Sunday 5 April 2020

तबलीघी जमात - बॉब वुलमरचा मृत्यू

तबलीघी जमात - बॉब वुलमरचा मृत्यू



प्रशिक्षक बॉब वुलमर

कोरोना प्रादुर्भावाच्या निमित्ताने तबलीघी जमात आज प्रकाशझोतामध्ये आली असून जनक्षोभाचा आगडोंब उसळला आहे तरी आमचे पुरोगामी लिब्बू मूग गिळून बसले आहेत. म्हणूनच लिब्बूंना अडचणीत आणणार्‍या तबलीघच्या इतिहासाबद्दल तुम्हाला माध्यमांमध्ये वाचायला मिळणे अवघड झाले आहे. इतिहासातील अशा अनेक घटनांकडे आज बोट दाखवता येईल पण काही उल्लेख मात्र नजिकच्या काळातले असूनही विस्मृतीमध्ये गेल्यामुळे त्यांना उजाळा देणे आज गरजेचे झाले आहे. जिथे मार्ग दिसत नाही तिथे गुरूचे बोट धरायचे असते या नियमाला अनुसरून माझे मानलेले गुरू आणि रॉ चे माजी अडिशनल सेक्रेटरी श्री बी रामन यांच्या लेखणीमधून उतरलेल्या तबलीघबद्दलच्या लेखांचा खजिना उघडताच मार्ग प्रकाशमान झाला. त्यामधलेच एक प्रकरण आज तुमच्यासाठी लिहीत आहे.

मार्च २००७ मध्ये झालेल्या वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानी संघाचा दारूण पराभव झाला होता हे तुम्हाला आठवत असेल. दारूच्या पार्टीमुळे संघ कोसळला आणि त्याला पराभव पत्करावा लागला अशा वावड्या नंतर उठल्या होत्या. पाकिस्तानी संघाच्या पराभवापेक्षा अधिक गाजली ती एक बातमी मात्र तुम्ही पूर्णपणे विसरून गेला असाल अशी मला खात्री आहे. ती घटना आहे पाकिस्तानी संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करणार्‍या बॉब वूलमरचा त्याच्या हॉटेलच्या खोलीतच खून झाल्याची बातमी संपूर्ण जगाला हादरवून गेली होती. वर्ल्ड कपची सुरूवात झाली १३ मार्च रोजी. पण त्या आधी एक दिवस सुप्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार श्री आमीर मीर (हामीद मीर यांचे बंधू) यांचा एक खळबळजनक लेख आऊटलुकने १२ मार्च रोजी प्रसिद्ध केला होता. For God's Sake, It's Cricket अशा शीर्षकाखाली छापलेल्या लेखामध्ये आमीर यांनी पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंवरचा तबलीघी जमातचा वाढता प्रभाव याकडे या लेखामध्ये लक्ष वेधले होते. आमीर म्हणत होते की हा खेळ आहे बाबांनो!! आमीर यांनी लिहिले होते की पाकिस्तानी संघातील खेळाडू तबलीघच्या आहारी गेले आहेत इतके की हा प्रभाव त्यातील खेळालाच गुदमरवून टाकत आहे. तबलीघचे शिक्षक खेळाडूंना "मुसलमान बना" म्हणून शिकवत होते. आपण मुसलमान आहोत हे दाखवण्याची खेळाडूंमध्ये अहमहमिका लागली होती. आपली धार्मिकता लोकांमध्ये दिसावी यासाठी ते धडपडत असत. मैदानात आपली कामगिरी कशी असेल यापेक्षा इस्लामवर श्रद्धा ठेवली तर संघ जिंकेल या समजूतीमध्ये खेळाडू वावरत होते हे पाहून पाकिस्तानी संघाचा माजी बॅटस् मन मोहसीन खान सुद्धा अस्वस्थ झाला होता. आमीरच्या त्या लेखामध्ये मोहसीनने केलेली टीका अंतर्भूत होती पण आऊटलुकने ते प्रसिद्ध करायला नको होते असे त्याने नमूद केले होते.

आपली कामगिरी क्रिकेटच्या मैदानामध्ये चांगली व्हावी याकडे त्यांचे लक्ष नव्हते. काफिरांना इस्लाममध्ये आणण्याच्या कामामध्ये ते गर्क होते. साहजिकच त्यांचे क्रिकेटकडे दुर्लक्ष झाले आहे असे उघडपणे लिहिले जात होते म्हणजे ही समस्या किती जटील झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. लेख लिहिणारा आमीर वगळता नेमक्या ह्याच भावना पाकिस्तानी संघाचे मीडिया मॅनेजर पी जे मीर यांनीही व्यक्त केल्या होत्या. ते लाहोर इथे वार्ताहरांना म्हणाले - वेस्ट इंडीजमध्ये अन्य संघही आले होते. पण पाकिस्तानी खेळाडूंचा उत्साह त्यांना धर्मांतर करायला प्रोत्साहित करून इस्लाममध्ये आणण्यात लागला होता. विमानामध्येही पाकिस्तानी खेळाडू अझान का देतात असा प्रश्न मला विदेशी पत्रकार विचारत होते. मी त्यांना हे सांगू शकलो नाही. पण आता मात्र मी परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन कमिटीला कळवले आहे की बहुतेक सर्व खेळाडूंचे लक्ष खेळाकडे नसून धर्मप्रसाराकडे लागले अहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर विपरित परिणाम होत आहे." मीर यांच्या कथनाचा इनकार एका झटक्यामध्ये माजी कर्णधार इन्झमाम उल हक आणि त्याचा एक वेळचा उपकर्णधार मोहमद युसुफ यांनी केला. उचित मर्यादेपर्यंत धर्म आणि क्रिकेटचे मिश्रण करण्यास माझा आक्षेप नाही असे इन्झमामने स्पष्ट केले. परंतु मीर म्हणाले की माझ्याकडे व्हिडियो आहेत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मी ते देणार आहे". आपल्या स्पष्टवक्तेपणाची किंमत मीर यांना लगेचच चुकवावी लागली. त्यांनी बोर्डाने बाहेरचा रस्ता दाखवला. पण त्याने वस्तुस्थिती थोडीच बदलणार होती? कर्णधार इन्झमाम संघामध्ये सदस्याची निवड करताना तो सश्रद्ध मुस्लिम आहे की नाही यावर भर देत होता अशा वावड्या होत्या. दौर्‍यावर असताना खेळाडू हॉटेलमधील एक खोली केवळ प्रार्थनेसाठी राखून ठेवत असत. त्यांच्यासोबत टीव्ही पत्रकार नईम भट त्याच हॉटेलमध्ये राहत असत. नईम भट स्वतःच एक कट्टर तबलीघी होते. दौर्‍यावर असतानासुद्धा तबलीघच्या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन खेळाडूंना मिळावे म्हणून नईम विदेशी प्रशिक्षकांसोबत व्हिडियो कॉन्फरन्स आयोजित करत असे.

पाकिस्तानी समाजजीवनामध्ये वावरताना खेळाडू आपण मुस्लिम असल्याचे मुद्दाम दाखवून देत ही बाब क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष व लष्करशहा मुशर्रफना सुद्धा आवडली नव्हती. त्यांनी बोर्डातर्फे त्यांना समज देण्यात यावी असे कळवले होते. त्यानुसार बोर्डाचे चेयरमन नसीम अश्रफ यांनी खेळाडूंना तसे कळवले इतकेच नव्हे तर आपण हा निरोप दिल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जाहीर केले. अर्थात पाकिस्तानी खेळाडू तबलीघच्या इतके आहारी गेले होते की ते जातील तिथे तिथे तबलीघ सोबत असायचीच. सकाळ दुपार संध्याकाळ खेळ सुरू होताना - जेवणाच्या वेळी - चहापानाच्या वेळी आणि सामना वा प्रॅक्टीस संपली तरी ते तबलीघच्या प्रशिक्षकासोबत असतात - माझ्यासोबत नसतातच - माझे ऐकण्याऐवजी ते त्यांचे ऐकतात मी आता पार निराश झालो आहे असे वुलमरने मला सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते असे बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी स्पोर्टसवीकला सांगितले. वुलमरने मला विचारले मी काय करू? मी त्याला सल्ला दिला - बॉब तू बाहेरचा आहेस - परकीय आहेस. तू यामध्ये पडू नकोस - त्याचा विपरीत परिणाम होईल असे मी बॉबला सांगितले होते असेही शहरयार म्हणाले.  तीन महिन्यांनी बॉब मला पुन्हा भेटला तेव्हा त्याने माझा सल्ला अमूल्य असल्याचे मान्य केले. धर्मामुळे खेळाडूंमध्ये ऐक्य आहे असेही तो म्हणाला आणि त्याची नाराजी निघून गेली होती असे शहरयार म्हणाले. बॉबने त्यापासून दूर राहण्याचा विचार केला होता. त्याला आता एवढीच समस्या होती की सामना चालू असताना काही महत्वाच्या बाबींवर बोलायचे असले तरी तो त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. त्याचा सल्ला इन्झमाम मानतही नसे. संघासाठी त्यांचा नेता इन्झमामच होता. त्याचा निर्णय त्यांच्यासाठी अंतीम होता. त्यांच्या लेखी बॉबला महत्व नव्हते. एरव्ही अतिशय सुस्वभावी असलेला इन्झमाम कोणी इस्लामच्या विरोधात काही बोलला तर अचानक हिंसक होत असे. आणि त्याचे हे वर्तन संघाला पूर्णपणे मान्य होते. पाकिस्तानचे सर्वेसर्वा असलेल्या एका लष्करशहालाही धाब्यावर बसवण्याची मस्ती या खेळाडूंमध्ये कशामुळे आली असावी यावर तुम्हाला काही संदेह आहे काय? 

वर्ल्ड कपचा सामना १३ मार्च ते २८ एप्रिल पर्यंत चालला. पण १८ मार्च रोजी आयर्लंडच्या संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला. यानंतर काही तासातच वुलमर यांचा हॉटेलच्या खोलीत खून झाल्याची बातमी आली होती. जमेकाच्या पोलिसांनी खुनाची केस नोंदवून त्याचा तपास केला जाईल असे जाहीरही केले होते. तीन पाकिस्तानी नागरिक हामीद मलिक - झुंडी खान आणि इफरान चौधरी त्याच हॉटेलमध्ये राहत होते व खेळाडूंना लागणार्‍या छोट्यामोठ्या वस्तू वा हलाल जेवण आणून द्यायचे काम ते करत होते असे म्हणतात. बॉब राहत होता त्या १२ व्या मजल्यावर जाण्यास त्यांची "सोय" होती. अनेक वार्ताहर परिषदेत वा अन्य ठिकाणी ते खेळाडूंसोबत दिसत. बॉबच्या मृत्यूनंतर ह्या तिघांनी हॉटेल सोडले. त्यांची चौकशी झाली की नाही हे उघड झालेले नाही. अखेर नैसर्गिक कारणाने मृत्यू अशी नोंद करून केस आटोपली गेली. रॉ चे अडिशनल सेक्रेटरी श्री बी रामन यांनी त्यांच्या खुनानंतर वुलमर संघाच्या तबलीघच्या आहारी जाण्याबाबत करत असलेल्या या "हस्तक्षेपाबाबत" तर त्यांना ठार मारण्यात आले नव्हते अशी शंका व्यक्त केली होती. जमेकाच्या पोलिसांनी पाकिस्तानी संघाबरोबर तबलीघचे कोण सदस्य गेले होते याची पूर्ण चौकशी करावी अशी रामन यांनी सूचनाही केली होती. सर्व प्रकरण अर्थातच गुलदस्तात राहिले आहे. 

दौर्‍यावरून परतल्यावर वार्ताहरांशी बोलताना इन्झमाम म्हणाला आमच्या पराभवाचे खापर इस्लामवर फोडणे चुकीचे आहे. अनेक तांत्रिक मुद्दे आहेत जे पराभवाला कारणीभूत आहेत याकडे मी तुमचे लक्ष वेधतो. धर्माचे अनुसरण केल्याने मनुष्य प्रामाणिक बनतो -आपले कर्तव्य तो प्रामाणिकपणे पार पाडतो. आम्हाला विजय आवडतो तसे पराभवही स्वीकारता आला पाहिजे. वर्ल्ड कपमध्ये तर भारतही हरला आहे. मग पत्रकार मीर यांना भारतीय संघाच्या पराभवाबद्दल काय म्हणायचे आहे? असा उलट प्रश्नही इन्झमामने विचारला. आमीर मीरने संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे असेही इन्झमाम म्हणाला. 

पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने खेळले जाऊ नयेत म्हणून सेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे म्हणाले की त्यांच्यावर खेळामध्ये राजकारण आणल्याचा आरोप करणारे आणि ठाकरे यांनाच अतिरेकी ठरवणारे लिब्बू वुलमरच्या मृत्यूवर संदेहसुद्धा घेत नव्हते हे विशेष. बॉबच्या मृत्यूच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे १९ मार्च रोजी तत्कालीन कॉन्ग्रेस खासदार श्री राहुल गांधी देवबंदच्या दौर्‍यावर होते. वुलमरचा खून झाला असे आज आपण म्हणू शकत नसलो तरी तबलीघच्या शिकवणुकीचे चटके त्यांनी भोगले होते हे मात्र निश्चितपणे सांगू शकतो.


6 comments:

  1. छान वेगळ्या माहितीचा लेख. धन्यवाद. या धर्मवेडाला सामना करण्यासाठी हिंदू एकता कशी होईल, ते लिहावे ही विनंती

    ReplyDelete
  2. https://www.google.com/amp/s/www.outlookindia.com/website/amp/tablighi-jamaat-and-pakistan-team/234243

    ReplyDelete
  3. We expect a detailed lekhmala from you on jamat...10 15 bhaganchi

    ReplyDelete
  4. हे सर्व इस्लामच्या नावाखाली अमानुषपणा करत आहेत..शेवटी माणुसकीच्या जीवावर जे उठले आहेत त्यांचा व त्यांना पाठिशी घालणार्यांचा नि:पात झाला पाहिजे.

    ReplyDelete
  5. ही लोक.काहीही करू शकतात

    ReplyDelete