज्राएलचे पंतप्रधान मेनाचेम बेगिन यांजबरोबर आपसातील वैर मिटवण्यासाठी पहिले पाऊल टाकणारा कॅम्प डेव्हिड करार - इराणमधील उलथापालथ आणि अमेरिकेचा दोस्त असलेला शहा याची उचलबांगडी करून अयातोल्ला खोमेनी सत्तारूढ होणे - अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्य घुसणे - पाकिस्तानच्या मदतीने जागतिक जिहादसाठी अमेरिकेने दिलेला सर्वंकष पाठिंबा ह्या पुढच्या चार दशकांवर प्रभाव पाडणार्‍या ठळक घटना घडल्या.

’द ग्रांड चेस बोर्ड’ या १९९७ मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकामध्ये चीन सोडाच पण भारत पाकिस्तानशी सुद्धा युद्ध जिंकू शकत नाही असे धक्कादायक विधान त्यांनी केले होते. अण्वस्त्रे आहेत म्हणून कोणी युद्ध जिंकत नाही. त्यासाठी संपूर्ण संरक्षण धोरण असावे लागते. भारताने युद्धसामग्री भरपूर जमवली आहे. आणि त्याच्याकडे सैन्य सुद्धा आहे. पण आपल्या संरक्षणासाठी शत्रूबद्दलची पुरेशी जाण - त्याच्यापासून कोणत्या प्रकारचा आणि किती धोका आहे याचा अंदाज - युद्ध कुठे छेडले जाऊ शकते आणि कसे लढले जाईल या व अशाच इतर गोष्टींबद्दलचे भारताचे ज्ञान तोकडे आहे आणि त्यामध्ये आमूलाग्र बदल आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. म्हणूनच भारताकडे लष्करी जमवाजमव आहे पण सामर्थ्य नाही ही कटू वस्तुस्थिती आपल्याला वारंवार निदर्शनास येते. १९६२ च्या लढाईमध्ये अचानक झालेल्या आक्रमणानंतर सावरलेल्या भारतीय सैन्याने जुळवाजुळव केली होती पण तोपर्यंत चीन माघारी परतला होता. १९७१ मध्ये मार्च महिन्यात सैन्याने बांगला देशात कूच करावी म्हणून इंदिराजींनी श्री मानेकशा यांच्याकडे चर्चा केली असता या प्रकारच्या कारवाई साठी आपले सैन्य तयार नाही असे स्पष्ट उत्तर मानेकशा यांना द्यावे लागले. प्रत्यक्षात त्यांनी पुढे नऊ महिने तयारीसाठी घेतले. पाकिस्तानची सहा लाखाचे फौज भारताच्या तेरा लाखाच्या फौजेला डरत नाही हे आपण बघतो. तीन दशकांपुरते प्रॉक्सी वॉरचा सामना करूनही आपल्याकडे त्यावर दमदार धोरणातक उत्तर नाही हेच चित्र प्रामुख्याने पुढे येते. कारगिल युद्धाच्या वेळी सैन्याला आपली कुमक कार्यरत करायल इतका वेळ लागला की त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवरती गवगवा केला आणि भारताला खेळी करण्याच्या स्वातंत्र्यावर बंधने आली. आजदेखील पाकिस्तान किंवा चीन एखादे छोटे युद्ध भारतावर लादेल - मोठे नाही - असे मोठ्या मुत्सद्दीपणे इथले विद्वान सांगत असतात. हे देश छोटे युद्ध का करणार याचा अर्थ इथे समजून येतो. छोट्या युद्धासाठी प्रत्युत्तर देण्याची क्षमता भारतीय सैन्याकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. (ती क्षमता निर्माण करण्याचे काम मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सुरु झाले आहे. तसेच केवळ Defensive नव्हे तर offensive-defensive असा पवित्रा असावा असे म्हणणारे दोवल जुने धोरण बदलत आहेत. हे चुटकीसारखे होत नाही. तयारी पूर्ण होईपर्यंत म्हणजे १९७१ सारखा आज संयम दाखवावा लागेल)

जगामध्ये अण्वस्त्रांच्या प्रसारावरती निर्णायक रोख लागू शकली नाही कारण संपूर्ण जगाचे हित लक्षात घेऊन अमेरिकेने प्रामाणिकपणे हे प्रयत्न केले नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. अलिकडच्या काळामध्ये म्हणजे ओबामा सत्तेवर असतानाच २०१५ साली वाढते ओबामा - मोदी संबंध पाहता ब्रेझेझिन्स्की यांनी इशारा दिला होता की अमेरिकेने भारताशी फार जवळीक केली तर रशिया दुरावण्याचा धोका आहे. ज्यांनी अफगाणिस्तानमधून रशियाला हटवण्यासाठी जीवाचे रान केले तो निरीक्षक अमेरिकेने रशियापासून फार दूर जाऊ नये असे मत मांडतो हे बघितले तर उच्च पदावरील व्यक्तीला पूर्वग्रह दूर ठेवून विचार करावा लागतो हे कळेल.

ब्रेझेझिन्स्की यांच्यासारखे विद्वान भले भारताचे मित्र नसतील पण त्यांच्या लिखाणामधूनही आपल्याला दिशा मिळू शकते. भारतीय परंपरेनुसार त्यांना श्रद्धांजली.

सोबतच्या छायाचित्रामध्ये जनरल झिया यांच्या बाजूला उभे असलेले कार्टर आणि मागे उभे असलेले झिबग्नियो ब्रेझेझिन्स्की

Wednesday 24 May 2017

काही गेल्या दिवसातील लहानमोठ्या पोस्टस्

२२ मे २०१७

ट्रंप साहेबांनी काल सौदी अरेबियाला घसघशीत मदत देऊ केली आहे तसेच इराणला घेरण्यासाठी पाठिंबा दिला आहे. भारतासाठी ही बातमी चांगली नाही. एकतर इराण हा आपला धोरणमित्र आहे. त्याला पाठिंबा देणारा रशिया भारत द्वेष्टा नाही. अमेरिकेचे लक्ष मध्यपूर्वेत गुंतले तर चीनचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्या कडे बँडविड्थ उरत नाही. सारांश आपली लढाई आता आपल्यालाच लढायची आहे फक्त स्वबळावर कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता.


२१ मे २०१७

रहस्यमय कागदपत्र

आंतरराष्ट्रीय कोर्टाची न्यायकक्षा कोणत्या परिस्थितीमध्ये भारत मान्य करतो आणि त्याचे अपवाद काय आहेत याचे सविस्तर घोषणापत्र   कोर्टासमोर भारताने १९७४ मध्ये दिले आहे. पाकिस्तानने जे घोषणापत्र १९५७ मध्ये दिले आहे त्यामध्ये जवळ जवळ ६० वर्षे काहीच बदल केला नव्हता.  नवे घोषणापत्र जे दिले गेले त्यानुसार कोर्टाची अधिकार कक्षा ज्या शब्दात दिली गेली त्यामध्ये कुलभूषण जाधव ही केस बसू शकली. तारीख आहे २९ मार्च २०१७!!!! हे कोर्टापुढे ठेवण्याचे काम श्रीमती मलिहा लोधी यांनी केले. यानंतर दोनच आठवड्यामध्ये पाकिस्तानी लश्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली.  म्हणजेच २९ मार्च २०१७ चे घोषणापत्र नसते तर भारताचे म्हणणे कमकुवत ठरले असते.

पाकिस्तान बार कौन्सिलचे माजी उपाध्यक्ष डॉ. फरोघ नसीम म्हणतात की घोषणापत्र देण्याची चूक तर अक्षम्य आहेच पण ती सुधारायची संधीही पाक सरकारने गमावली आहे. नसीम म्हणतात की भारताने तिथे खटला दाखल केल्यानंतर पाकिस्तानला दोन गोष्टी करता आल्या असत्या - एक तर आपले घोषणापत्र मागे घेणे आणि खटल्यामध्ये सामिल होण्यास नकार देणे. परंतु तसे न करता शरीफ सरकारने न्यायालयासमोर पेश होण्याचा मार्ग स्वीकारला म्हणून आज पाकिस्तानमधील काही गट सरकारवर जबर टीका करत आहेत. लाहोर बार कौन्सिलने शरीफ यांनी एक आठवड्यात राजिनामा द्यावा म्हणून मागणी केली आहे. न केल्यास २००७ पेक्षाही मोठे (म्हणजे मुशर्रफ यांना घालवण्यासाठी केले त्यापेक्षा मोठे) आंदोलन करू म्हणून धमकी दिली आहे. नसीम यांच्या विचाराशी पाकिस्तानचे माजी ॲडिशनल ॲटॉर्नी जनरल तारीक खोकर सहमत आहेत. खोकर हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे गाढे अभ्यासक समजले जातात. खोकर म्हणतात की आंतरराष्ट्रीय कोर्ट म्हणजे एक प्रकारचा लवाद आहे. इथे आपल्या पसंतीच एक न्यायाधीश दोन्ही पक्ष देऊ शकतात. भारताने आपल्या हक्काचा उपयोग करून एक न्यायाधीश सुचवला. पण पाकिस्तानने मात्र असे केलेच नाही.

२००८ साली - म्हणजे यूपीए सरकारने पाक सरकार बरोबर केलेल्या एका करारानुसार सुरक्षा विषयक बाबी उभयतांमध्ये सोडवल्या जातील असे ठरवले होते. पाकिस्तानने आपली केस ह्याच एका मुद्द्यावर भर देऊन लढवली. परंतु भारताने व्हिएन्ना कन्व्हेन्शन ऑन कॉन्सुलर रिलेशन्स VCCR नुसार केस चालवली आणि हा मुद्दा कोर्टाने मान्य केला.

मग काय वाटते तुम्हाला - नेमके भारताला हवे तेव्हा आले ना घोषणापत्र? पाकतर्फे वकील कोण होता? पाकतर्फे न्यायाधीश नेमला गेला का? हे सगळे आपसूक घडले ना? ओ हमनवाझ!!! ओ हमनऽऽऽऽवाझ!!!

(तळटीप: भारताच्या १९७४ च्या घोषणापत्र नुसार खास करुन काश्मिर समस्या कोर्टाच्या कक्षेमध्ये येत नाही आणि या बाबतीत आपण अशी कक्षा मान्य करणार नाही असे स्पष्ट करणारे हे घोषणापत्र आहे. नसीम म्हणतात की भारताने कक्षा मान्य न केल्यामुळेच आजवर काश्मिर प्रश्नावर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा मामला म्हणूनच पाकिस्तान येथे आणू शकलेला नाही.)


काल भारताचे वायुदलप्रमुख धानोवा यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनेवरचा पीटीआयचा एक ट्वीट पोस्ट केला होता.

याअगोदर काही भारतीय माध्यमातून पाकिस्तानची अण्वस्त्रे कुठे आहेत यावर सॕटेलाईट फोटो छापले होते.

चीन No First Use हे तत्व पाळत नाही मग भारतही हे तत्व बदलेल का अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगत असे. पण असा काही प्रस्ताव नसल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.

सहसा गुप्त ठेवण्यात येणारी ही माहिती जेव्हा प्रसिद्धीस दिली जाते तेव्हा त्यामागे काही वेगळे हेतू असतात.




२० मे


न्या. भंडारी यांचे जोड निकालपत्र

नुकताच आंतरराष्ट्रीय कोर्टाने कुलभूषण जाधव प्रकरणामध्ये भारताच्या बाजूने निर्णय दिला. आता पाकिस्तान ह्या कोर्टाकडे नव्याने सुनावणी व्हावी म्हणून अर्ज करणार आहे. मूळ निर्णय खंडपीठावरील सर्व न्यायाधीशांनी एकमताने दिला होता. परंतु भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी आपले एक स्वतंत्र निकालपत्रही जोडले आहे. ह्यामध्ये काही मुद्दे अधिक विस्तारपूर्वक मांडले आहेत.

न्या. भंडारी यांनी हे नमूद केले आहे की कुलभूषण जाधवला नेमके कुठे पकडले - पाकिस्तानात की पाकिस्तानबाहेर - यावर भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये दुमत आहे. भारताने १३ वेळ लिखित परवानगी मागूनही भारतीय दूतावासाला त्याला भेटू देण्यात आले नाही तसेच त्याच्यावरती काय खटला चालवला जात आहे आणि आरोप काय ठेवण्यात आले आहेत याची कागदपत्रे मागूनही भारताला देण्यात आली नाहीत हे विशेष निकालपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या कायद्यानुसार आपल्याला देण्यात आलेल्या शिक्षेवरती पुनर्विचार व्हावा अथवा मृत्यूदंडाबाबत दयेचा अर्ज करता येईल हे श्री भंडारी यांनी नमूद केले आहे. परंतु स्वतः जाधव यांजकडून अशा प्रकारचा अर्ज करण्यात आला आहे किंवा नाही ह्याबद्दल स्पष्टता नाही असे ते म्हणतात. जाधव यांच्या आईने मात्र हे दोन्ही अर्ज पाकिस्तान कोर्टाकडे भरले आहेत असेही भंडारी यांनी म्हटले आहे.

२००८ साली भारत - पाकिस्तान यांजदरम्यान उभयतांच्या वकिलातींना तुरुंगात असलेल्या आपल्या नागरिकांना भेटण्याविषयी जो करार करण्यात आला त्याचा आधार व्हिएन्ना करारच असल्याचे नमूद केले आहे. ह्या करारामुळे सदर कोर्टाच्या अधिकारकक्षेमध्ये कोणताही बदल झाल्याचे भंडारी यांनी अमान्य केले आहे. सदर बाब व्हिएन्ना करारामध्ये अंतर्भूत असून भारताचा हा हक्क पाकिस्तानने डावलला असल्याचे भारताचे म्हणणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाधव यांच्या प्रकरणामध्ये भारताने जे अधिकार असल्याचे म्हटले आहे ते वाजवी आहेत कारण कुलभूषण जाधव हा निःसंशय भारतीय नागरिक आहे - त्याला परकीय देशामध्ये अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर त्या परराष्ट्रामध्ये खटला चालवून शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. अजूनही ह्याबाबतच्या अर्जांची सुनावणी चालू असल्यामुळे वकिलातीला त्याला भेटण्याचा अधिकार वाजवी ठरतो.

आंतरराष्ट्रीय खटल्यामध्ये अंतरिम ऑर्डर देण्याची तातडी आहे का ह्या प्रश्नाचा विचार करताना श्री भंडारी यांनी नमूद केले की ह्या कोर्टाचा निकाल येण्यापूर्वी जाधव यांना फाशी होणे संभाव्य आहे हा खरा धोका असल्यामुळे अशी तातडी वाजवी ठरते.

न्या. भंडारी यांच्या ह्या विशेष निकालपत्रामुळे भारताची बाजू अधिक स्पष्ट होण्यास प्रचंड मदत झाली आहे. खटल्यामधल्या पुढील सुनावणीमध्ये ह्या मुद्द्यांचा भारताला उपयोग करून घेता येईल.





१९ मे २०१७


घटनांचा क्रम बघा:

२२ एप्रिल - पनामा पेपर्स केसचा निकाल शरीफ यांच्या विरोधात गेल्यावर लाहोर वकील संघटनेचा आंदोलनाचा इशारा. शरीफ यांच्या राजिनाम्याची मागणी. २००७ पेक्षाही तीव्र आंदोलन छेडू म्हणून ताकीद

२९ एप्रिल - डाॕन वृत्तपत्राने छापलेल्या गुप्त माहिती साठी त्यांच्या वर कारवाई तसेच शरीफ यांचे परराष्ट्र संबंधी सल्लागार तारिक फातेमी यांना सरकारने काढून टाकले

२९ एप्रिल - एका तासात सैन्याचा खुलासा - सरकारची कारवाई अपुरी आणि अमान्य

;२९ एप्रिल - इम्रान खाननेही शरीफ यांच्या राजिनाम्याची मागणी केली

२९ एप्रिल - पत्रकार संघाने जाहीर केले की डाॕनवरील कारवाई अमान्य

५ मे - रावळपिंडी पोलिसांनी शरीफवर एफ आय आर दाखल केला - आरोप??- लोकांना सैन्याविरोधात भडकावणे - सैन्याबद्दल द्वेष निर्माण करणे

५ मे - पाकमध्ये नवे 'नागरी' सरकार यावे म्हणून सैन्य प्रयत्नशील

१८ मे - सैन्य म्हणते आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय अमान्य - consular access देणार नाही

१८ मे - पंजाब प्रांताचे गव्हर्नर आणि शरीफ यांचे बंधू म्हणतात कोर्टाचा आदेश पाळला जाईल

कुलभूषण पंजाब प्रांतातील तुरुंगात आहे का?

नवाझ शरीफ वि सैन्य संघर्षात शरीफ त्यांना पुरून उरतील का???

शरीफ विजयाला वाव नक्कीच आहे, परिणाम?????



१९ मे २०१७




Dialogue is the only way forward अशा थापा ज्यांनी १० वर्षे ऐकवल्या त्यांचा काय जळफळाट झाला असेल विचार करा.

आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल डावलण्याचे पाक सैन्याने ठरवले आहेच. तेव्हा पाकिस्तानात नागरी सत्ता वि. सैन्य हा संघर्ष आता तीव्र होईल.

प्रत्यक्षात शरीफना किती लवकर डच्चू देण्यात येईल ते परिस्थिती वाव देईल तसे ठरत जाईल. पण दिशा मात्र तीच राहील.





१८ मे २०१७


 आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय भारताच्या बाजूने लागल्यामुळे पाकिस्तान कैचीत आल्यासारखे सर्वांना वाटत आहे. हे एक अर्धसत्य आहे. ह्या प्रश्नावरती पाकिस्तानी नागरी सत्ता आणि सैन्य ह्यांचे पटत नाही. जसजशी  युद्धमय परिस्थिती जवळ येत आहे तसतसे सैन्याला नवाझ शरीफ यांची 'अडचण' होत आहे. शरीफ यांना राजकीय दृष्ट्या पाचरीत पकडण्यासाठी सैन्य उतावीळ आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मानण्याकडे नागरी सत्तेचा कल असेल तर कुलभूषणवर छद्मी खटला चालवण्याचे नाटक करणाऱ्या सैन्याला तो लवकरात लवकर फाशी गेलेला बघायचा आहे. कारण तसे झाले तर शरीफ यांचे नाक सर्वांसमक्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर कापले जाईल. कोर्टाचा निर्णय आपण मानत नाही कारण हा पाकिस्तानच्या सुरक्षेचा प्रश्न आहे असेच सैन्य म्हणणार. आणि सैन्याकडे दुर्लक्ष करून त्याला भारताकडे सोपवण्याचा निर्णय शरीफ यांनी घेतलाच तर सैन्य बंड करून शरीफ यांना सत्तेवरून खाली खेचू शकते. अशी नाटके पाकिस्तान मध्ये नेहमीच पहायला मिळतात.

पण आता भारताचे पंतप्रधान मोदी आहेत हे सैन्याने विसरू नये. अशा प्रकारचा आततायी निर्णय सैन्याने घेतलाच तर तो आत्मघातकी ठरेल. याआधी बांगला देशात आपले सैन्य कोणत्या निकषावर घुसवता आले त्याची आठवण ठेवा.

दरम्यान कुलभूषण हेर नसून सामान्य नागरिक असल्याची भूमिका भारताने पहिल्यापासून घेतली ती हाच इशारा स्पष्टपणे देण्यासाठी की अदलाबदल करायचीच तर भारताच्या ताब्यातील पाकच्या कोणत्याही हेराबरोबर होणार नाही.

एक विजय नोंदवलाय! शुभारंभ झालाय.



१६ मे  २०१७




काही गोष्टी सुचल्या त्या अशा.

- पाकिस्तान रशिया चीन हा त्रिकोण एकत्र आला आहे.
- तिघांनाही आशियामधून अमेरिकेची हकालपट्टी करायची आहे.
- तिघांनाही अफगाणिस्तान पाकव्याप्त काश्मीर वर सत्ता हवी आहे
- इराण अफगाणिस्तान भारत ह्यांचे बलुचिस्तानबाबत एक विचार आहेत
- चीन रशियाच्या एवढी लष्करी तयारी भारताकडे नाही कारण गेल्या २५ वर्षात शस्त्र खरेदीवर विरामच होता जेमतेम चार दिवसीय लढाईची क्षमता उरली आहे
- चीन रशिया आर्थिक दृष्ट्या आपल्या पेक्षा बलाढ्य आहे
- अमेरिका आपल्याला मदत करेलच असे नाही

मग भारताने पंगा ओढवून घ्यावा का? कोणाचीच मदत नसताना अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांशी युद्ध छेडावे का?

सगळा हिशेब आतबट्ट्याचा दिसला तरी पटते का बघा

- आपले संरक्षण आपण करायचे आहे
-  दुसऱ्यावर या बाबतीत विसंबता येत नाही
- आज लढला नाहीत तर मांडलिकत्व कपाळी येईल
- नैतिक बळ आणि धैर्य आपल्या बाजूचे असताना घाबरण्याची गरज नसते
- सर्वस्व गमावलेला अफगाणिस्तान ३८ वर्षाच्या युद्धानंतरही लढायला उभा आहे आपण तर खूप सुस्थितीत आहोत




Monday 15 May 2017

यशस्वी परराष्ट्र धोरणाची गुरुकिल्ली

मे २०१४ मध्ये श्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचे शपथ घेतली तेव्हा सगळ्या भारतीयांच्या आशा एका अत्युच्च शिखरावरती पोहोचल्या होत्या. श्री मोदीजी मात्र आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे होते. 'पहिल्या' कारकीर्दीमध्ये नेमके काय साधायचे आहे याचा जणू स्पष्ट आराखडा त्यांच्या मनामध्ये तयार होता. देशांतर्गत योजना - उद्दिष्टे साध्य करायची तर परराष्ट्रनीती कशी हवी यावर संपूर्ण धोरण तयार होते. प्रचारादरम्यान दिलेल्या मोजक्या मुलाखतींमध्ये ते म्हणाले होते की भारताची परराष्ट्र नीती "न आँखे झुकाकर न आँखे उठाकर बल्की आँखों से आँखे मिलाकर" चलायी जायेगी. अर्थ स्पष्ट होता कोणापुढे दबणार नाही - कोणाला वाकवणारही नाही पण मित्रत्वाच्या नात्याने बरोबरीच्या नात्याने संबंध जुळवण्यास आम्ही अनुकूल आहोत. खरे तर निवडून येईपर्यंत मोदींना माध्यमामधले विचारवंत असोत की राजकारणी असोत - कोणी गंभीरपणे घेतच नव्हते. त्यामुळे त्यांच्या ह्या वक्तव्याकडे कोणाचे फारसे लक्षही गेले नाही. पण निवडणुकीमध्ये भारतीय जनतेने चमत्कार घडवला आणि इंदिराजींच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच देशामध्ये पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन होणार याचा डंका देशविदेशामध्ये घुमला. शपथविधीच्या वेळी भारताच्य सर्व शेजारी राष्ट्रांना आमंत्रण देऊन आपल्या कारकीर्दीची भारदस्त सुरुवात मोदींनी केली तेव्हा काही तरी वेगळे घडते आहे याची नोंद व्हायला सुरुवात झाली. आजवर कोणत्याही पंतप्रधानाने शपथविधीच्या पहिल्याच दिवसापासून शेजारी राष्ट्रांशी अर्थपूर्ण बोलणी करण्याचा प्रयत्नही केला नव्हता.

भारताचे एके काळचे परराष्ट्रमंत्री श्री नटवर सिंग श्रीमती सोनिया गांधींवर नाराज होते. तेही निवडणुकी आधी मोदींना भेटले होते. तुम्ही मोदींना काय सल्ला दिलात असे विचारल्यावर श्री सिंग म्हणाले - शेजार्‍यांपासून सुरुवात करा असे मी त्यांना म्हणालो. शेजार्‍यांपासून सुरुवात करा ह्या सल्ल्याचा अर्थ आणि महत्व काय ते कोणी सिंग यांना विचारले नाही आणि समजून घेतले नाही. त्याचे गम्य होते अर्थातच यूपीए सरकारच्या दहा वर्षांच्या कारकीर्दीमध्ये शेजार्‍यांशी बिघडलेल्या संबंधांमध्ये. श्रीलंका - पाकिस्तान - बांगला देश - म्यानमार - भूतान - नेपाळ या देशांवर एके काळी भारताचा वचक होता. भारतीय उपखंडातले देश आपल्या पेक्षा बलाढ्य असलेल्या भारताशी अदबीने वागत. पण यूपीए च्या काळामध्ये हेच कमकुवत देश ’कितने पानी में हो पेहचान गये’ अशा अर्थाने भारताकडे बघू लागले होते. त्यांच्या मधल्या अनेकांना चीन आपल्या पंखाखाली - खरे तर आपल्या वर्चस्वाखाली - घेत होता. श्रीलंका म्यानमार बांगला देश ह्यांनी पाचारण करून सुद्धा भारताने त्यांची नाविक बंदरे बांधण्यामध्ये स्वारस्य दाखवले नव्हते. अखेर चीनने डाव साधत ह्या देशांशी करार करून भारताला हिंदी महासागरामध्ये घेरण्याची सज्जता पुरी करत आणली होती. चिरकूट पाकिस्तान तर भारताला हाड हाड करत उडवून लावत होता. आम्हाला हात लावायचीही तुमची लायकी नाही अशीच वागणूक भारताला मिळत होती. एकीकडे २६/११ सारखे हल्ले आपण पचवत होतो आणि आमचे सरकार शर्म अल् शेख पासून पाकिस्तानच्या तालावर नाचत - सियाचेन मधून सैन्य मागे घ्यायला - काश्मिरातून सैन्य छावणीत परतवण्यास आणि अंतीमतः त्यांच्या हाती काश्मिरची सूत्रे सोपवायला अधीर झाले होते. ’अमन की आशा’ चा नग्न तमाशा आपण नागरिक हातावर हात चोळत - सहदेवा अग्नी आण रे म्हणत - उघड्या डोळ्याने बघत होतो. शेजारी देश जर आपल्याला हडूत तूडूत करतील तर अमेरिका - ब्रिटन रशियाने काय करावे? तेही तागडीत तोलायला बसलेच होते. छे छे - आता ते दिवस आठवले तरी अंगावर शहारा येतो ना?

सुरुवात शेजार्‍यांपासून करा हा सल्ला सिंग यांनी दिला आणि मोदींनी तो प्रत्यक्षात अशा ताकदीने उतरवला की सर्व जग अचंबित होऊन आता पुढे काय म्हणून सरकारच्या हालचालींकडे उत्सुकतेने बघू लागले. यानंतर अमेरिका खंडापासून ते ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत मोदींनी विलक्षण वेगाने परिस्थिती अशी बदलून टाकली की जग भारताकडे सन्मानाने बघू लागले. केवळ सन्मानाने नव्हे तर जगाला काही दशके छळणार्‍या ज्या समस्या आहेत त्यामध्ये नव्या दृष्टीने बघून तोडगा काढण्याच्या कामी भारत काही सुचवतो आहे याची दखल घेतली जाऊ लागली. युनो सारखी संस्था - तिच्यात बदल केले नाहीत तर कालबाह्य आणि संदर्भहीन बनून जाईल ही रास्त भीती व्यक्त करणारे मोदीच होते. या अगोदर भारतावर करण्यात आलेल्या अनेक अन्यायाला वाचा फोडण्याचे काम मोदींनी समर्थपणे जागतिक व्यासपीठावर करून दाखवले. त्यामधले काही ठळक टप्पे बघण्यापूर्वी मला एक विचार मांडावासा वाटतो.

स्वच्छ भारत - डिजिटल इंडिया - मेक इन् इंडिया - स्टार्ट अप इंडिया - स्किल इंडिया ह्या योजना भारतांतर्गत विकासकामे म्हणून हाती घेताना त्यांना मोठा हातभार लागेल अशा तर्‍हेने परराष्ट्र धोरण त्यामध्ये पूर्णपणे एकत्रित करण्याचे अवघड काम मोदींनी करून दाखवले आहे. आजपर्यंत परदेशांशी केलेल्या करारांमध्ये देशाची सुरक्षितता वगळता अन्य सर्व करार हे या योजनांचे पाऊल पुढे कसे पडेल - वेगाने कसे पडेल याचा विचार करून बांधण्यात आले आहेत. देशांतर्गत नीती आणि परराष्ट्र नीती यांचा असा सुरेख संगम यापूर्वी बघायला मिळाला नव्हता. आणि हे सर्व करत असताना मोदींनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाची मोहिनीच जणू जगातील प्रमुख नेतृत्वावर टाकली होती. सारख्याच पार्श्वभूमीमधून सत्तेवर आलेल्या ओबामा यांच्याशी त्यांनी व्यक्तिगत सूर जमवले तसेच चीनचे पंतप्रधान शी जिन् पिंग आणि जपानचे पंतप्रधान शिन्झो आबे यांच्याशीही. आणि आमचे फेकू सेक्यूलर काहीही म्हणोत पण अगदी नवाझ शरीफ यांच्याशीही व्यक्तिगत पातळीवर मोदी यांनी उत्कृष्ट सूरसंवाद साधला. 

पाण्यामध्ये मासा जितक्या सहजतेने वावरतो तसे मोदी यांनी परराष्ट्र नीतीचे क्षेत्र आज पादाक्रांत केले दिसते. असे करत असताना आमूलाग्र बदल करत यशाची कोणती शिखरे गाठली हे बघणे खरोखरच उत्कंठा वाढवणारे आहे. सुरुवात करू या अर्थातच अमेरिकेपासून. भारताच्या सार्वभौमत्वाला आज जर कोणाकडून धोका असेल तर तो आहे आपला दुष्ट शेजारी चीन याच्याकडून. चीनचे धोरण भारताशी मैत्रीच्या नात्याने जुळवून घेण्याचे नसून भारताला आपली कॉलोनी - वसाहत बनवण्याचे आहे. आणि जमेल तितक्या लवकर भारतावर सार्वभौमत्व गाजवण्याचे आहे. ह्याकामी चीनला पाकिस्तान सढळ हस्ताने मदत करतो आणि चीनची शक्ती वाढवण्याचे काम पार पाडतो. एका बाजूने अमेरिकेला आपण अफगाणिस्तानात शांतता राबवण्यासाठी भरीव कामगिरी पार पाडू शकतो असे अमेरिकेच्या मनावर ठसवणारा पाकिस्तान प्रत्यक्षात चीनला जितका जवळ आहे तितका अमेरिकेला नाही. याचे कारण असे की दोघांचेही भारतविषयक उद्दिष्ट सामाईक आहे. चीनची आर्थिक आणि लश्करी ताकत भारतापेक्षा मोठी दिसते निदान कागदोपत्री तरी. म्हणूनच भारताला सर्व बाजूने घेरण्याचे काम चीनने पूर्ण करत आणले आहे. आशियामध्ये एक नंबरचे स्थान मिळवण्याच्या त्याच्या ध्येयाआड फक्त भारतच उभा आहे. आशियामध्ये एक नंबर मिळाला तर अमेरिकन वर्चस्व उखडून टाकायला आपल्याला फार वेळ लागणार नाही असे चीनच्या मनामध्ये आहे. चीन असा बिलंदर आहे हे भारताने जाणणे - ते अमेरिकेला पटवणे - आशिया खंडाचा विचार करता अमेरिका आणि भारत यांची उद्दिष्टे एकच आहेत - असावीत - तेच परस्परांच्या हिताचे आहे ह्या भूमिकेमधून मोदी सरकारने आपले अमेरिका धोरण आमूलाग्र बदलले. आजवर चीनकडून धोका आहे हे ठामपणे मांडायला आपण लाजत होतो - ह्या कामी केवल अमेरिकाच आपल्या मदतीला येउ शकते हेही मान्य करायला आपल्या जीवावर येत होते. मोदींनी ही वस्तुस्थिती न बुजता स्वीकारली आणि भारताच्या हितासाठी उघडपणे अमेरिकेशी हात मिळवायचे धाडस केले. ह्यामधूनच लेमोआ सारखा करार होऊ शकला. ह्या व्यतिरिक्त युनोच्या सुरक्षा समितीमध्ये भारताला कायमचे पद मिळावे म्हणून अमेरिकेने भूमिका घ्यावी हे प्रयत्न मोदींनी केले आणि अमेरिकेचे मन वळवण्यात त्यांना यश आले. शिवाय न्यूक्लीयर सप्लाय गटाचे सभासदत्वही असेच महत्वाचे आहे. एनएसजी चे आपण सभासद झालो तर आण्विक तंत्रज्ञान आपण अन्य देशांना पुरवू शकू यामध्ये व्यापाराच्य प्रचंड संधी उपलब्ध असल्यामुळेच चीनने हे सभासदत्व भारताला मिळू नये म्हणून भूमिका घेतली आहे. एकूणच चीनला शह म्हणून केवळ अमेरिकेशी हातमिळवणी करून मोदी शांत बसले नाहीत. ऑस्ट्रेलिया - जपान - व्हिएतनाम - काम्पुचिया - थायलंड तसेच चीनच्या डोक्यावर बसलेला मंगोलिया आदि देशांशी बोलणी करून चीनने संघर्ष लादलाच तर भारत हाच आपला एक भरवशाचा साथीदार असू शकतो असा आत्मविश्वास आज या देशांमध्ये निर्माण केला आहे. ही फार मोठी उपलब्धी आहे.

दुसरा ठलक फरक जाणवतो तो मध्यपूर्वेतील देशांशी असलेल्या संबंधांबाबत. एका बाजूला इराण असो की सौदी दोन्ही टोकाच्या देशांना आज भारत आपला मित्र वाटू लागला आहे. त्याचाच परिणाम म्हणून दुबईमध्ये मंदिराला परवानगी - आरतीच्या मंगल समयी तेथील राजपुत्राची उपस्थिती तर सौदी मध्ये पतंजली योगाचे शिबिर आणि त्याचा प्रसार ह्या अशक्य कोटीमधल्या गोष्टी आहेत असे अगदी आपल्या डोळ्यासमोर घडले तरी आपल्याला वाटत आहे. हीच संधी साधून मोदी सरकारने मध्यपूर्वेतील पैसा बॅंकेच्या मार्गाने पाठवला तर त्यावर अतिरिक्त अधिभार पडणार नाही असा करार करून घेतल्यामुळे आता मध्य पूर्वेमधील सर्व देशांमध्ये राहणारे नागरिक आता पैसा बॅंकेच्या मार्गाने पाठवू लागले आहेत. पूर्वी हा पैसा हवाला मार्गाने फिरवला जात होता. अतिरिक्त कर रद्द करवून घेऊन मोदी यांनी जवळजवळ वर्षाकाठी सुमारे ७००० कोटी डॉलर्स एवढ्या प्रचंड रक्कमेचे व्यवहार बॅंकेतर्फे करवून आणण्याला चालना मिळाली आहे. 

मध्य पूर्वेतील मोदी सरकारचा पराक्रम इथेच संपत नाही. आज मध्य पूर्व पेटली आहे. तिथे शिया विरुद्ध सुन्नी असा उघड आणि सशस्त्र संघर्ष सुरु आहे. सौदी अरेबिया आणि त्याच्या मित्र देशांना अरबस्तानाची भूमी सुन्नीच्या ताब्यात असावी असे वाटते तर इराण इराक सीरिया या शियाबहुल देशांना आपले वर्चस्व तिथे प्रस्थापित करायचे आहे. लष्कराबाबत आज इराणकडे अणुबॉम्ब असल्यामुळे त्याचे पारडे जड आहे. अन्य मुस्लिम देशांकडे अणुबॉम्ब नाही याची त्यांना खंत आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाची त्यांना काळजी आहे चुकून इराण ने हल्ला केलाच तर आपल्याला कोणी वाली नाही अशी त्यांची समजूत आहे ह्याबाबतीत पाकिस्तानने आपल्याला मदत करावी अशी सौदी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांची इच्छा आहे आजवर पाकिस्तानला जी मदत दिली अगदी अणुबॉम्ब बनवण्यासाठीही ह्या देशांनी पैसे ओतला त्याची परतफेड करण्याची वेळ अली आहे. पण शिया सुन्नी वादामध्ये आपण एकाची बाजू घेतली तर स्वतः च्याच देशामध्ये हा संघर्ष तीव्र होईल आणि आपणही त्यामध्ये संपून जाऊ अशी भीती पाकिस्तानच्या मनात आहे म्हणून उघड उघड मदत करायला पाकिस्तान अधे वेढे घेतो त्याच्या ह्या वृत्ती मुळे सौदी सकट अन्य सुन्नी देश नाराज आहेत. इतरही काही बाबतीमध्ये सौदीचे दिवस फिरले आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांमधल्या घसरत्या तेल दरामुळे सौदी कडे येणार पैशाचा ओघ कमी झाला आहे. त्याचे तेलाचे साठे ही फार काळ टिकणार नाहीत दुसरीकडे सौदीने आपल्या नागरिकांना अवाच्या सवा सवलती देऊन ठेवल्या मुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार हळूहळू असह्य होत चालला आहे. १९६० साली सौदीची लोकसंख्या चाळीस लाख होती तारा आता ३ कोटी सत्तर लाख झाली आहे. शिवाय यामधले जेमतेम २६% लोकांना लिहिता वाचता येते. अशा परिस्थितीमध्ये सौदी अरेबिया एका प्रकारच्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्याचे जीवन तेल उत्पादनावर अवलंबून आहे ते शाश्वत नसल्यामुळे धडपड करून आपल्या देशामध्ये अन्य मार्गाने पैसे कमावण्याच्या संधीचा शोध सौदी घेत आहे. सौदी खेरीज मध्य पूर्वेमधले अन्य देश देखील तिथे चालू असलेल्या यादवीने मेटाकुटीला आले आहेत त्यात भर म्हणून अमेरिकेत श्री ट्रम्प अध्यक्ष झाले असून त्यांनी इस्लाम संदर्भात घेतलेली स्पष्ट भूमिका मध्य पूर्वेला भिववून सोडत आहे. ह्याच संधीचा फायदा घेऊन मोदी सरकारने मध्य पूर्वेमध्ये आपले बस्तान बसवले आहे. म्हणून मोदी यांनी जी SUN COUNTRIES कल्पना मांडली त्यानुसार ज्या देशांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो त्यांनी सौर ऊर्जेच्या उत्पादनामध्ये अग्रेसर व्हावे अशी योजना मांडण्यात आली आहे. हे आणि अन्य प्रकारच्या सहकार्यामधून मोदी यांनी ह्या देशांचा विश्वास संपादन केला आहे. 

अमेरिका युरोप रशिया  चीन आणि जपान यांच्याशी अनेक व्यापारी करार करत भारतामध्ये परकीय गंगाजळी आणण्याच्या मोठ्या  कामाला मोदी यांनी आरंभ केला आहे. ह्या देशांशी सगळेच काही आलबेल आहे असे नाही पण जोपर्यंत कडव्या संघर्षाचा प्रसंग येत नाही तोवर आर्थिक व्यवहार चालूच राहतात हा तर साधा नियम आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून भारताने पंचशील हे तत्व आपली परराष्ट्र नीती म्हणून स्वीकारले होते. पंडितजींनी सुरु केलेल्या अलिप्त गटाच्या देशांचे नेतृत्वही भारत करत होता काळाच्या ओघामध्ये अलिप्त गट निष्प्रभ झाला आहे. पण तरीही दार चार वर्षांनी ते परिषद घेताच असतात. मोदीनी हा पायंडा मोडला आहे. गेल्या वर्षी ह्या परिषदेला जाण्याचे त्यांनी टाळले. असे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडत आहे. अलिप्त राष्ट्र परिषद हे एक उदाहरण झाले. पण जागतिक पातळीवर अशा अनेक संस्था आहेत ज्या मृतवत आहेत पण उपचार म्हणून तिथे आपण हजेरी लावत आले आहोत आपल्या शेजाऱ्यांबरोबरच सार्क हा गटही हळूहळू याच प्रकारात मोडू लागला आहे.. ब्रिक्स राष्ट्रांचेही हेच म्हणता येईल. युनोच्या स्वरूपाबद्दल श्री मोदी यांनी खडे बोल सुनावले आहेत. ह्या सर्व पुढाकार ऐवजी नवीन रचना स्थापन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. 

युपीए सरकारने लुक ईस्ट ह्या धोरणाचा आरंभ केला पण मोदी सरकारने ऍक्ट ईस्ट अमलात आणून दाखवले आहे. खमक्या नेतृत्वाचा परिणाम म्हणून पूर्वेकडील देश भारताशी जुळते घेऊन त्यानेच आक्रमक चीन च्या विरोधात आपले रक्षण करण्यासाठी पुढे व्हावे अशा प्रयत्नात दिसतात याचे कारण भारताचे लष्करी - तंत्रज्ञानातील कौशल्य आणि खमके नेतृत्व हेच आहे. 


धोरण म्हणून विचार करायचा तर भारताची सुरक्षा - आशिया खंडामधील चीनचे वर्चस्व - रशिया आणि चीन यांची युती आणि त्यामुळे रशियाचे भारतीय हाताकडे होणारे दुर्लक्ष - मध्य पूर्वेतील संघर्षाबाबत घेतलेली भूमिका - चीनच्या विरोधात आशियाई आणि अन्य देशांशी केलेली आघाडी असे अनेक पैलू मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे आहेत. पण असे विचार तर अनेक जण करताच असतात मग त्यामध्ये फुशारकी मारण्यासारखे काय आहे? असा प्रश्न अनेक जण विचारात असतात. त्यांच्यासाठी म्हणून एक चपखल उत्तर राखीव ठेवलेले आहे.

ज्या देशाला महासत्ता म्हणून वावरण्याची महत्वाकांक्षा असते त्या देशाला केवळ आपल्या आर्थिक व लष्करी ताकदीचा विचार करून भागत नाही. अर्थव्यवहारामध्ये चढ उत्तर येत असतात. लष्करी ताकद हि केवळ जरब बसवण्याचे साधन आहे. पण जगाने आपल्याला जेते म्हणून स्वीकारावे असे वाटत असेल तर आपण उर्वरित जगाला काय देऊ शकतो यावर आपली किंमत ठरते. भारताची संस्कृती सर्व समावेशक आहे. महासत्ता असूनही चीनच्या जनतेची छाप जगावर पडू शकली नाही कारण जगाला देण्यासारखे त्यांच्या संस्कृतीकडे काही नाही. या उलट सर्वसमावेशकता - अनेक धर्म - भाषा जाती पद्धती यांचे सौहार्दाने एकत्र राहणे - सुस्थितीमधली कुटुंबपद्धती - पतंजली योगशास्त्र - आयुर्वेद आणि शास्त्रीय संगीत हे आज भारताचे सॉफ्ट अम्बॅसेडर म्हणून काम करत आहेत. आणि मोदी सरकारने ह्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचा प्रयत्न केला आहे.  योगशास्त्र  देणगी भारत आज सर्व जगामध्ये घेऊन जाऊ पाहत आहे  त्याची कायमची ओळख आहे. सर्व जगातील जनतेची विचार करण्याची पद्धती जगण्याची पद्धती संकटाला सामोरे जाण्याचे बळ मानसिक संतुलन एकत्र कुटुंब पद्धती ह्याकडे जग आकर्षित होऊ लागले आहे. आर्थिक व लष्करी आक्रमण थोडक्या काळापुरते असू शकते पण सांस्कृतिक आक्रमण मात्र दीर्घ काळ टिकणारे असेल. जे भारत देऊ शकतो ते चीन जगाला देऊ शकत नाही ही त्याची पोटदुखी आहे. ह्या सर्वच कल्पक वापर हीच मोदींच्या यशस्वी परराष्ट्र धोरणाची गुरुकिल्ली आहे.

Sunday 14 May 2017

काश्मिरमध्ये काही तरी बदलतंय!



काश्मिरमध्ये काही तरी बदलतंय!

भारतीय लश्कराने जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी सोडून दिलेली CASO ही कारवाई पुनश्च काश्मिरात दहशतवादाचा सामना करण्यासाठी "कायम स्वरूपी" आणायचे ठरवले आहे अशा खोडसाळ बातम्या काही वृत्तपत्रे देत होती. परंतु लश्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी हे स्पष्ट केले की CASO चा सर्रास वापर केला जाईल ह्या बातमीमध्ये तथ्य नाही. CASO म्हणजे Cordon And Search Operations. १९९० च्या दशकामध्ये सैन्यदलाकडून ह्या पद्धतीचा वापर नियमितपणे केला जात असे. तसेच Area Domination & Sweep असे स्वरूप तेव्हा अंमलात आणले जात होते. ह्या पद्धतीमध्ये गावातील सर्व नागरिकांना भल्या पहाटे चावडीवर गोळा करून त्यांची झडती घेतली जात असे. तसेच घराघरामधून जवान जाऊन तेथील सामानाची झडती घेत. हे करण्याचा हेतू हा होता अचानक केल्या जाणार्‍या ह्या शोध मोहिमेमुळे दहशतवाद्यांना गावामध्ये आश्रय घेणे कठीण होत असे. आणि त्यातूनच अतिरेक्यांच्या कारवायांवर नियंत्रण आणले जात होते. २००१ नंतर स्थानिक जनतेच्या विरोधाखातर ही पद्धती जवळपास बंद करण्यात आली होती. जर पक्की खबर असेल तरच सैन्यदलाकडून CASO चा वापर होत होता. आता मात्र कुलगाम, पुलवामा, त्राल, बडगाम आणि शोपियन ह्या दक्षिण काश्मिरातील विभागांमध्ये स्थानिक जनतेमध्ये बेमालूमपणे मिसळून वावरणारे दहशतवादी पकडण्यासाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे असे सांगण्यात आले आहे. परंतु ह्यामध्ये लश्कर घेराबंदी करत नसून केवळ शोधमोहिम राबवली जात आहे असेही स्पष्ट करण्यात आले. काश्मिरमध्ये सुमारे १०० दहशतवादी कार्यरत असून स्थानिक जनतेला भडकावण्याचे काम ते करत आहेत. शेकडो काश्मिरी तरूण पोलिसात भरती होण्याकरत रांगेत उभे असतात पण हे दहशतवादी त्यांना भरती हो ऊ नका म्हणून धमक्या देत असतात. लश्करातर्फे जी शोधमोहिम हाती घेतली आहे ती गावातील वस्तीपेक्षा जास्त जंगलामधून राबवावी लागणार आहे असे सांगण्यात आले आहे. स्थानिक काश्मिरी लश्करी अधिकारी ले. उमर फैयाज़ याच्या निर्घृण हत्येनंतर स्थानिक जनतेमध्ये दहशतवाद्यांविरोधात संतापाची लाट उअसळलेली दिसते. उमर हा अवघ्या २३ वर्षीय तरूण हा काश्मिरी युवकांचे आशास्थान होता. त्याच्या सारखेच आपलेही आयुष्य असावे असे वाटणारे तरूण गावकरी अनेक होते. पण त्याच्या हत्येनंतर दहशतवाद्यांनी जनतेची सहानुभूती गमावली आहे.

उमर यांच्यासाठी काल कॅंडल मार्च करण्यात आला त्याला मिळालेला प्रतिसाद बघता फेक्यूलरांची तोंडे उतरली आहेत. अन्यथा हीच घटना घेऊन ही मंडळी OROP One Rank One Pension ह्या जुन्याच मुद्द्यावर पुनश्च आंदोलन छेडण्याच्या मार्गावर होती. ज्या विशिष्ट क्षणी संपूर्ण लश्कराचे मनोबल सर्वोच्च असले पाहिजे त्याच क्षणी असली अवसानघातकी आंदोलने हाती घेतली जात आहेत ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. वरकरणी कितीही देशप्रेम दाखवले तरीही त्यांचा अंतस्थ हेतू काय आहे हे उघड होण्याचे दिवस लवकरच येतील.

दरम्यान झाकिर मुसा नामक नेत्याने उधळलेल्या मुक्ताफळांचाही अर्थ माध्यमांनी स्पष्ट केलेला नाही. काश्मिरचा लढा राजकीय आहे धार्मिक नाही - जागतिक जिहादी गट आयसिस आणि अल कायदाशी आमचा काही संबंध नाही - असे विधान हुर्रियत नेते सय्यद अली शाह जिलानी - मिरवाईज़ उमर फारुक आणि यासिन मलिक यांनी गेल्या आठवड्यामध्ये केल्यानंतर हिज्ब उल मुजाहिदीनचा कमांडर झाकिर मुसा याने हुर्रियतच्या ह्या नेत्यांना लाल चौकामध्ये फासावर लटकवण्याची धमकी दिली आहे. काफिर नंतर - आधी तुम्हाला फासावर लटकवेन अशी धमकी मुसाने दिली आणि त्याने स्पष्ट केले की काश्मिरचा लढा धार्मिक आहे - हा जिहाद आहे - राजकीय लढा नव्हे - तसे नसते तर तुम्ही ला इलाह इल् अल्लाह अशा घोषणा का देत होतात - लोकांसमोर भाषणे देण्यासाठी तुम्ही मशिदीमध्ये का येत होतात - मी काही उलेमा नाही पण इथले विद्वान नक्कीच भ्रष्ट आहेत - हे तुरुंगवासाला घाबरतात - हे आमचे नेते होऊ शकत नाहीत - हे फक्त राजकीय नेते आहेत - त्यांनी आमच्या लढ्यामध्ये लुडबुड करू नये - आम्हाला शरिया राबवायचा आहे आणि आम्ही तो राबवणारच - तुमचे राजकारणात बरबटलेले हात तुम्ही तुमच्या घरापुरते ठेवा - विद्वत्तेच्या नावाखाली आम्हाला फाटाफूट नको आहे. मुसा याची ही धमकी सर्वांना थक्क करून गेली आहे. गेल्या तीस वर्षामध्ये कोणत्याही काश्मिरी नेत्याने येथील लढा हा धार्मिक स्वरूपाचा असल्याचे जाहीर विधान केले नव्हते.

बुरहान वानी ज्या त्राल शहरामधला त्याच शहरामधला आहे हा झालिर मुसा. गेल्या जुलै मध्ये वानी मरण पावल्यावर मुसाने तेथील सूत्रे हाती घेतली होती. Traitors Go Back Hurriyat Go Back No Freedom No Pakistan - No UNO - No Self Rule - Only Islam - Only Islam ही मुसाची घोषणा आहे. मुसाच्या ह्या उद्रेकाशी आपण असहमत आहोत असे सांगत हिज्ब उल् मुजाहिदीन ने सुद्धा त्याच्याशी फारकत घेतली आहे. मुसाच्या मागे समर्थक आहेत. पण प्रस्थपितांना मुसा नको आहे. एवढेच नव्हे तर पाकिस्तानलाही मुसा नकोच असेल. पण एव्हढे मात्र नक्की की काश्मिरच्या लढ्यामध्ये आज फूट पडली आहे. आता ह्या दोन गटांमध्ये लागून राहील. दिल्ली सरकारमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी त्यांच्यामधलाच एक कपिल मिश्रा बाहेर आला. काश्मिरात कोण येणार बाहेर? हुर्रियत नेत्यांच्या पैशाच्या गैरव्यवहाराची कहाणी सांगायला कोण येईल पुढे?

झाकिर मुसाचे आयुष्य धोक्यात आहे. तसेच हुर्रियत नेत्यांचेही आयुष्य धोक्यात आहे. एक जण जरी मारला गेला तरी काश्मिरात पुनश्च हिंसाचाराचा आगडोंब उसळणार यात शंका नाही. ह्यापैकी कोणीही मारले गेले तरी दोष येणार तो सरकारवरती.

अडव्हांटेज?? भारत - काश्मिर - मोदी - दोवल की पाकिस्तान?

Saturday 13 May 2017

गिलगिट - बाल्टीस्तान - भाग २

Image result for siachen map

गिलगिट - बाल्टीस्तान - भाग २

१९७१ चा बांगला देशातील भारताचा विजय - १९७९ साली इराणमधून शहाची सत्ता उखडण्याची घटना - त्यानंतर लागोपाठ अफगाणिस्तानमध्ये घुसलेल्या रशियन फौजा - रशियानांच्या पाडावासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने उभारलेला सुन्नी दहशतवादी इस्लामी गटांचा जिहाद ह्या घटनांमुळे भारतीय उपखंडामधल्या शिया समुदायावरती काय परिणाम झाले त्याची सविस्तर चर्चा आपल्या माध्यमांमध्ये झाल्याचे दिसत नाही. 

गिल्गिट - बाल्टीस्तान मध्ये कोणत्याही राजकीय हालचाली करण्यावर बंदी असूनही १९७१ मध्ये बांगला देशातील घडामोडींमुळे धीर आलेल्या गिल्गिट - बाल्टीस्तान मधल्या शियांनी उचल खाल्ली आणि तनझीम ए मिल्लत नावाच्या संघटनेची स्थापना करण्यात आली. इथून गिलगिट बाल्टीस्तानमधील शियांच्या सुन्नीविरोधातील संतापाला तोंड फुटले. १९७४ मध्ये संघटनेचा संस्थापक जोहर अली खान याने रहिवाशांना मूलभूत हक्क मिळावेत आणि फ्रॉंटीयर्स क्राईम रेग्युलेशन मागे घेण्यात यावे म्हणून बंद पुकारला. त्याला हिंसक वळण लागताच तेथील सुन्नी कमिशनरने गोळीबाराचे आदेश दिले. पण शिया स्काउटस् नी आपल्याच शिया बांधवांवरती गोळ्या घालण्यास नकार दिला. यानंतर कमिशनरने स्वतः गोळीबार केला आणि बंदच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. पण बहादूर जनतेने त्यांना तुरुंगातून सोडवले. सरकारने त्यांना पुन्हा जेरबंद केले. यानंतर कमिशनरचा आदेश धुडकावणारे स्काउट झुल्फिकार अली भुत्तो यांनी बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शेकडो शियांच्या नोकर्‍या गेल्या. त्याने हा समाज पाकिस्तानी राजवटीपासून अधिकच दुरावत गेला. शियांनी आपल्या संघर्ष करणार्‍या अनेक संघटना स्थापन केल्या. त्यांना चुचकारण्याचे सोडून पाक सरकारने तेथील सुन्नींना त्यांच्या संघटना काढण्यासाठी उत्तेजन दिले. यातून समाजामधली दरी वाढत गेली. 

१९७९ साली अमेरिकेशी उत्तम संबंध असलेल्या इराणच्या शहाला पदच्युत करून अयातोल्ला खोमेनी सत्तेवर आला. अमेरिका ह्या क्षेत्रामध्ये दबली आहे हे गृहित धरून रशियाने अफगाणिस्तानमध्ये आपल्या फौजा १९७९ च्या शेवटाला घुसवल्या. अफगाणिस्तानमधून रशियन सैन्याला हुसकावून लावण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने कट्टरपंथी सुन्नी संघटनांच्या मदतीने तिथे लढा उभारला. 

इराणमधील उलथापालथ शियांसाठी एक मोठी घटना होती. इराणमध्ये शिया बहुसंख्य आहेत - भारतात राहणार्‍या अनेक शियांचे इराणमधील कुटुंबांशी जवळचे संबंध आहेत. इराणमधील रॅडिकल इस्लामच्या उदयानंतर तेथील समाजामध्ये झालेली उलथापालथ इथल्या शियांना भयभीत करून गेली. जसे भारतीय शिया चिंताक्रांत होते त्यापेक्षा जास्तच पाकिस्तानामधले सुद्धा. भारतीय शिया तरी बहुसंख्य हिंदूंमध्ये राहतात. सुन्नींच्या छळकपटापासून हिंदूंची भिंत त्यांचे संरक्षण करत असते. पण पाकिस्तानातील अल्पसंख्य शियांचे काय? त्यांना तर तिथे कोणीच वाली नाही. ते तिथेही अल्पसंख्यच आहेत. असेही ते तिथे जीव मुठीत धरूनच जगतात. सभोवती उठलेली सुन्नी कट्टरतावादाची आग त्यांना भयभीत करणारी ठरणारच. सुन्नी राजवटीमधून बाहेर पडणे एवढाच त्यांच्यापाशी त्या जाचामधून सुटका करून घेण्याचा मार्ग असल्यामुळेच १९८० च्या दशकामध्ये पाकिस्तानातील शिया उचल खाताना दिसू लागले. त्यामध्ये जसे बलुची शिया होते तसेच सिंध आणि पाराचिनार मधले. गिलगिट बाल्टीस्तानमधल्या शियांनी आपल्यासाठी स्वतंत्र काराकोरम प्रांताची मागणी केली. हे साल होते १९८८. जनरल झिया कर्तृत्वाच्या शिखरावर होते. रशियाची पिछेहाट. अफगाणिस्तान निर्वेधपणे पाकिस्तानच्या परभारे हातामध्ये. अमेरिकेशी उत्तम संबंध! देशात सुन्नी रॅडिकल्सची लाट. भारतामधले राजीव गांधी सरकार संसदेमध्ये ४०० च्या वर खासदार असूनसुद्धा विश्वनाथ प्रताप सिंघ यांच्या राजकीय आव्हानामुळे विकलांग - जेरीस आलेले. तेव्हा झियांना आव्हान देणारे कोणी नव्हते. त्यातच गिलगिट बाल्टीस्तानमधील शियांनी काराकोरम प्रांतासाठी मागणी करावी हे झियांना कसे आवडणार? हे बंड चेपून टाकण्याचे आदेश त्यांनी दिले. ते अंमलात आणण्यासाठी एका पाकिस्तानी जनरलची नियुक्ती झाली. त्याचे नाव होते जनरल मुशर्रफ. मुशर्रफ यांनी अफगाणिस्तानमधून ओसामा बिन लादेनच्या फौजेला गिलगिट - बाल्टीस्तानामध्ये उतरवले. ओसामा बिन लादेनच्या फौजेमध्ये पाकिस्तानच्या फाटामधल्या (Federally Administered Tribal Area - FATA) वझिरीस्तानचे वझीर आणि मेहसूद ह्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर होत्या. ही फौज कारकोरम हायवेवर उतरली. त्यांना अडवणारे कोणीच नव्हते. कारण त्यांचा नेता ओसामा स्वतः ह्या शिरकाणाच्या वेळी त्याच ठिकाणी त्यांचे नेतृत्व करायला हजर होता. शेतामधल्या उभ्या पिकाची नासधूस - लोकांना मरेपर्यंत मारहाण - जाळून टाकणे - स्त्रियांवर बलात्कार आणि अन्य अमानवी अत्याचार यांचे थैमान चालू होते. तालिबानांनी अफगाणिस्तानमध्ये जितके हजारा शिया मारले नाहीत त्यापेक्षा जास्त शिया गिलगिटमध्ये मारले गेले. त्याची किंमत कोणी मोजली असेल? 

त्याच वर्षी म्हणजे १९८८ मध्ये गिलगिटमध्ये हत्याकांड करण्याचे आदेश देणार्‍या जनरल झिया यांच्या बहावलपूरहून पिंडीकडे निघालेल्या विमानामध्ये पाकिस्तानचे सर्व वरिष्ठ लश्करी अधिकारी तर होतेच पण अमेरिकन लश्कर अधिकारी - राजदूत हेही होते. ऑगस्ट १९८८ मधल्या ह्या उड्डाणामध्ये एक शिया कर्मचारी होता. त्याने आपले काम केले. विमानाने आकाशात झेप घेताच स्फोट होऊन सर्व प्रवासी मारले गेले. (जनरल मिर्ज़ा असलम बेगदेखील विमानाने प्रवास करणार होते. पण आयत्या वेळी त्यांनी बेत रद्द केला आणि दुसर्‍या विमानाने ते निघाले. आकाशामधून झियांच्या विमानाला झालेला अपघात त्यांनी बघितला. त्याभोवती दोन फेर्‍या मारल्या. आणि नंतर ते तिथे मदतीसाठी न उतरता पिंडीला पोहोचले. अर्थातच पाकिस्तानचे लश्करप्रमुखपद त्यांची वाट पाहत होते.) (जनरल ले. फाज़ल हक यांचीही पेशावर येथे एका शिया बंदूकधार्‍याने हत्या केली. जनरल मुशर्रफ यांच्यावर प्राणघातक हल्ले चढवणारे शियाच होते.)

शियांना असे जबरी चेपल्यानंतर १९८८ मध्येच पहिल्यांदा काराकोरम हायवेवरून पाकिस्तानला चीनने अत्यंत काटेकोर संरक्षणात कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि अणुकार्यक्रमासाठी महत्वाची सामग्री पाठवली. हाच हायवे वापरून अशी सामग्री इराणलाही पोचवण्यात आलेली होती. इथूनच ए. क्यू. खान यांचा न्यूक्लीयर हायवे आणि न्यूक्लीयर वॉलमार्ट सुरु झाले. 

शियांचा विरोध आणि सुन्नींचा प्रतिहल्ला ही यादवी पुढेही चालू राहिली. १९९२ - ९३ - ९४ सालामध्ये कहाणी तीच होती. १९९३ साली तर संघर्षाचा उद्रेक असा होता की सियाचेनमध्ये पहारा देणारे सैन्य शिखर सोडून सरकारच्या हितरक्षणासाठी गिलगिटमध्ये हजर झाले. 

शियांच्या संघर्षाला पुढचे मोठे वळण मिळाले ते अर्थातच सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वरील हल्ल्यानंतर. ती कहाणी पुढच्या भागामध्ये बघू. 


गिलगिट - बाल्टीस्तान - भाग १

Image result for gilgit baltistan



गिलगिट - बाल्टीस्तान - भाग १

ज्या गिलगिट - बाल्टीस्तान मधून सीपेकचा मार्ग जाणार आहे तो म्हणजे पकिस्तानच्या ताब्यात असलेला पाकव्याप्त काश्मिरचाच एक विभाग आहे अशी आपली समजूत असते. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. १९४७ सालपर्यंत गिलगिट - बाल्टीस्तान हा जम्मू - काश्मिरचा एक हिस्सा होता. जम्मू - काश्मिर - लडाख यांच्या पेक्षा हा वेगळा असलेला भाग - त्याची ओळख वेगळी होती - म्हणून त्याला जम्मू - काश्मिरचा उत्तर प्रांत म्हटले जात होते. इथे गिलगिट - बाल्टीस्तान - दियमिर - घांची - घिझर असे पाच प्रांत होते आणि त्यांनी १९४७ मध्ये काश्मिरच्या डोग्रा राजाच्या राजवटीतून आपण स्वतंत्र झाल्याचे घोषित केले होते. १९४८ सालच्या युद्धानंतर पाकिस्तानने ह्या भागाचा कब्जा घेतला. पाकिस्तानने हा विवादित काश्मिरचाच एक भाग असल्याचे मान्य केले होते. म्हणून एप्रिल १९४९ मध्ये उर्वरित पाकव्याप्त काश्मिरात त्याची गणना होऊ नये म्हणून पाकिस्तान सरकारने पाकव्याप्त काश्मिरच्या मुझफ़्फ़राबादमधील सरकारबरोबर एक करार करून हा भाग पाकव्याप्त काश्मिरच्या ताब्यातून स्वतःकडे घेण्याचे ठरवले. त्यानुसार एक विषेष अध्यादेश काढून त्याचे नियंत्रण केंद्र सरकारकडे सोपवण्यात आले. जनरल झिया उल हक यांनी त्याचे नाव पाकिस्तानचा उत्तर विभाग केले. अशा तर्‍हेने हा काश्मिरचा एक भाग असल्याची नामोनिशाणी पुसून टाकण्यात आली. गिलगिट - बाल्टीस्तान मध्ये शिया आणि इस्माईली लोक बहुसंख्य आहेत. त्याचे क्षेत्रफळ जवळजवळ ३०००० चौ. मैल एवढे आहे. उर्वरित पाकव्याप्त काश्मिरमध्ये सुन्नी बहुसंख्य आहेत आणि त्याचे क्षेत्रफळ आहे सुमारे ४१०० चौ. मैल. पाकिस्तानने चीनबरोबर सीमा करार केला तेव्हा म्हणजे १९६३ मध्ये गिलगिट - बाल्टीस्तान मधलाच १८६३ चौ. मैल प्रदेश चीनला देऊन टाकला. ह्या करारामध्ये एक कलम असे आहे की काश्मिरच्या वादाचा अंतीम करार होईपर्यंत हा भाग चीनच्या ताब्यात राहील!!! (लक्षात घ्या इथे पाकिस्तान जणू कबूलच करत आहे की इथवर काश्मिरचा अंतीम - उभयपक्षी मान्य असलेला - करार झालेला नव्हता.) गंमत अशी आहे की मुळात मुझफ़्फ़रबादमधील पाकव्याप्त काश्मिरच्या सरकारकडे सार्वभौमत्व होतेच कुठे अशा प्रकारे आपल्या भागाचे हस्तांतरण मंजूर करण्याचे! ह्या संदर्भात पाकव्याप्त काश्मिरच्या न्यायालयामध्ये एक खटला दाखल करण्यात आला. इथे पाक सरकारनेही कबूल केले की मुळात गिलगिट - बाल्टीस्तान हा पाकव्याप्त काश्मिरचा एक भाग होता. न्यायालयाने हा भाग पुनश्च पाकव्याप्त काश्मिरच्या ताब्यात दिला जावा असा निर्णय दिला. ह्या निकालावरती इस्लामाबदमधील सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेल्या अपीलमध्ये निकाल डावलण्यात आला. त्यासाठी खटला करण्यामागे कायदेशीर नव्हे तर राजकीय कारणे आहेत असा दावा पाक सरकारने केला होता. सबब न्यायालयाने त्यात ढवळाढवळ करू नये असे सरकारचे म्हणणे होते. ते न्यायालयाने अन्य काही तांत्रिक बाबींचा आधार घेत मान्य केले. गिलगिट - बाल्टीस्तान प्रदेशाचे नियंत्रण केंद्र सरकारकडे गेल्यामुळे इथे नावापुरतीही लोकशाही नाही. पाकव्याप्त काश्मिरात लोकशाहीचा काही तरी मागमूस मिळेल पण गिलगिट - बाल्टीस्तान तसे होण्याला काही जागाच ठेवली गेली नाही. गिलगिट - बाल्टीस्तान मध्ये फ्रॉटीयर क्राईम्स रेग्युलेशन ह्या ब्रिटिशकालीन कायद्यानुसार राज्य चालवले जाते. हा कायदा म्हणजे एक प्रकारचा मार्शल लॉच आहे. त्याच्या तरतूदीनुसार प्रत्येक रहिवाश्याला महिन्यातून एकदा जवळच्या पोलिस स्टेशनवर हजेरी लावावी लागते. एका गावाहून दुसर्‍या गावी जायचे तर त्याची नोंद पोलिसांकडे करावी लागते.  प्रांतासाठी एक स्थानिक कौन्सिल आहे. पण हे काउन्सिल इस्लामाबादच्या तालाने चालते. प्रदेशाला एक ज्युडिशियल कमिशनर आहे. सर्व अधिकारी वर्ग इस्लामाबदचा आहे. त्यामध्ये स्थानिक जनतेला स्थान नाही. ज्युडिशियल कमिशनरच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्यासाठी वरिष्ठ न्यायालय नाही. अशा परिस्थितीमध्ये येथील लोकांचे हाल कुत्रे खात नाही असे झाले आहे. कोणत्याही प्रकारची विकासाची कामे सरकारने येथे हाती घेतलेली नाहीत. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दुसर्‍या एका खटल्यामध्ये असा निकाल दिला की हा प्रांत विवादित असून केंद्र सरकारला स्वतःच्या ताब्यात ठेवता येणार नाही - तो स्थानिकांच्या हाती सहा महिन्यांच्या आत दिला जावा. ह्या निर्णयाला पाकिस्तान सरकारने केराची टोपली दाखवली आहे. प्रांताला घटनात्मक आणि कायदेशीर दर्जा नसल्यामुळे आणि त्याविषयात असे मूलभूत विवाद असल्यामुळे कोणतेही परकीय राष्ट्र तिथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत नाही. म्हणून येथील बाशा धरणाचे हाती घेतलेले काम आणि ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे खणण्यात येणारी सोन्याची खाण हे प्रकल्प अर्धवट सोडून दिले गेले आहेत. निसर्ग सौन्दर्याचे वरदान लाभलेल्या ह्या भागामध्ये पर्यटन व्यवसायही विकसित होऊ शकलेला नाही. नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास आणि त्यासाठी येणारी मदत किंवा इथे आढळणारा पांढरा चित्ता दुर्मिळ होतो आहे त्याच्या जतनासाठी म्हणून जेवढी मदत येते तेवढीही मदत स्थानिक जनतेसाठी मिळू शकत नाही हे फारच मोठे दुर्दैव आहे.

चीनला बहाल करण्यात आलेल्या १८६३ चौ. मैलाच्या प्रदेशाचा वापर चीनने स्वतःच्या फायद्यासाठी उत्तम रीत्या करून घेतला आहे. पाकिस्तानी पंजाब प्रातांच्या हसन अब्दल शहरापासून ते गिलगिट - बाल्टीस्तानच्या खुंजरेब खिंडीपर्यंत हा रस्ता पसरला आहे. खिंड पार केल्यानंतर चीनची हद्द सुरु होते. अशा तर्‍हेने पाकिस्तानी पंजाब प्रांत - खैबर पख्तुन्वा - गिलगिट - बाल्टीस्तान हे प्रदेश चीनच्या शिन जि आंग उईघुर प्रदेशाला जोडले गेले आहेत. ह्याच रस्त्यामुळे पार चीनपर्यंत पाकिस्तान रस्त्याने जोडला गेला आहे. १५००० फूट उंचीवरून बांधण्यात आलेला हा रस्ता म्हणजे इंजिनियरिंग मार्व्हल म्हणून ओळखला जातो.

वरकरणी दाखवताना मालाची ने आण करण्यासाठी म्हणून रस्ता वापरला जाईल असे जाहिर करण्यात आले तरी चीन आणि पाकिस्तानने त्याचा वापर लश्करी कामांसाठी बेछूटपणे केल्याचे दिसते. १९९० नंतर चीनने M-9 आणि M-11 ही मिसाईल्स वाहून आणण्यासाठी ह्या रस्त्याचा वापर केला. समुद्र मार्गाने मिसाईल्स पाठवले तर अमेरिकेच्या निरीक्षणामधून ती सुटणार नाहीत असे गृहित धरून ही योजना केली गेली होती. पण इतके करून अमेरिकेने सॅटेलाईटमधून   ही वाहतूक नेमकी टिपल्याचे दिसते.

त्याकाळामध्ये रस्ता बांधून झाल्यानंतर पाकिस्तानमधील जमाते इस्लामी आणि तबलिघी जमात या कडव्या संघटनांचे सभासद पर्यटक बनून चीनच्या उईघुर प्रांतामध्ये जाऊ लागले. तिथे जाऊन ते शिन जियांग हा प्रांत चीनपासून तोडून त्याचे स्वतंत्र राष्ट्र  म्हणून घोषित करण्यासाठी तेथील मुस्लिम जनतेला जिहादमध्ये भरती करू लागले. हे लक्षात येताच चीनने पाकिस्तान्यांना व्हिसा देणेच बंद केले. ह्या उद्योगामुळे बेनझीर भुत्तो पंतप्रधानपदी असताना १९९३ ते १९९७ दरम्यान चीनने काराकोरम रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे प्रलंबित केली. पुढे १९९९ अध्ये जनरल मुशर्रफ यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर ते उत्तर कोरियाशी बोलणी करून पाकिस्तानच्या हद्दीमधल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कोरियन इंजिनियर्सनी करावे म्हणून प्रयत्नशील होते. या संदर्भात कोरियन इंजिनियर्स तिथे २००१ साली आले देखील होते. यानंतर मुशर्रफ यांनी चीनचे पंतप्रधान झु रोंगजी पाकिस्तान भेटीसाठी आले असता कोरियन मिसाईल्स व इतर युद्धसामग्री पाकिस्तानपर्यंत आणण्यासाठी चीनने परवानगी द्यावी म्हणून बोलणी केली. कोरियाची येमेन येथे समुद्रमार्गे पाठवण्यात येणारी मिसाईल्स अमेरिकन नेव्हीने अडवली होती. चीनने तशी परवानगी दिल्यानंतर ही वाहतूकही सुरु झाली आणि पाकिस्तानला येमेनसारखी अडचण आली नाही. मुख्य म्हणजे कोरियाच्या अणूप्रकल्पासाठी युरेनियम समृद्ध करण्याचे तंत्रज्ञान पाकिस्तानकडून जायचे होते. ती सामग्री पाकिस्तानने कोरियामध्ये ह्याच रस्त्याचा वापर करून पाठवली. ही बाब चीनच्या टेहळणीमधून सुटणे शक्य नाही. आपल्याला काहीच माहिती नाही असा बहाणा चीन करत असले तरी त्याच्यावर कोणाचा विश्वास नाही. २००१ च्या कारगिल युद्धप्रसंगी भारताने आपले सैन्य सीमेलगत तैनात केले तेव्हाही कोरियाने अत्यंत चपळाईने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपली मिसाईल्स - त्याचे सुटे भाग आणि अन्य लश्करी सामग्री ह्याच रस्त्याचा वापरकरून पोचवली होती.

१९७९ नंतर पाकिस्तानमध्ये आलेल्या जिहादच्या लाटेचा ह्या प्रदेशावर काय परिणाम झाला ते पुढील भागामध्ये पाहू.

Friday 12 May 2017

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

ओबोर सिपेक चे रहस्य भाग 4

Beijing General Qamar Bajwa Meeting With Chinese Foreign Minister General

ह्याच पार्श्वभूमीवरती सिपेकच्या निमित्ताने नेमका काय करार झाला आहे आणि पाकिस्तानी सैन्याने तो गुलदस्तात ठेवण्याचे काय प्रयोजन असावे हे प्रश्न उपस्थित होतात. मला भेटलेले डावे इतके आश्वस्त का होते ह्याचे कोडे सुटायला फार वेळ लागला नाही. पाकिस्तानी सैन्याकडे लपवण्यासारखे काही आहे ह्याचाच अर्थ पाकिस्तानी जनतेच्या स्वाभिमानाला धक्का लागेल अशा अटी ह्या करारामध्ये मान्य करण्यात आल्या असाव्यात अशी शंका घेण्यास वाव उरतो. इथे एक गोष्ट स्पष्ट होत आहे की चीन दिवसेंदिवस पाकिस्तान हा जणू शिन्ज्यांग प्रमाणे आपलाच एक प्रांत असल्याप्रमाणे वर्तन करत आहे. आपले सार्वभौमत्व चीनच्या चरणी वाहण्याचे धोकादायक काम स्वतःला देशप्रेमी म्हणून डंका पिटणाऱ्या पाकिस्तानी जनरल्सनीच केले आहे हे उघड आहे. 

भारतीय उपखंडाविषयक आणि खास करून पाकव्याप्त काश्मीर आणि अफगाणिस्तान विषयक निर्णय पाकिस्तानचे देशहित बघून होताना दिसत नाहीत. ते चीनच्या काय हिताचे आहे हे बघून घेतले जात आहेत. एकविसाव्या शतकामध्ये जर एखाद्या देशाची अर्थव्यवस्था - अंतर्गत राजकीय हालचाली - परराष्ट्र धोरण - सुरक्षा आणि संरक्षण ह्या बाबतचे निर्णय जर स्वतःच्या देशाचे हित लक्षात न घेता शेजारी देशाच्या इच्छेप्रमाणे त्याच्या सोयीने त्याच्या हिताच्या दृष्टीने घेण्यासाठी त्याच देशाचे राजकीय आणि लष्करी नेतृत्व उतावीळ असेल तर अशा देशाने आपल्या शेजारी देशाचे मांडलिकत्व स्वीकारले असे म्हणायला हरकत नाही. असा छोटा देश हा त्या मोठ्या शेजाऱ्याची वसाहत असल्याप्रमाणे वापरला जाऊ शकतो. आणि हाच भारतीय सुरक्षेला असलेला सर्वात मोठा धोका आहे. 

पाकिस्तान नेहमीच अशी शेखी मिरवत असतो की आपण एक अण्वस्त्रधारी देश आहोत - जगाच्या राजकारणामध्ये आपल्याला अनन्यसाधारण असे स्थान आहे - खास करून भारत हा आकाराने मोठा असला तरी आपले स्ट्रॅटेजिक महत्व त्याच्यापेक्षा यत्किंचितही कमी नाही किंबहुना आपण भारताच्याच इतके प्रभावशाली आहोत. सर्व जागतिक व्यासपीठांवर आपण भारताइतकेच श्रेष्ठ आहोत हे ठसवण्याचा तो सतत प्रयत्न करत असतो. आपले स्थान इतके एकमेवाद्वितीय आहे की बलाढ्य अमेरिकेलाही आपण झुकवू शकतो. ह्या वल्गनांचे चीनसमोर काय होते ते रहस्यच आहे. चीन समोर असा बलाढ्य पाकिस्तान नांगी का टाकतो हे कोडे नाही का? सर्व प्रकारची नाटके अमेरिका व पाश्चात्यांसमोर करणारा पाकिस्तान चीनसमोर मात्र नाक मुठीत धरून वागतो. इथे पाकिस्तान असे असे करतो असे म्हणण्यापेक्षा खरे तर मी असे म्हटले पाहिजे की पाकिस्तानी सैन्यावर ज्यांची जबर पकड आहे ते पंजाबी पाकिस्तानी जनरलस असे असे करतात. 

"पर्वताएव्हढी उत्तुंग आणि महासागराएव्हढी खोल" अशी आपली चीनशी दोस्ती असल्याच्या वल्गना पाकिस्तानची सेना करत असते. तिच्यामधला फोल पण दाखवून देणे अवघड नाही. किंबहुना ह्या वल्गना ह्याचसाठी केल्या जात आहेत की जेणेकरून आपल्या सैन्याच्या देशप्रेमावर जरासुद्धा शंका ना घेणारी भोळी पाकिस्तानी प्रजा अशाच गैरसमजात अखंड राहावी.  शिन जियांग प्रमाणेच पाकिस्तान हा चीन चा एक प्रांत होऊन बसला आहे हे बिंग फुटू नये ह्याची काळजी घेण्याचे काम तिथे चालू आहे. अशा प्रकारचे नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने नेमक्या कोणत्या पातळीपर्यंत पाकिस्तानी सैन्यामध्ये आपले हित बघणारी मंडळी घुसवली आहेत - परराष्ट्र धोरण ठरवणाऱ्या प्रक्रियेमधल्या कोणत्या पदांवरती त्याची पकड आहे - ही खोलात जाऊन बघण्याची बाब ठरेल. 

चीनच्या हिताची री ओढणारी ही घटनाबाह्य व्यवस्था पंजाबी पाकिस्तान्यांपुरतीच काटेकोरपणे मर्यादित का ठेवली गेली आहे हे कोडे आहे. चिन्यांचे अधिकारी येतात आणि कधी बलुची किंवा सिंधी राजकारण्यांना अथवा सैनिकी अधिकाऱ्यांना अथवा नागरी पदाधिकाऱ्यांना भेटतात असे दिसत नाही ते फक्त पंजाबी केडरलाच भेटतात. असे का बरे असावे? पाकिस्तानच्या सैन्याचे हस्तक असलेले दहशतवादी गट चीनला जवळचे का वाटतात? मौलाना मसूद अजहरला दहशतवादी ठरवण्याला चीन इतके का मुरडे घेतो? की असे इसम त्याला स्वतःचेही ऍसेट वाटतात? भारतामध्ये दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यासाठी चीनलाही मसूदच्या वापर करून घ्यायचा आहे हे खरे ना?  भारताने युनोच्या सुरक्षा समितीवरती कायमस्वरूपी सभासदत्व मागितले की तसे पाकिस्तानलाही मिळाले पाहिजे असे चीन का म्हणतो? गिलगिट बाल्टिस्तान - बलुचिस्तान मध्ये जनतेचा जो छळ पाकिस्तानी सैन्य करत आहे त्यामागे चीनचे हितसंबंध जपण्याचा हेतू नाही काय? 

ही वस्तुस्थिती आपण विसरता नये की आज चीनने पाकिस्तानवरती आर्थिक - मूलभूत सोयी सुविधा - ऊर्जा - रस्तेबांधणीसारख्या क्षेत्रामध्ये आपली घट्ट पकड बसवली आहे. सिपेक ही पाकिस्तानला अंतिमरीत्या आपला मंडलिक बनवण्याची योजना असून तीच पाकिस्तानची जीवनरक्षक कशी आहे हे तेथील लोकांना 'विकण्याचे' काम तिथंही माध्यमे - फेक्युलर विद्वान करत आहेत. अशा तऱ्हेने ज्या पाकिस्तानने अमेरिकेला कधी आपला आत्मा विकला नाही तो पाकिस्तान चीनकडे आपले सर्वस्व गमावून बसला आहे हे सुस्पष्ट होत आहे. इतक्यावरच प्रकरण थांबले नसून सिपेक योजनेचे नियंत्रण नागरी आस्थापनाकडे न राहता सैन्याकडे असावे म्हणून पाकिस्तानी सैन्याचा कटाक्ष आहे. कारण सिपेकमध्ये सहभाग नसेल तर आपण पाकिस्तानमधली अंतिम शक्ती गमावून बसू हे कटू भविष्य त्याच्या डोळ्यासमोर नाचते आहे. 

ह्या परिस्थितीचा अर्थ स्पष्ट आहे. १९४७ नंतर चीनने तिबेट घशाखाली ढकलला आज तो पाकिस्तान गिळू पाहत आहे. पंजाबी नेतृत्व ऐकणारच नसेल तर पाकिस्तानचे विभाजन हे हिंदू स्वाभिमानाला सुखावणारे म्हणून नव्हे तर भारतीय उपखंडामध्ये आपल्याभोवती चीनचा विळखा अधिकच घट्ट होउ नये म्हणून करणे आता गरजेचे होत जाईल. एक तिबेट गिळंकृत केला त्याची जबर किंमत आपण आज मोजतो आहोत. चाचा नेहरूंसारखेच आजही गप्पा बसलो तर चिनी ड्रॅगन ची मगरमिठी सुटणे अधिकच अवघड होऊन बसेल. म्हणून बलुची - सिंधी - पश्तुनी जनतेच्या हिताचे आहे म्हणून नव्हे तर भारताच्याही हिताचे आहे म्हणून मोदी सरकारला काळजीपूर्वक पावले उचलायची आहेत. ते तसे उचलेल तेव्हा त्याच्या मागे जनतेची टाकत आहे हे दृश्य दिसणे गरजेचे आहे. 

दुर्दैव हे आहे की भारतामधल्या डाव्या फुरोगामी फेक्युलरांची एक वेळ चीनकडे पाकिस्तानचे  सार्वभौमत्व गेले तरी चालेल अशी मानसिकता झाली आहे. पाकिस्तान विरोधात मोदी जिंकले असे चित्र उभे राहण्यापेक्षा चीनचे स्वागत करू आणि हिंदू राष्ट्राचे स्वप्न हाणून पाडू असा घातक विचार ही मंडळी करत आहेत. त्यांचा हिंदू द्वेष - मोदी द्वेष - संघ द्वेष इतका पराकोटीचा आहे की त्यासाठी भारत चीनचा मंडलिक झाला तरी त्यांना चालणार आहे.  असलेच बुद्धिवंत विचारवंत पत्रकार फुरोगामी फेक्युलर पुढच्या काही दिवसात आपल्याला सिपेकची भुलवणारी गोड गोड माहिती सांगतील - मोदी सरकार कसे हटवादी आहे आणि टांग अडवून बसले आहे हे पटवतील. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे सर्वात उत्तम मार्ग आहे. पण त्याचबरोबर वेळ येताच हे बिंग पाकिस्तानी जनतेसमोर आणण्याचे जे प्रयत्न होतील त्याच्यामागे शक्ती उभी करावी लागेल. पाकिस्तानी सैन्याला तेथील सामान्य जनतेने डोक्यावर घेऊ नये म्हणून त्याचे खरे स्वरूप काय ते उघड झाले तरच भारत पाक नव्हे तर उपखंडाच्या परिस्थितीमध्ये आपण बाजी पालटवून दाखवू शकू. ही क्षमता आपल्यामध्ये आहे ह्याची जाणीव जरी आज ठेवली तरी पुरेल.

ओबोर-सिपेकचे रहस्य भाग ३

ओबोर-सिपेकचे रहस्य भाग ३

Image result for obor conference beijing

पुढच्या दोन दिवसात म्हणजे १४-१५ मे रोजी बीजिंग मध्ये ओबोर च्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक जंगी संमेलन होत असून त्यासाठी १०० हुन अधिक देशांचे प्रतिनिधी बीजिंग येथे पोचण्यास सुरुवात झाली आहे. ह्यामध्ये २८ देशांचे शीर्ष नेतृत्व तर अन्य अनेक देशांमधून वरिष्ठ नेतृत्व हजर राहणार आहेत. भारत मात्र ह्यासाठी पाठवलेच तर दुय्यम पातळीवरील अधिकारी वर्गास पाठवले जातील असे संकेत आहेत. ह्या परिषदेच्या निमित्ताने ओबोरवरील अनेक प्रकारच्या माहितीचा धबधबा आपल्यावर कोसळू लागेल. प्रकल्पामधले धोके - तोटे ह्यांची वाच्यता न करता त्याच्या फायद्याचे अवास्तव कौतुक करणारे लेख इथे फेक्युलर मंडळी लिहितील. भारताच्या शेजारी देशांमधले छोटे देश चीनच्या दडपणाखाली वरिष्ठ नेतृत्व परिषदेसाठी पाठवतील यात शंका नाही. त्या पार्श्वभूमीवर भारताने - चुकले - मोदीनी पाठवलेल्या दुय्यम पातळीवरील शिष्टमंडळावर यथेच्छ टीका झालेली दिसेल. किंबहुना इतर शेजारी गेले तेव्हा तुम्ही दक्षिण आशियामध्ये एकटे पडलात - तुमच्या मैत्रीपेक्षा हे शेजारी देश चीनला जास्त महत्व देतात वगैरे वगैरे चर्वित चर्वण ऐकण्यासाठी कान तयार ठेवावेत. सीपेक - ओबोर निमित्ताने भारताचे - चुकले - मोदींचे परराष्ट्र धोरण कसे चुकले आहे ह्याचे दळणही दळले जाईल.

होई ना का सिपेक - जर पाकिस्तानच्या गरीब जनतेचे त्यामध्ये कल्याण असेल तर भारताने त्यामध्ये मोडता का घालावा असा भारतीयांच्या मृदू  हृदयाला हात घालत इथले फेक्युलर प्रश्नांची सरबत्ती करतील. म्हणूनच आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की भारत सिपेकच्या विरोधात आहे का? आणि असलाच तर त्याची पार्श्वभूमी काय? केवळ नाव बदलून वा काही अटी ढिल्या केल्या तर भारत ह्या प्रकल्पामध्ये सामील होऊ शकतो का - त्याने तसे करावे का? जर चीनने हा प्रकल्प त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला असेल तर नाहक संघर्ष टाळण्यासाठी भारताला काय करता येईल? फेक्युलरांचे सोडा  - पण आपल्या मनाच्या समजुतीसाठी ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहिती असायला हवीत. आपल्याला पटले तर दुसऱ्याला पटवणे शक्य आहे.

मध्यंतरी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून बलुचिस्तान लढ्याला आपला पाठिंबा जाहीर केल्यानंतर माझी काही मंडळींशी भेट झाली. इथे काही डाव्या - काही उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीही होत्या. त्यामधल्या काही डाव्यांना चीन कसा प्रबळ आहे - लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या - भारत कसा त्याच्या पासंगाला पुरु शकणार नाही असे सांगताना उकळ्या फुटत होत्या. सिपेक हा प्रकल्प आणि चीनची त्याविषयामधली दृढता ही त्यांच्यासाठी समाधानाची बाब आहे असे दिसत होते. अशा प्रकारचे करार चीन करतो तेव्हा तो करारामधल्या भूमीवर सार्वभौमत्व कसा प्रस्थापित करतो आणि यजमान देशाच्या हातातील नाड्या आपल्या हाती घेतो हे सांगतानाही त्यांना कमालीचा आनंद झालेला दिसत होता. त्यांना आनंद झाला म्हणूनच मी चिंताक्रांत झाले आणि ह्या विषयामध्ये अधिकाधिक वाचन करत गेले. त्यातून काही धक्कादायक गोष्टी समजत गेल्या.

सिपेक प्रकल्प पाकव्याप्त काश्मिरातून जात आहे. हा प्रदेश भारताचा असून पाकिस्तानने अनधिकृतरीत्या त्यावर कब्जा केला आहे. म्हणजेच भारताच्या प्रदेशामधून भारताच्या अनुमतीशिवाय पाकव्याप्त काश्मिरातून हा प्रकल्प हाती घेणे हे पाकिस्तान आणि चीनने  भारताच्या सार्वभौमत्वाला दिले आव्हान आहे असे भारत सरकार समजते हे सत्य आहे. हाच प्रकल्प पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतांमधून उभारला जाणार असून ग्वादार बंदराला जोडणारा असेल. ह्या प्रकल्पाला बलुची लोकांनी विरोध दर्शवला असून ते अनेकदा प्रकल्पाच्या कामावरती हल्ले चढवत असतात. चिन्यांनी आपल्या प्रांतांमधून गाशा गुंडाळावा अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानचा भाग नव्हता. पाकिस्तानने तिथे सैन्य पाठवून तो काबीज केला हा इतिहास आहे. गिळंकृत केलेल्या ह्या प्रांतातील लोकांवर पंजाबी पाकिस्तान्यांनी अनन्वित अत्याचार केले असून तिथे कायद्याचे राज्यही नाही आणि तिथे पाकिस्तानी सैन्याद्वारे मानवाधिकारांची सतत पायमल्ली केली जाते.  ह्याच पार्श्वभूमीमुळे मोदी सरकारने बलुचिनच्या स्वातंत्र्यलढ्याला आपली सहानुभूती असल्याचे विधान लाल किल्ल्यावरील भाषणांमधून केले होते. पाकव्याप्त काश्मिरातून जाणारा प्रकल्प आणि बलुच लढ्याला पाठिंबा ह्या दोन कारणांवरून भारत सिपेक ला विरोध करत आहे असे चित्र आजवर आपल्यासमोर उभे आहे. पण खरोखरच हीच दोन कारणे आहेत का ज्यामुळे सिपेकच्या बाबतीत भारत सरकार चिंतित आहे - अन्य कारणे आहेत का आणि ती नेमकी काय आहेत ह्याचा शोध महत्वाचा ठरतो.

पाकिस्तानमध्ये परराष्ट्र धोरण त्याचे सैन्य ठरवते - तेथील नागरी राजकीय नेतृत्वाला त्यामध्ये काही स्थान नाही हे आपण अनेक वर्षे वाचत आलो आहोत. पाकिस्तानचे सैनिकी नेतृत्व बिलंदर आहे - स्मार्ट अमेरिकेनाना ते हातोहात उल्लू बनवतात - त्यांच्याकडून पैसे तर उकळतात पण कबूल केलेल्या कुठल्याच गोष्टी पूर्णत्वाला नेत नाहीत - आणि इतके करूनही अमेरिकेच्या नाराजीतून रोषातून आपली सहीसलामत सुटका करून घेतात हा आपला अनुभव आहे. असे हे बिलंदर सैन्य कोणालाच जुमानत नाही आणि त्याने देशाच्या महत्वाच्या निर्णयांच्या किल्ल्या आपल्या हाती राखून ठेवल्या आहेत असाच माझाही तुमच्यासारखा समज होता. सिपेक संदर्भाने जितके वाचत गेले तेव्हा लक्षात आले की वस्तुस्थिती आता बदलली आहे आणि त्याची फारशी दाखल भारतीय माध्यमांनी घेतलेली नाही.

भारतीय उपखंडापुरता विचार केला तर असे दिसते की पाकिस्तानचे सर्व निर्णय चिनी नेतृत्व घेत आहे. आणीबाणीची परिस्थिती आलीच तर पाकिस्तानी नेतृत्व प्रथम चीनला पळते आणि त्यांचे विचार काय आहेत हे जाणूनच पुढचे पाऊल टाकते. ही परिस्थिती काही आजची नाही. तुम्हाला आठवत असेल की कारगिल युद्धाच्या आधी आपण हल्ला करणार ही बाब पाकिस्तानी सैन्याने चीनशी चर्चा करून ठरवली होती. लाल मशिदीमध्ये ठाण मांडून बसलेल्या मुल्लाने जेव्हा चिनी इंजीनियर्सवर हल्ले केले तेव्हा चीनने दमात घेतल्यावर लाल मशिदीवर पाकिस्तानी सैन्याने कारवाई केली आणि संबंधित मुल्लाला ताब्यात घेतले. पाकिस्तानचा अणूकार्यक्रम सर्वस्वी चीनवर अवलंबून आहे. पाकिस्तानी लष्कराकडे जी हत्यारे - शस्त्रे अस्त्रे आहेत त्यातली अधिकाधिक चिनी बनावटीची आहेत. आज एखाद्या पाकिस्तानी जनरलने चीनकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या देशातून शस्त्रास्त्रे खरेदी करण्याचा निर्णय घेतला तर चीन पाकिस्तानी भांडारात असलेला शस्त्रसाठा निकामीही करू शकतो. अशा तऱ्हेने पाकिस्तानी सैन्याचे हात पिरगळणे चीनला अजिबात कठीण नाही. चिनी ड्रॅगनच्या जबड्यात स्वेच्छेने पाकिस्तानने आपली मान दिली आहे आणि चीन त्याची पुरती किंमत वसूल करणार यात शंका नाही.

म्हणूनच ह्या गोष्टीचा भेदक विचार पुढच्या भागामध्ये करू.

Thursday 11 May 2017

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग 2

ओबॉर - सीपेकचे रहस्य भाग 2

सूचना - हा विषय प्रवाही आहे. इथे दिलेल्या परिस्थितीमध्ये कधीही कोणत्याही पक्षाकडून लहान मोठा बदल होउ शकतो. कृपा करून नेट वर उपलब्ध असलेल्या एखादा दुसऱ्या लेखाच्या अनुषंगाने मतप्रदर्शन होउ नये. मोदी सरकार निष्क्रिय आणि नालायक - षंढ असल्याचा निर्णय आधी मनाशी घेऊन त्याला साजेसे युक्तिवाद इथे केले जाऊ नयेत. त्यासाठी भरभक्कम आधार दिला जावा. फेक्युलर विचारवंतांची साक्ष न काढता निःपक्षपाती तज्ज्ञांचा आधार केव्हाही चांगला. धन्यवाद. 

सीपेक हा प्रकल्प असा आहे की जणू पाकिस्तानातल्या घराघरावर सोन्याची कौले चढतील अशी वर्णने पाकिस्तानच्या सोशल मीडिया मध्ये वाचायला मिळतात आणि पाकिस्तानी वर्तमानपत्रेही अशीच रसभारित वर्णने छापत आहेत. एक प्रकारे हे पाकिस्तानच्या राजकारण्यांच्या आणि सैन्याच्या धोरणाला अनुकूल असल्यामुळे ते देखील हा समज दृढ होण्याला हातभार लावत आहेत. पण काही विचारवंत पत्रकार उद्योगपती मात्र असे हुरळून जाणारे नाहीत.  अशा लोकानी सीपेकवर खोलवर प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. 

10 मार्च 2017 रोजी एशिया टाईम्स मध्ये लिहिलेल्या लेखात पाकिस्तानी पत्रकार सलमान रफी म्हणतात - "सीपेकचे गूढ वाढत चालले आहे.  त्यामध्ये पाकिस्तानचे हित कुठे दिसत नाही. पाकिस्तानसाठी "बाजी पालटणारा" प्रकल्प म्हणून याची गणना होत होती पण त्याला पुरावा काहीच नाही. ह्या प्रकल्पामुळे इथे चीनचे वर्चस्व मात्र वाजवीपेक्षा जास्त वाढेल याची चिन्हे आहेत." मुख्य म्हणजे जनतेच्या शंकाना उत्तरे देणारे कोणी नाही. गेल्या वर्षी पाकिस्तानचे नियोजन आणि विकास मंत्री एहसान इकबाल यानी सिनेटला  सांगितले की कराराची प्रत सिनेट अध्यक्ष यांच्याकडे ठेवली आहे. ज्याना ती बघायची असेल त्यानी अध्यक्षांच्या चेंबरमध्ये ती पाहावी. जी प्रत ठेवली आहे ती देखील कच्चा मसुदा आहे. त्यामध्ये बदल केले जातील. म्हणजेच नेमका काय करार केला जात आहे ह्याची माहिती सिनेटच्या सभासदानाही नाही. मग इतरांची काय कथा? प्रश्न असा मनात येतो की पाकिस्तानचे नंदनवन करायची क्षमता असलेल्या ह्या प्रकल्पाची साधी प्रत सिनेट सभासदाना का उपलब्ध असू नये? गुप्ततेच्या वातावरणामुळे लोकांना  प्रकल्प गूढ तर वाटणारच. शिवाय त्या संदर्भात केले जाणारे दावे कितपत खरे आहेत असेही वाटणे स्वाभाविक आहे. म्हणजेच हा प्रकल्प केवळ आर्थिक प्रगतीशी निगडीत असता तर ते दृश्य दिसलेच नसते - प्रकल्पाच्या साऱ्या बाबी सार्वजनिक जीवनात खुल्या झाल्या असत्या.  प्रत्यक्षात मात्र तसे नसून त्यामागे अन्य बाबी असाव्यात आणि त्याची वाच्यता बाहेर होणार नाही याची काळजी घेतली जात असल्याची भावना आहे.  जर हा प्रकल्प केवळ आर्थिक क्षेत्रामधला असता तर आपल्या कराचा पैसा कुठे कसा खर्च होतो ते जाणण्याचा अधिकार पाकिस्तानी जनतेला आहे पण ह्याविषयी काहीही माहिती मिळणे दूरापास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये चिनी सैन्य आणि पाकिस्तानी सैन्य संगनमत करून आपल्या माथी हा करार मारत आहेत असा सर्वसाधारण समज होत चालला आहे. अर्थातच ही बाब लोकांच्या हिताची नसावी.

सिपेकसाठी आपण 46०० कोटी डॉलर्स खर्च करणार आहोत असे चीन सांगतो. हा खर्च आता ५६०० कोटी डॉलर्स झाला आहे. या खेरीज पाकिस्तानने देखील आपला काही खर्चाचा वाटा उचलायचा आहे. रस्त्याला संरक्षण देणे ही पाकिस्तानची जबाबदारी असेल. म्हणून पाकिस्तानने नवे १५००० सुरक्षा सैनिक भरती करण्याचा निर्णय घेतला. ह्याचा खर्च देण्याचे चीनने नाकारले आहे. संरक्षण ही तुमची जबाबदारी आहे असे सांगून ह्या खर्चामधला हिस्सा देण्यास चीनने नकार दिला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोडण्यात येणाऱ्या जमिनीच्या पट्ट्यांमध्ये केवळ चिनी कंपन्या काम करू शकतील - इतराना तिचे प्रवेश नाही अशी अट आहे. ह्या कंपन्यांमध्ये लागणारे बव्हंशी कामगार चीन स्वतःच्या देशामधून आणणार आहे. ती संधी पाकिस्तानी नागरिकांना मिळणार नाही असा स्पष्ट उल्लेख करारामध्ये केला गेला आहे. त्यामुळे यामध्ये कोणतीही संदिग्धता नाही. कंपन्यांना लागणारी यंत्रसामग्री फक्त चीन मधून आयात केली जाईल. कारखान्यांसाठी लागणारी वीज स्वतः चिनी कंपन्या बनवतील. त्यामधली शिल्लक वीज पाकिस्तानी जनतेला देण्यात येईल परंतु ह्या विजेचे भाव आजच्यापॆक्षा जास्त असतील. नेमके किती ते मात्र कोणीच सांगत नाही. 

कॉरिडॉरसाठी रेल्वे चीन स्वतः बांधेल. ग्वादर बंदर आणि ही रेल्वे यांच्या देखभालीसाठी ज्या चिनी कंपन्या पाकिस्तान मध्ये येतील त्यांना २३ वर्षांसाठी करामधून सूट देण्यात येणार आहे. अर्थातच पाकिस्तानचा होणारा खर्च भरून निघण्याच्या फारशा वाटा नाहीत त्यामुळे पाकिस्तानी सरकारने १% सरचार्ज घरगुती वीज ग्राहकांवर लावला असून त्यामधून हा खर्च उभारला जाईल असे दिसते. अन्य खर्चासाठी चीन आपल्याच बॅंकांमार्फत कर्ज उपलब्ध करून देते. पण चिनी बँकांच्या कर्जाचे व्याजदर आय एम एफ यांच्या दरांपेक्षा चढ्या भावाचे असतील. ते तसे परवडणारे नाहीत. ह्यालाच DEBT TRAP किंवा कर्जाचा सापळा म्हणतात. म्हणजे व्याजाची रक्कमच इतकी जास्त होत जाते की मूळ भांडवल आणि व्याज दोन्ही फेडणे कठीण होऊन जाते. सरते शेवटी कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढत गेला की चीन सांगेल त्या अटीवर - अगदी जमिनीच्या सार्वभौमत्वावरही मंडलिक देशांनाही समाधान मानून घ्यावे लागेल कारण त्यावेळी त्या सापळ्यामधून सोडवायला कोणी पुढे येऊ शकणार नाही. (पहा उदाहरण ग्रीस अथवा स्पेनचे - घेतलेले कर्ज फेडता येत नाही आणि युरोपियन युनियनच्या अटी मानायच्या  तर देशात हाःहाःकार उडतो आहे. पण त्या विनाशकारक अटी पाळण्यावाचून गत्यंतर नाही.) अशी भीषण परिस्थिती जेव्हा येते तेव्हा कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याची जमीन कब्जा करणारा सावकार आणि अवाच्या सव्वा दराने कर्ज देणारा चीन यांच्यामध्ये काही फरक राहणार नाही. 

ह्या प्रकल्पामधून पाकिस्तानमध्ये कोणतेही परकीय भांडवल येणार नाही. उलट पुढील ३० वर्षात मिळून पाकिस्तानलाच चीनचे ९००० (5600 च्या बदल्यात) कोटी डॉलर्स परत करावे लागणार आहेत. दर वर्षी ३७० कोटी डॉलर्सची परतफेड अंगावर पडणार आहे. पाकिस्तानच्या खजिन्यात परकीय गंगाजळीचा खडखडाट आहे. तेव्हा कर्जफेड होणार कुठून असा प्रश्न पडतो. अशा परिस्थितीमध्ये चीन सरकारकडे कॉरिडॉरच्या जमिनीचे सार्वभौमत्वच जाणार हे उघड आहे. शिवाय ग्वादर बंदराचा वापर चीन हळूहळू स्वतःचा तळ म्हणून करू लागणार आहे हे उघड आहे. आणि चीनसाठी ज्या वस्तू महत्वाच्या आहेत त्या वस्तूंच्या आयात निर्यातीसाठी  ते बंदर वापरले जाऊ लागेल आणि त्याला पाकिस्तान हरकतही घेऊ शकणार नाही. 

इतक्या महत्वाचा हा प्रकल्प असल्यामुळे चीन भारताच्या भूमिकेमुळे अस्वस्थ आहे. भारत बाजूला राहिला तर हा प्रकल्प खऱ्या अर्थाने उभा राहणार नाही हे चीनला कळते म्हणून आपणही भारत पाकिस्तानात काश्मीर ह्या विषयावर मध्यस्थी करायला तयार आहोत असे तो मधूनच म्हणतो. पण हा व्दिपक्षी मामला असून त्यामध्ये भारताने अन्य कोणत्याही पार्टी ला आजवर चंचू प्रवेश करू दिलेला नाही आणि यापुढेही करू देणार नाही हे निश्चित.

थोडक्यात काय तर परिस्थिती अशी आहे की OBOR ह्या प्रकल्पाच्या यशामागे शी जीन पिंग यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. आणि सिपेक म्हणजे प्रकल्पाचा शिरोमणी आहे. तेव्हा सिपेक शिवाय अधुरे आहे आणि शिवाय शी जीन पिंग यांनी जीव जरी ओतला तरी प्रकल्पाची एकंदर अवस्था बघता खुद्द चीनमधल्या बँकाच यामध्ये राजकीय तोडगा निघेपर्यंत त्यामध्ये जास्त गुंतवणूक करू नये असे मत बोलून दाखवत आहेत. चीनमध्ये अन्य चिन्हेही आर्थिक संकटाची नांदी देत असल्यामुळे आर्थिक कारणासाठी हा प्रकल्प सोडावा लागला असे दिसणे म्हणजे चीनच्या प्रतिमेला तडा जाण्यासारखे होईल 

दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की चीन अशी नामुशकी टाळायचा प्रयत्न करेल. त्याचे विस्तारवादाचे धोरण यशस्वी करायचे तर सर्व आशा ह्याच प्रकल्पाशी निगडित आहेत म्हणून चीन टोकाची भूमिका यावर घेऊ शकतो. दुसरीकडे पाकव्याप्त काश्मिरातून जाणाऱ्या रस्त्याला भारत कधीच सहमती देऊ शकणार नाही. रशिया जरी चीनच्या बाजूने उभा राहू म्हणाला तरी अमेरिकेला सुद्धा इथे दोर ढील सोडता येणार नाही. म्हणूनच मला वाटते की युद्धाचे बीज इथे पेरले गेले आहे आणि अशी युद्धसमान परिस्थिती आपल्या परसदारात निर्माण झाली आहे. जिथे एकाच महासत्तेचे लक्ष वळते तिथे युद्ध सुरु होते इथे तर तीन तीन महासत्ता आपला डाव साधण्याच्या पवित्र्यामध्ये आहेत. म्हणून हाती काय आहे ह्याचा विचार करून प्रत्येक पाऊल उचलणे गरजेचे आहे आणि सध्याचे  सरकार ते करत आहे ही बाब चांगली आहे. भारतानेही ह्या प्रकल्पामध्ये सामील व्हावे आणि आपला विकास साधावा असा शहाजोगपणाचा सल्ला देणारे विद्वान आपल्याला लवकरच बघायला मिळतील. प्रकल्पाचे नाव CPEC असे न करता आम्ही CIABEK असे करायला तयार आहोत असे चीनचे प्रतिनिधी मंडळ सांगते. पण ह्या विषयामधला अंतिम निर्णय सूज्ञ मोदी सरकारवर सोडणे उत्तम.