Monday 14 June 2021

कोविद १९ - लपवले काय? मिळवले काय? भाग २

रोगाची लागण चीनच्या सर्वदूर प्रांतामध्ये (तिबेट वगळता) झाल्याचे दिसल्यामुळे भारतीय दूतावासाने २६ चा प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रमही रद्द केला होता. २९ जानेवारीपर्यंत अमेरिकेने आपल्या वुहानमधील दूतावासामधले तसेच शहरामध्ये अन्यत्र राहणारे १००० नागरिक मायदेशी नेले होते. दक्षिण कोरिया आणि फ्रान्सही अशीच योजना कार्यान्वित करत होते. इथे भारतात आयपीएलचे सामने रद्द करण्यात आले. ३० जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संस्थेने ही साथ म्हणजे जागतिक आणीबाणी असल्याचे जाहीर केले. पण भारताने तर त्या आधीच नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या होत्या. भारतीय दूतावासाने कसे अथक प्रयत्न करून भारतीयांना मायदेशी आणले त्याची कथा मार्च २०२० मध्ये द मिंट या वृत्तपत्राने छापली. २०१४च्या  बॅचमधील ३३ वर्षीय दीपक पद्मकुमार या दूतावासातील अधिकाऱ्याने वुहान शहरामध्ये राहून भारतीयांशी संपर्क करून त्यांना परत आणण्यामध्ये मोलाची कामगिरी केली. वुहानमध्ये पाऊल टाकायलाही कोणी धजावत नव्हते तेव्हा दीपकने तिथे जाण्याचे धाडस दाखवले आणि आपल्यावर सोपवलेली कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. असे म्हणतात की वुहान शहरामधल्यालोकांना वकिलातीने कुठे जमायचे आहे ते कळवले. जवळ जवळ एक आठवडा शहरामध्ये लॉक डाउन होता त्यामुळे भारतीयांना विमानतळावर पोचणे  सोपे नव्हते. त्यांना आणण्यासाठी बसेस पाठवल्या गेल्या. विमानाची सोय आधीच करण्यात आली होती. आपल्याला असे दिसून येते की शुक्रवारी संध्याकाळी विमान वुहान मधून निघायला  हवे होते पण ते शनिवारपर्यंत उडू शकले नाही. यामध्ये अडवणूक कशी झाली याची कथा माहिती नाही. भारताने एक फ्लाईट केवळ वुहानमधील नागरिकांसाठी सोडली होती. वुहान ज्या हुबे प्रांतात येते त्यामध्ये आणखी नागरिक अडकले होते. त्यांना मायदेशी आणण्यासाठी आणखी एक फ्लाईट शनिवारी सोडण्यात आली. तर अशा अडचणींवर वकिलातीला मात करायची होती. सुमारे २००० भारतीय नागरिकांना अशा परिस्थितीमध्ये मायदेशी आणणे सोपे नव्हते. ते सरकारने करून तर दाखवलेच पण जितक्या चपळाईने मोदी सरकारने ही पावले उचलली त्याने आश्चर्यचकित व्हायला होते. जेव्हा रोगाच्या भीषणतेचे गांभीर्य लपवण्यात चीन सरकार गुंतले होते तेव्हा मोदी सरकारने संकटाच्या स्वरूपाची कल्पना कशी केली असेल? 

एकीकडे चीन सरकार साथीच्या रोगाबद्दल फारसे काही गांभीर्य दाखवत नव्हते तर दुसरीकडे अमेरिका फ्रान्स दक्षिण कोरिया भारत सरकार मात्र तातडीने आपल्या नागरिकांना चीन मधून बाहेर काढण्याचे प्रयत्न का करत होते? आपल्या नागरिकांना चीनमध्ये धोका आहे असे त्यांना केवळ "वाटत" होते की त्यांची तशी खात्री पटली होती बरे? आणि खात्री पटलीच असेल तर ती कशामुळे? त्यांनी असे काय वेगळे पाहिले - अनुभवले होते की त्यांना अशी आणीबाणीची पावले उचलावीशी वाटत होती? अर्थ आणि संकेत उघड आहेत. चीन सरकारने कितीही माहिती दाबण्याचा प्रयत्न केला तरी महाभयानक रोगाच्या आगमनाची बातमी केवळ वूहान नव्हे तर अन्य शहरातही जनसामान्यांपर्यंत पोचली होती. आणि हेच माहितीचे ओघ वेगवेगळ्या दूतावासांपर्यंत पोचत असावेत. 

Wechat app असो किंवा अन्य मार्गानी - हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आणि मृत पावणाऱ्या नागरिकांच्या बातम्या पसरत होत्या. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्सदेखील रोगाला बळी पडत आहेत हे बघितले जात होते. एखादा रोगी आढळला तर तो राहत असलेल्या संपूर्ण इमारतीला टाळे ठोकले जात होते. नागरिकांनी बंड करू नये म्हणून सुरक्षायंत्रणा सज्ज केली गेली होती. शहरामधली आरोग्यव्यवस्था कोलमडून पडल्याची जाणीव होत होती. शहरामधली वाहतूक बंद केल्यामुळे लोकांना गरजेच्या वस्तूही मिळेनाशा झाल्या होत्या. आरोग्यसेवेत काम करणाऱ्या लोकांकडून प्रथमदर्शनी समाचार लोकांपर्यंत येत होता. सगळे दबलेल्या आवाजात असले तरी बातम्या पसरतच होत्या. घडतंय ते काहीतरी वेगळे आहे - महाभयंकर आहे - ही काही नेहमीची साथ नाही याची जाणीव होत होती. मृत्यूचे प्रमाणही मोठे असावे म्हणूनच लोक जागृत दिसत होते. मुख्य म्हणजे जनसामान्यांमधल्या या भावना जाणून घेण्यात परकीय सरकारच्या व्यवस्थांना यश आले असावे अन्यथा चिनी सरकारतर्फे अधिकृतरीत्या कोणतीही बातमी नसूनही इतकी निर्णायक पावले झपाट्याने उचलली गेली याला काहीही सबळ कारण उरत नाही. 

इथेच लक्षात येते की भारतीय दूतावासाच्या तिथे जाळे किती घट्ट विणले गेले आहे आणि संकटसमयीसुद्धा प्रभावीपणे काम करू शकले होते. १९८९ साली जेव्हा तियान आन मेन चौकामध्ये बंद करून उठलेल्या तरुणांना रणगाड्याखाली चिरडण्यात आले होते तेव्हा पाश्चात्य माध्यमे त्याच्या अतिरंजित कथा छापत होते. पण भारतीय वकिलात मात्र अत्यंत संयमी आणि वास्तववादी अहवाल मायदेशी पाठवत होते अशी आठवण त्या काळी चीनमधील दूतावासात काम करणारे व पुढील आयुष्यात परराष्ट्र सचिव झालेल्या श्री विजय गोखले यांनी नमूद केली आहे. "वृत्तपत्रांवर अवलंबून न राहता आम्ही तरुण अधिकारी चीनच्या विद्यापीठांमधून फिरलो व तेथील विद्यार्थ्यांचे मत अजमावून  घेऊन मग आमचे अहवाल पाठवत होतो. विद्यार्थ्यांना चिरडण्याचा प्रत्यक्ष विद्यापीठामधील वातावरणावर या घटनांचा काय परिणाम झाला आहे याची छाननी करून मग पाठवलेले अहवाल प्रचारकी थाटाचे नव्हते तर सर्वात जास्त वास्तववादी होते" असे गोखले म्हणतात. साधारणपणे अशीच अवस्था देशाने २०२० साली बघितली आहे असे दिसते. फरक एवढाच  की  १९८९ साली पाश्चिमात्य माध्यमे अतिरंजित अहवाल छापत होते तर २०२० साली चीनने मिंध्या करून ठेवलेल्या या माध्यमांनी सत्याकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे चीनमधील हाहाःकाराच्या कोणत्याही बातम्या म्हणजे अफवा असल्याचे ही माध्यमे २०२० साली कोविदची साथ उसळली असताना आपल्याला ठामपणे सांगत होती. 

चीनमध्ये पसरलेल्या झाल्यामुळे येणाऱ्या बातम्यांची छाननी करून मोदी सरकार अत्यंत सावधपणे वागले आणि नागरिकांचे प्राण सुरक्षित राहावेत म्हणून त्याने अथक प्रयत्न केले याची नोंद सर्व जगाला घ्यावी लागली.  योग्य वेळी उचललेल्या सावधगिरीच्या पावलांमुळे पहिल्या लाटेमध्ये कमीतकमी  नुकसान आपल्या वाट्याला आले. गंमत अशी की आज मात्र एकामागोमाग एक खुलासे येत आहेत त्यातून जाणवते की साथीच्या दाहकतेची जाणीव असूनही या बाबी जगापासून लपवल्या गेल्या. त्यामध्ये जसे चीन सरकार होते तसेच काही डेमोक्रॅट्स आणि लिबबू माध्यमे. पण एक गोष्ट ठळकपणे जाणवते ती ही की भारत सरकारकडे मात्र याची तंतोतंत माहिती असावी. आणि ती तशी आहे याची चीनला कल्पना आली असावी. दोनच दिवसां पूर्वी  मी एक विडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये असे सांगितले गेले आहे की चीनने अमेरिकन सीआयए चे अनेक अधिकारी पकडून तुरुंगात डांबल्यामुळे चीनच्या भूमीवरून गुप्त माहिती मिळवणे सीआयएला अशक्य झाले होते. असेच जर असेल तर ही गुप्त माहिती कोण बरे काढत होते? कोणाकोणापर्यंत ती पोचवली जात होती? त्यासाठी सहकार्य करण्याचे करार पाळले जात होते की "कागदाबाहेर" येऊन हे सहकार्य केले जात होते? कोविद १९ च्या तडाख्यातून भारत सावध व्हायच्या आत म्हणजे एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसात चीनचे सैन्य उत्तर सीमेवर आक्रमक पावले उचलू लागले होते. लॉक डाउनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेला भारत लष्करी प्रत्त्युत्तर देणार नाही हा आडाखा होता की भारताकडे असलेली "माहिती" त्याने चीनविरोधात "वापरू" नये म्हणून दिलेला हा इशारा होता याचे उत्तर काळच देणार आहे. (जब भी कभी कोई आवाज मेरे खिलाफ जोर से आती  है तो समझ लेना मोदी ने चाबी टाईट कर दी है.......)

ली मेंग यान याना सुखरूपपणे हॉंगकॉंग मधून बाहेर काढले - त्यांना अमेरिकेत नेण्यात आले - त्यांच्याकडे जी माहिती होती तिची कल्पना कोणाकोणाला होती? ली मेंग यान यांच्याप्रमाणेच अन्यही काही व्यक्ती अशा प्रकारची माहिती देत होत्या का? भारतीय वकिलातीने यामध्ये काही कामगिरी बजावली काय हे प्रश्न उत्सुकता वाढवणारे आहेत. आणि ट्रम्प यांचा पराभव झाला तरी जी माहिती बाहेर आली नव्हती ती आता अचानक का बाहेर येऊ लागली आहे आणि ही माहिती बाहेर आणण्याचा सूत्रधार कोण आहे - त्याचे लक्ष्य काय आहे याची उत्तरे काढायची तरी कशी? असो! जसजशी परिस्थिती वळणे घेईल तसतसा अंदाज येत जाईल. गेल्या वर्षी केलेल्या विडिओ मध्ये मी म्हटले होते की कोविद १९ म्हणजे चीनसाठी चेर्नोबिल ठरू  शकतो. त्या माझ्या भाकिताचे काय होणार याचेही उत्तर कालौघामध्ये जवळ येत आहे असे वाटत आहे. 

कोंबडे झाकून ठेवले म्हणून पहाट व्हायची थांबत नाही. कधी ना कधी बिंग फुटणारच होते. बायडेन यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा प्रश्न निकालात काढला की उर्वरित तीन वर्षे बिनधोकपणे राज्य करता येईल असा बेत असावा. प्रश्न आता इतकाच उरला आहे की याचे खापर कोणावर फुटणार आहे - अमेरिकेत डेमोक्रॅट्स यासाठी चीनला जबाबदार धरणार की ट्रम्प तात्यांना? याचे उत्तर उण्यापुऱ्या नव्वद दिवसात मिळणार आहे. जर चीनला जबाबदार धरण्याचा डाव असेल तर ९० दिवस पूर्ण होण्याआधीच चीनमध्ये सत्ताबदलाच्या हाका ऐकायला मिळतील. आणि जर ट्रम्प तात्यांना दोषी ठरवण्याचे घाटत असेल तर चक्रव्यूहाची रचना हळूहळू तशी होताना दिसेल.

7 comments:

  1. मँडम, जगाच्या राजकारणात काहीही घडू शकते. ज्यो बायडध ट्रम्पना जबाबदार धरु दे किंवा चीनला यातून पुढे काय घडेल याचा अंदाजच बांधावा लागेल.

    पण माझी म्हणणे वेगळेच आहे. या कोरोनाच्या काळात भारतात UPA चे सरकार असते तर? भारतीयांचे हाल कुत्र्यांने खाल्ले नसते. माता पुत्र, पुत्री, जावई आणि त्यांचे अनुयायी मस्त पैसे कमावत बसले असते. चीन आसामपर्यंत घुसून ठाण मांडून बसला असता. पाकिस्तानी अतिरेकी आणखी शेफारले असते. काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात गेला असता. सैन्य 1962 च्या परिस्थितीत पोहचले असते. यादी खूप मोठी आहे. पण त्या श्रीरामाचे आभार की भाजपा सलग दोनवेळा मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत आहे.

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच उत्तम! आपल्या लेखाचे इंग्रजी आणि हिंदी भाषांतर उपलब्ध जाऊ शकेल का?

    ReplyDelete
  3. आपले विश्लेषण, बातमी मागची बातमी समजून सांगण्याची हातोटी खूप छान आहे

    ReplyDelete
  4. अतिशय उत्सुकता वाढवणारा माहितीपूर्ण लेख

    ReplyDelete
  5. Namaskar Swatiji, I would like to invite Bhau to Sydney for an interview. Could you please share his contact details? Thanks a ton!

    ReplyDelete