Friday 15 March 2019

सेनानेतृत्वासाठी कसोटीचा काळ


स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत तथाकथित फेक्यूलर विद्वान पत्रकार बुद्धिजीवी लेखक कलाकार राजकीय नेते आदि मंडळींशी निकराचा सामना करावा लागला होता.

या फेक्यूलर लिब्बूंनी महाराष्ट्रासाठी जो "अजेंडा" ठरवला होता त्यातला एकमेव एकमेव अडसर बाळासाहेब आणि त्यांची शिवसेना व एकनिष्ठ शिवसैनिक हाच होता.

जेव्हा बाळासाहेब केवळ मराठीचा प्रश्न घेऊन राजकारण करत होते तेव्हाही त्यांना ह्यांच्या "हिंस्र" टीकेला सामोरे जावे लागत होते. आणि १९८५ च्या शहाबानो खटल्यानंतर यापुढचे राजकारण हिंदू म्हणून करेन असे जाहीर केल्यावर तर लिब्बू चेकाळलेच होते.

दैनिक सामना चा शुभारंभ होईपर्यंत शिवसेनेविषयी चार चांगले शब्द छापणारे एकही वृत्तपत्र महाराष्ट्रात नव्हते. आयुष्याच्या अखेरपर्यंत साहेबांनी जहरी टीकेचे घोट गिळले. कधी कधी पोलिसी कारवायांनाही त्यांनी तोंड दिले.

या त्यांच्या खडतर प्रवासाची आज आठवण काढण्याचे कारण काय?? तुलनेने विचार करता त्यांचे सुपुत्र उद्धवजींना इतक्या जहरी वातावरणाला आजवर तोंड द्यावे लागलेले नाही.  परंतु २०१९ च्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याचा निर्णय उद्धवजींनी घेतल्यामुळे ही परिस्थिती हळूहळू पालटताना दिसू लागेल.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर भाजप सेना युती तुटण्याचा जो कटु प्रसंग पहायला मिळाला त्यानंतर हळूहळू सेना मनाने भाजपपासून दूर होऊ लागली. इतकी की तिला मोदींच्या विरोधात गुजराथमध्ये आरक्षणाची मागणी घेऊन लढणारे हार्दिक पटेल - जिग्नेश मेवानी आणि लाल बावटा कन्हैय्या जवळचे वाटू लागले. ही गोष्ट अलाहिदा की बाळासाहेबांनी आयुष्यभर आरक्षणाला विरोध केला होता आणि मुंबईतून लाल बावट्याची सद्दी संपवून कामगारांना अन्य संघटना करण्यास वाव प्राप्त करून दिला होता. कानावर येणाऱ्या गोष्टींनुसार उद्धवजींचा आणि काँग्रेसचाही संवाद होतो की काय असे वाटू लागले होते. अशा तऱ्हेने एक प्रकारे सेनेचा लंबक भाजपपासून दुसऱ्या टोकाकडे गेलेला दिसत होता.

ह्याचा उल्लेख अशासाठी करते की बाॕलीवुड रिअल इस्टेट हवाला एनजीओ क्रिकेट या पायावर काँग्रेसचा डोलारा उभा होता. काँग्रेसच्या जवळ जाणे म्हणजेच या पापचक्राच्या जवळ जाण्यासारखे होते. हे चक्र असे आहे की या सिंहाच्या गुहेत आत जाणारी पावले दिसतात पण बाहेर येणारी पावले मात्र दिसत नाहीत. उद्धवजी एक प्रकारे गुहेच्या आत तर गेले शिवाय बाहेर येण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे.

दोनचार दिवसांपूर्वी टीव्हीवर श्री संजय राऊत यांची एक छोटी मुलाखत दाखवण्यात आली होती. त्यामध्ये बोलताना श्री राऊत म्हणाले की अगदी दोन दिवस आधी सुद्धा महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याचा आमचा निर्णय ठरलेला होता. पण अचानक दोन दिवसात काय बदलले हे मलाही माहिती नाही. अर्थातच उद्धवजींनी एक कठिण निर्णय स्वतःच्या हिंमतीवर घेतला आहे हे स्पष्ट होते. यासाठी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

म्हणजे महाराष्ट्रात युती हवी म्हणून उद्धवजींच्या निर्णयाचे स्वागत हे एक कारण आहे पण ते थोडे गौण म्हटले पाहिजे. कठिण परिस्थितीत त्यांनी कठोर निर्णय घेताना स्वयंपूर्णता दाखवली आहे. ह्याची त्यांना नजिकच्या भविष्यात वारंवार गरज पडणार आहे. गरज अशासाठी म्हटले की दुसऱ्या टोकाला लंबक गेला असता उद्धवजींनी ज्यांना जवळ घेतले ते आता सूडबुद्धीने वागण्याची शक्यता वाढत चालली आहे. अशामुळेच ज्या प्रखर विरोधाच्या विषारी वातावरणाला बाळासाहेबांना सामोरे जावे लागले त्याची पुनरावृत्ती उद्धव यांच्या बाबत आता होऊ शकते. यात नवे काही नाही. हा तर काँग्रेसचा इतिहासच आहे. म्हणूनच सल्लागार काय म्हणतात ते ऐकले तरी कठिण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याचे कसब त्यांना दाखवावे लागणार आहे,

सीएसटी पुलाच्या दुर्घटनेनंतर याची प्रचीती येऊ लागेल अशी चिन्हे आहेत. यामध्ये पूल महापालिकेच्या अखत्यारीतला असल्याने  सोशल मीडियामध्ये काही जणांना सेनेवर टीका करण्याचा मोह आवरत नाही असे दिसत आहे.  महाराष्ट्रात युतीला बदनाम करण्याचे षड्यंत्र राबवले जाणार आणि काँग्रेसचे डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट आपली करामत दाखवणार का यापेक्षा कधी दाखवणार असा प्रश्न मनात येतो आहे. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया कशा असाव्यात याचा सुज्ञांनी विचार करायचा आहे.

पुन्हा एकदा म्हणते At Any Cost हा शब्दप्रयोग निदान निवडणूक संपेपर्यंत मी विसरू शकत नाही. खास करून उद्धवजींना nerves of steel ची गरज भासत राहील आणि ते या कसोटीस उतरतील यात मला अशासाठी शंका नाही कारण एक तर उद्धवजींनी आपली निर्णयक्षमता दाखवली आहे आणि दुसरे म्हणजे  निष्ठावान शिवसैनिक पक्षाशी बांधला गेला आहे आणि असे प्रसंग वास्तवात उद्धव यांच्या वर आलेच तर बाळासाहेबांवर आलेल्या अशाच कटु प्रसंगांच्या आठवणीने तो अधिक कट्टर होत राहील.







7 comments:

  1. सहमत आहे. तुम्हा दोघांचे बाळासाहेबांबरोबर जे संबंध होते ते तुम्ही कधीही लपवलेले नाहीत, त्यामुळे ह्याला विरोधी टीका न म्हणता आपुलकीचा सल्लाचं म्हणावे लागेल. अर्थात सर्वांनाच हे समजेल असे नाही.

    ReplyDelete
  2. वैयक्तिक संबंधांपेक्षा राजकीय प्रक्रियेतून जे उमगते ते लिहिले आहे. महाराष्ट्रात "अंतीम लढाई" शिवसेनेशिवाय होऊ शकत नाही हे २०१४ आॕक्टोबर पासून माझे मत आहे.आणि ते आता सिद्ध झाले आहे.

    ReplyDelete
  3. उद्धव ठाकरेंनी कठिण परिस्थितीत कठोर निर्णय घेतला व स्वयंपूर्णता दाखवली आहे हे विश्लेषण योग्य वाटत नाही.


    २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मागील साडेचार वर्षात शिवसेनेची विश्वासार्हता रसातळाला पोहोचली व जनाधार जवळपास संपुष्टात आला. याच काळात भाजपची विश्वासार्हता व जनाधार अजून वाढला. विशेषत: शेतकऱ्यांना कर्जमाफी, केंद्रीय अंदाजपत्रक व हवाई हल्ला यामुळे भाजपची लोकप्रियता अजून वाढली आहे.

    मागील २-३ वर्षात १९ महापालिकांची निवडणुक झाली. भाजपने १४ महापालिकेत विजय मिळविला. शिवसेनेला फक्त ठाणे महापालिकेत विजय मिळाला. मुंबईत भाजपने जवळपास सेनेएवढ्याच जागा मिळविल्या. नगरपालिका, जिल्हा परीषद, पंचायत समिती या सर्व संस्थांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर आहे तर सेना तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आहे. सत्तेत राहून सतत विरोध केल्यामुळे व मोदी-शहांविरूद्ध अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन सातत्याने टीका केल्याने शिवसेना त्यांच्या कट्टर मतदारांच्या मनातून सुद्धा उतरली आहे. भाजपशी १९८९ मध्ये युती होण्यापूर्वी सेनेला मुंबई-ठाण्याच्या बाहेर ओळख नव्हती. भाजपने सेनेला खांद्यावर घेऊन मुंबई-ठाण्याच्या बाहेर नेले. परंतु मागील साडेचार वर्षात शिवसेनेचे अस्तित्व पुन्हा एकदा मुंबई-ठाण्याच्या बाहेर जवळपास संपुष्टात आले आहे.

    आज निवडणुक झाली तर सेनेला स्वबळावर लोकसभेत जेमतेम १-२ खासदार व विधानसभेत जेमतेम २५-३० आमदार निवडून आणता येतील. अशा परिस्थितीत भाजप बरोबर झालेली युती म्हणजे सेनेला मोठी लॉटरी लागली आहे. युतीमुळे सेनेचे १०-१२ खासदार व ६०-७० आमदार निवडून येऊ शकतील.

    म्हणूनच उद्धव ठाकरेंनी कठिण परिस्थितीत कठोर निर्णय घेतला व स्वयंपूर्णता दाखवली आहे हे योग्य विश्लेषण नसून आपल्या पक्षाची दारूण अवस्था ओळखून युती करावी लागली आहे.

    या युतीचा सेनेला प्रचंड फायदा होणार असून भाजपला तोटा होणार आहे. आपल्या जिंकलेल्या जागा सेनेला देऊन टाकून स्वत: खूप कमी जागा लढविणे ही भाजपची राजकीय आत्महत्या आहे. भाजपने स्वबळावर निवडणुक लढली असती तर किमान १८-२० खासदार व किमान १२० आमदार निवडून आले असते. परंतु दुर्बल सेनेला बरोबरीचे स्थान दिल्याने आता फार तर १५-१६ खासदार व फार तर ८०-९० आमदार निवडून येतील व सेनेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून रहावे लागून महत्त्वाची मंत्रीपदे सेनेला द्यावी लागतील.

    दुर्बल सेनेला बरोबरीचे स्थान देऊन ताकदीपेक्षा खूप जास्त जागा देणे व स्वत:ची ताकद जास्त असूनही खूप कमी जागा लढविणे हे शेवटी भाजपला खूप महागात जाणार आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मी राऊत यांचे विधान दिले आहे. जवळच्या मंडळींना देखील दोनचार दिवस आधी सांगितलेला निर्णय वेगळा होता ना? म्हणजेच निर्णय उद्धवजींनी स्वतः घेतला हे दिसते. भाजप जर इतक्या सबळ स्थितीत असती तर दिलेल्या जागा - नाणार - सोमैय्या आदि बाबीत तडजोड स्वीकारून युती करण्यासाठी पुढाकार घेतला गेला नसता. जसे सेनेचे वीकपाँईंटस् आहेत तसेच भाजपचे. म्हणून तडजोड एकतर्फी झाली नाही हे दिसतेच

      Delete
  4. बहुधा, उद्धव ठाकरे प्रशांत किशोरच्या सल्ल्याने चालत असावेत.2-3 वेळा त्यांची भेटही झाली आहे.प्रशांत किशोर मुळेच युतीचे शहाणपण सुचलेलं दिसतंय नाहीतर त्यांनी स्वतः च्या पायावर धोंडा मारून घेतला असता.

    ReplyDelete
  5. सल्ला देणारे असतातच पण त्यावर निर्णया त्यांनी घेतला की तेही प्रशांत किशोरनेच जाहिर केले मानायचे??

    ReplyDelete