Monday 19 November 2018

शहरी नक्षलींचे छुपे युद्ध

Image result for navlakha


"Liberalism is extremely harmful in a revolutionary collective. It is a corrosive which eats away unity, undermines cohesion, causes apathy and creates dissension. It robs the revolutionary ranks of compact organization and strict discipline, prevents policies from being carried through and alienates the Party organizations from the masses which the Party leads. It is an extremely bad tendency." - Mao Zhe Dong


ऑगस्ट २०१८ मध्ये देशभरामधल्या "शहरी नक्षलींना" पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यांना समर्थन देणारे अणि विरोध करणारे दोन्ही गट माध्यमांमधून त्याविषयी आपापली मते आग्रहाने मांडताना दिसत होते. परंतु माध्यमांच्या चर्चांमध्ये अनेक तथ्ये गुलदस्तात राहिली आहेत. नक्षलवाद्यांच्या बाबतीत सामान्य जनता वर्‍याच प्रमाणात अनभिज्ञ आहे. गोरगरीब भूमिहीन शेतमजूर आणि आदिवासींच्या प्रश्नांना तोंड फोडण्याचे काम नक्षलवादी आपल्या आंदोलनामधून करत असतात असा एक समज आहे. हे सगळे चळवळे दूर इकडे कुठेतरी खेडोपाडी वा दुर्गम डोंगराळ भागात राहतात. जो हिंसक मार्ग ते अनुसरत आहेत त्याविषयी तीव्र नाराजी बघायला मिळत होती. शहरापासून खूपच दूर. त्यामुळे नक्षलवाद्यांचा प्रश्न - त्यांचे आंदोलन हे कधीही आपल्या पर्यंत पोचणार नाही असा समज असल्यामुळे शहरामधली जनता त्याबद्दल थोडी उदासिनही होती. त्यामुळे ह्या प्रश्नाची नेमकी व्याप्ती काय त्यांचे उद्दिष्ट काय मार्ग काय तत्वज्ञान काय ह्याबद्दल मात्र बर्‍याच अंशी बेफ़िकिरी - अज्ञान बघायला मिळते. त्याचे दुसरे कारण म्हणजे ह्या राजकीय विचारसरणीबाबत इथले बुद्धिवंत - पत्रकार - सेक्यूलर - डाव्या मंडळींनी नक्षलींसभोवती निर्माण केलेले एक गूढ तरीदेखील पराक्रमाचे वलय. त्यांच्या साहित्यामधून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये डाव्या विचारसरणीबद्दल एक ओढा तयार झाला आहे आणि समाजामधील उच्चशिक्षितांमध्येही त्याविषयी सुप्त आकर्षण निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नक्षली लोक हिंसा करताना दिसत असून देखील त्यांचा कडकडीत निषेध होताना मात्र दिसत नाही. कारण नक्षलींचे माध्यमे आणी राजकारणातले हितचिंतक चांगलेच कार्यशील असून ते आपल्या संवेदना बोथट करण्याचे महत्वाचे कार्य पूर्ण करत असतात.  एकीकडे कायदा हातामध्ये घेऊन हातामध्ये बंदूका घेऊन नक्षली त्यांना नको असलेल्या व्यक्तींची हत्या करतात हे सामान्य जनतेला रुचत नाही पण ज्या आदिवासी आणि गोरगरीबांच्या नावाने हे युद्ध ते छेडतात त्यांनाच आपली ढाल म्हणून वापरत असल्यामुळे त्या गरीब जनतेच्या छाताडावरती सरकारने गोळ्या झाडू नयेत असेच मत सामान्य जनता व्यक्त करताना दिसेल. 

हे सर्व समज गैरसमज दूर करण्यासाठी हा लेख लिहिण्याचे ठरवले आहे. माध्यमांमधली चर्चा पाहिली किंवा लेख बघितले तर शहरी नक्षलींवरती जोरदार हल्ला चढवणार्‍यांनाही पोलिसांच्या आणि पर्यायाने ह्या सरकारच्या कृतीचे समर्थन योग्य प्रकारे करता आलेले नाही असे दिसले आहे. शहरी नक्षल म्हणजे "Arm Chair Politicians" - आरामखुर्चीमध्ये बसून अलिप्तपणे राजकारणाची चर्चा करणारे - त्यावरती लिखाण करणारे - भाषणे देणारे विद्वान - देशामधल्या "पददलित जनतेच्या" भांडवलशहांकडून होणार्‍या गळचेपीविरोधात वर्तमानपत्रातून - लेखातून - टीव्हीवरून वा सोशल माध्यमांमधून आवाज उठवणारे - ग्रामीण भागामध्ये शस्त्रे हाती घेऊन लढा देणार्‍या गरीब आदिवासी नक्षली माओवादी सैनिकांची बाजू मांडणारे आणि त्यासाठी हिरीरीने समाजामध्ये त्यांच्यावरील अन्यायाला तोंड फोडणारे बुद्धिवंत म्हणजे शहरी नक्षली अशी प्रतिमा उभी करण्यात आली आहे. वस्तुस्थिती अर्थातच उलटी म्हणजे दुसर्‍या टोकाची आहे. हे माझे लिहिणे तुम्हाला कितीही तर्कविसंगत वाटले तरीही जोवरती आपण खोलात जाऊन ह्याविषयी माहिती करून घेत नाही तोवरती शहरी नक्षलींच्या राक्षसी चेहर्‍याची पुसटशी ओळखही आपल्याला होऊ शकणार नाही हे घ्यानात घ्यावे.

"शहरी नक्षल" अशी संज्ञा नव्याने जन्माला आली असली तरी प्रत्यक्षामध्ये शहरामध्ये राहून हीच कर्मभूमी मानून इथेच कार्य उभारणारे नक्षली अगदी १९६०च्या नव्हे तर त्याही पेक्षा जुन्या काळापासून आढळतात. महाराष्ट्राचाच विचार करायचा तर आणिबाणी घोषित करण्यापूर्वी काही महिने आधी १९७५ मध्ये पोलिसांनी मुंबईच्या दादर येथील मध्यमवर्गीय वस्तीमधून प्राध्यापिका सुंदर नवलकर ह्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना अटक केले होते असे त्या पिढीमधील वाचकांना चांगलेच स्मरणात असेल. श्रीमती नवलकर खालसा कॉलेजमध्ये शिकवत असत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता जबानी देताना त्यांनी बरेच काही सांगितले तरी अनेक गोष्टी लपवल्याही होत्या. अगदी चौकशीच्या शेवटी शेवटी त्यांच्याकडून त्यांच्या सहकार्‍यांबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती. नवलकर बाईसाहेबांचे तत्कालीन शिष्य श्री. कोबाड गांधी - तेव्हा लंडनच्या प्रतिष्ठित स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये शिकत होते. कोबाड ह्यांच्याविषयी पोलिसांकडे जमा झालेली ही पहिली माहिती म्हणता येईल. आज कोबाड गांधींबद्दल आपण जे ऐकतो त्या नक्षली तत्वज्ञानाचे धडे त्यांनी नवलकरांकडे बसून गिरवले होते. १९७५ मध्येही हा मुलगा पुढे मोठे "कार्य" करेल ह्याबद्दल नवलकर बाईसाहेबांनी पोलिसांकडे विश्वास व्यक्त केला होता. 

महाराष्ट्राप्रमाणेच भारताच्या अन्य प्रांतामधूनही अशाच प्रकारे सुशिक्षित - बुद्धिवंत - पत्रकार - कलाकार - साहित्यिक मंडळींनी नक्षलवादी आंदोलनाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे. प. बंगाल - आंध्र - ओरिसा आणि अन्य राज्यांमध्ये हा पायंडा अनेक वर्षांपूर्वी पाडण्यात आला आहे. उदा. १९६७ च्या नक्षल चळवळीदरम्यान नक्षलबारी येथे बाहेरून आलेल्या विद्यार्थीनेत्यांनी सूत्रे हाती घेतली होती. आशिम चटर्जी बाहेरचे. संतोष राणा हा मल्लक्षत्रीय समाजातला. त्यामुळे त्याला स्थानिकांचा पाठिंबा मिळाला. देब्रामध्ये भवदेब मंडल या वकिलाने पुढाकार घेतला होता. भवदेब हा तेथील स्थानिकांचे लढे त्याआधी कित्येक वर्षे लढवत होता आणि १९६७मध्ये तो विधानसभेची निवडणूक हरलाही होता. त्याच्या जोडीला अशोक मैती हा विद्यार्थी नेता मिदनापूरमधून आला होता. कोलकतामधूनही अनेक विद्यार्थ्यांनी तेथे धाव घेतली होती. आंध्रमधील डाव्या चळवळीच्या समर्थनासाठी इथला साहित्यिकांचा वर्ग पहिल्यापासूनच उभा राहिला होता. या साहित्यिकांनी सामान्य जनतेच्या मनामध्ये डाव्या चळवळीबद्दल एक स्वप्नाळू वलय निर्मण केले होते. त्यामध्ये आपल्या श्रीश्री नावाने प्रसिद्ध असलेले श्रीरंगम श्रीनिवास आणि चेराबंधू राजू यांचा उल्लेख केला जातो. आंध्रच्या लढ्यामध्ये काही वैद्यकीय आणि अभियांत्रिकी विद्यार्थी आघाडीवर होते त्यामुळे लढ्याला बुद्धीवंतांची झाक असल्याचे चित्र उभे राहिले. पीपल्स वॉर ग्रुपचे प्रमुख कोंडपल्ली सीतारामैया ह्यांनी पीडब्ल्यूजीच्या सावलीने जन नाट्य मंडळी हा सांस्कृतिक गट स्थापन केला होता. सत्यमूर्ती हे पीडब्ल्यूजीचे दुसरे संस्थापक. सत्यमूर्ती कवी होते आणि शिवसागर या नावाने ते लिखाण करत. विप्लव रचयितला संघम उर्फ विरासम ह्या क्रांतीकारी साहित्यिकांच्या संस्थेतर्फे श्री वरवर राव यांनी सत्यमूर्तींचे साहित्य पुढे प्रकाशित केले. ह्याच श्री वरवर राव ह्यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.  

तेव्हा शहरी नक्षल ही संज्ञा आपण अलिकडे वापरू लागलो असलो तरीही त्यांचे कार्य मात्र अव्याहतपणे गेली अनेक वर्षे शहरी भागामधून चालू आहे असे दिसते. शहरी भागामधून नक्षली कशाप्रकारे संघटना बांधत असतात आणि त्याची कार्यपद्धती उद्दिष्टे काय - ह्याबद्दलची त्यांची मांडणी लेखी स्वरूपात मिळते. आणि त्याबरहुकूम ते कामही करताना दिसतात. अर्थात शहरी नक्षलींच्या कामाविषयी आपण आपल्या मनामध्ये असलेले गोंडस विचार बाजूला ठेवून वस्तुस्थिती काय हे पाहू लागलो तर त्याची भीषणता समजून येईल. 

नक्षलींच्या दृष्टीने शहरी प्रदेशाचे काय महत्व आहे ते समजून घेण्यापासून करू. २००१ साली माओवाद्यांच्या पॉलिट ब्यूरोने एक दस्तावेज प्रसिद्ध केला आहे त्याचे नाव आहे "Urban Perspective". ह्या दस्तावेजामध्ये नक्षलींनी आपली भूमिका सविस्तर मांडली असून तिची किमान तोंडओळख करून घेणे गरजेचे आहे. कारण तसे केले तरच ह्या शहरी नक्षलींच्या अटकेपर्यंत पोलिसांना का जावे लागले त्याचा मागोवा घेता येईल. ह्या दस्तावेजामध्ये काय मांडले आहे ते आता प्रथम पाहू. खाली दिलेली विधाने लेखिकेची नसून ती ह्या दस्तावेजामधून घेण्यात आली आहेत. 

अर्बन पर्स्पेक्टीव्ह ह्या दस्तावेजामध्ये असा स्पष्ट उल्लेख केला आहे की माओवाद्यांचा लढा हा ग्रामीण भागापासून सुरू होईल - तेथील प्रदेशामध्ये माओवाद्यांची सत्ता "प्रस्थापित" झाली आणि संघटनेकडे पुरेसे पाठबळ तयार झाले की मोर्चा शहरांकडे वळवला जाईल. ग्रामीण विभागापर्यंत प्रचलित शासनव्यवस्था पोचू शकत नाही आणि तिथपर्यंत पोचणार्‍या सरकारी व्यवस्थेचे दूत - कलेक्टर मामलेदार पोलिस आदि - भ्रष्ट असल्यामुळे त्रस्त जनतेला आपल्या मागे ओढणे सोपे आहे आणि ह्या आपल्या कामामध्ये सरकारकडून अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. म्हणून ग्रामीण विभागावरती वचक बसवून तिथे कम्यून पद्धतीने गावातील कामांची फेररचना करणे आणि तेथील सर्व करसंपत्ती स्वतःच्या खिशात घालणे ही माओवाद्यांची कार्यपद्धती आहे. शहरामध्ये संघटनेचे काम उभारण्यासारखी परिस्थिती जरूर उपलब्ध आहे कारण खेड्यांकडून स्थलांतरित झालेल्या मजूरांच्या शोषणावरती तेथील आर्थिक चक्र चालवले जाते. परंतु इथेच शासनव्यवस्था अतिशय प्रबळ असल्यामुळे कोणतेही बंड पाशवी बलाचा वापर करून चिरडण्याची क्षमता सरकारकडे असते व ती वापरली जाते. म्हणून शहरांमध्ये प्रबळ संघटन बांधण्याचे काम माओवादी क्रांतीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये करतील असे दस्तावेजामध्ये म्हटले आहे.

असे असले तरीही माओवाद्यांतर्फे अत्यंत महत्वपूर्ण अशी अनेक कामे शहरी तुकड्यांवरती सोपवण्यात येत असतात. ह्याबाबतीत एक स्पष्ट नियम सांगण्यात आला आहे. माओवाद्यांनी आपल्या कामाचे दोन स्वतंत्र भाग केलेले आहेत. माओवाद्यांचा एक गट लोकाभिमुख राहून त्यांच्यामध्ये मिसळून त्यांच्यासाठी स्थानिक प्रश्नांवर आधारित लढे उभारत असतो तर दुसरा गट भूमिगत राहून कोणत्याही प्रकारची प्रसिद्धी टाळून बेकायदेशीर अथवा कायद्याच्या चौकटीमध्ये न बसणारी "छुपी" कामे करत असतो. ह्या दोन्ही गटामधले कार्यकर्ते आपापल्या क्षेत्राच्या काटेकोर मर्यादांमध्ये राहून काम करत असतात. उदा. ऑगस्ट २०१८ मध्ये ज्या पाच शहरी नक्षलींना पोलिसांनी ताब्यामध्ये घेतले आहे ते असे संघटनेची "कायद्याच्या चौकटीमध्ये" बसणारी कामे करतात असा समज आहे. सबब त्यांनी कोणताही कायदा मोडला नसूनही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे माध्यमांमधून त्यांच्या छुप्या हितचिंतकांची रड चालू असलेली दिसते. म्हणजेच कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनही माओवाद्यांचे काम प्रभावीपणे करता येते ह्याची कबूली ही मंडळी देत आहेत. अर्थात वरील मंडळींनी आपली सर्व कामे कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच केली आहेत असे आग्रहाने ते प्रतिपादन करत असले तरी त्यामध्ये अनेक विसंगती असतातच. उदा. कोबाड गांधी ह्यांची केस तुम्हाला आठवत असेल. जिथे साधा प्रवेश मिळवणेही अशक्यप्राय धरले जाते त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ह्या प्रतिष्ठित परदेशी संस्थेमधून पदवी घेतलेले कोबाड गांधी प्रत्यक्षात दिल्ली शहरामध्ये एका खोट्या नावाने वावरत होते आणि त्यासाठी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. (https://indiankanoon.org/doc/169474309/) इतका शिकला सवरलेला माणूस पण त्याला खोट्या नावाने वावरावे लागत होते हे गूढ नाही का? असे खोटे नाव परिधान करून ते नेमके कोणते "काम" करत होते हे यूपीए राज्यातील पोलिस बहुधा सिद्ध करू शकले नसावेत.

माओवाद्यांचा सशस्त्र लढा प्रथमच्या टप्प्यामध्ये ग्रामीण विभागामध्ये लढायचा असला आणि त्याचे मूळ काम पीपल्स लिबरेशन आर्मीवरती सोपवण्यात आलेले असले तरीही ह्या आर्मीचे काम सुरळीत चालावे म्हणून इतर अन्य कामे असतात. अगदी भारतीय सैन्यामध्येही सैनिकांना लागणार्‍या शिधा - गणवेषापासून ते हत्यारे खरेदीपर्यंत अनंत कामे असतात आणि ती करणारे कर्मचारीदेखील अंतीमतः सैन्याचेच काम करत असतात. तेव्हा हाती बंदूक घेऊन लढले म्हणजे जसा भारतीय सैन्यातील माणूस असे म्हणता येत नाही तसेच माओवाद्यांच्या सैन्यासाठी लागणारे अनेक कामे करणारी दले असतात. माओवाद्यांचे बालेकिल्ले ज्या दुर्गम पर्वतराजीमध्ये आहेत - ग्रामीण भागामध्ये आहेत तिथे कारखानदारी नाही - तिथे मुळात वीज सुद्धा नाही हे आपल्याला माहिती आहे. मग माओवाद्यांच्या सैन्याला लागणार्‍या वस्तूंचे उत्पादन अर्थातच शहरामध्ये होत असते आणि माओवाद्यांनाही त्या तिथूनच विकत घ्याव्या लागतात. माओवादी आपली काही हत्यारे स्वतःच बनवतात. त्यासाठी लागणारे सुटे भाग शहरामधून बनवून घ्यावे लागतात. हे काम सोळभोकपणे केले जात असते. श्री. अमर भूषण - "रॉ"चे माजी स्पेशल सेक्रेटरी म्हणतात की "हत्यारे - शस्त्रास्त्रे मिळवणे हे सोपे काम नाही. अनेकदा माओवादी पोलिसांचीच शस्त्रास्त्रे लुटून नेतात हे खरे असले तरी परदेशामधून शस्त्रास्त्रे मिळवण्याचे राजमार्ग तयार झाले आहेत. ही सामग्री ग्रामीण माओवाद्यांपर्यंत पोचवण्याचे महत्वाचे काम शहरी माओवादी करतात."

ज्या ग्रामीण विभागावरती ते आपली पकड निर्माण करतात तेथील "प्रशासनासाठी" देखील त्यांना अनेक गोष्टींची गरज असते आणि त्याही शहरातून मिळवल्या जातात. शहरांचा एक मोठा उपयोग म्हणजे इथून पूर्णवेळ कामासाठी कार्यकर्ते मिळवणे. हे काम प्रभावीपणे केले जाते. मग हेच कार्यकर्ते ग्रामीण विभागाकडे वळवले जातात. एका ठिकाणच्या "वस्तू" दुसर्‍या विभागामध्ये नेण्यासाठी अनेकदा शहरांमधून प्रवास करावा लागतो. अशा वेळी कार्यकर्त्यांची शहरामध्ये राहण्याची व्यवस्था असावी लागते. त्यासाठी Safe House ची सोय करावी लागते. कारण ही जोखीम घेणारे कार्यकर्ते पोलिसांच्या हाती लागणार नाहीत हे बघावे लागते. हे महत्वाचे काम शहरी माओवादी करत असतात.

शहरांमध्ये माओवाद्यांना एका महत्वाच्या बाबीमध्ये रस असतो. देशासाठी जे अत्यावश्यक सामग्री बनवणारे कारखाने असतात त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करून ते बंद पाडण्याची रणनीती असते. ह्याचे अगदी ताजे उदाहरण द्यायचे तर तामिळनाडूमधील स्टरलाईट कंपनीकडे बोट दाखवता येईल. देशासाठी आवश्यक तांबे बनवणारी ही कंपनी बंद पाडल्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत आणि अतिशय महत्वाचे परकीय चलन वापरून ते आयात करणे हाच एक पर्याय उरला आहे. साहजिकच देशाच्या हितावरती आघात करणारी ही कार्यपद्धती राबवण्यासाठी पर्यावरणापासून ते मानवाधिकारापर्यंत कोणतीही ढाल पुढे केली जाते हा आपला अनुभव आहे. ही कामे अर्थातच शहरी माओवादी करू शकतात. परदेशामधून येणारी आर्थिक मदत वापरून त्याच्या मदतीने देश पेटता ठेवण्याचे काम आणि त्याचे विघटन सोपे करण्याचे काम शहरी माओवादी करतात.

डॉ. सय्यद गुलाम नबी फई हे नाव तुम्ही विसरून गेला असाल याची मला खात्री आहे. जुलै २०११ मध्ये अमेरिकन सरकारने फई यांना अटक केली. फई हे अमेरिकन नागरिक असूनही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयकडून पैसा घेउन अमेरिकेमध्ये काश्मिरच्या विघटनासाठी एक संस्था चालवत. जन्माने काश्मिरी (बडगाम) असलेल्या फई यांना आयएसआयतर्फे लाखो डॉलर्स मिळाले होते. त्यातले ३५ लाख डॉलर्स त्यांनी  हिशेबामध्ये दाखवले नाहीत. कोणत्याही अमेरिकन नागरिकाला असे पैसे मिळत असतील तर त्याने स्वतःचे नाव परकीय एजंट म्हणून नोंदवणे अमेरिकन कायद्याने अनिवार्य आहे. फई यांनी तसे काहीच केले नव्हते. अमेरिकन राजकीय वर्तुळामध्ये पाक सरकारची भूमिका मांडण्याचे काम फई करत असत. त्यांनी काही राजकीय नेत्यांना निवडणुकीदरम्यान देणग्याही दिल्या होत्या असे आढळून आले आहे. त्यामध्ये खुद्द ओबामा यांचेही नाव असल्याचे म्हटले जाते. फई यांनी कोणाच्या संपर्कात राहावे, समारंभांना कोणाला निमंत्रण द्यावे, कोणाशी दोस्ती करावी याचे मार्गदर्शन त्यांना त्यांचा आयएसआयमधील सूत्रधार जावेद अझीझ खान (उर्फ ब्रिगेडीयर अब्दुल्ला खान) तसेच अन्य अधिकारी सांगत असत. फई यांना अटक झाल्यानंतर अमेरिकन कोर्टाला जगभरच्या ५३ "उदारमतवादी" (?) बुद्धिवंतांनी एक निवेदन देउन त्यांची बाइज्जत सुटका करावी असे आवाहन करण्यात आले होते. या ५३ जणांमध्ये अर्थातच काही भारतीय देखील होते. आयएसआयच्या या एजंटाच्या सुटकेची काळजी करणारे हे बुद्धिवंत तुमच्या परिचयाचे आहेत. फई यांचा पाहुणचार स्वीकारलेले आणि त्यांच्या संपर्कातील बुद्धिवंतांची नावे मानवाधिकारवादी कार्यकर्ते गौतम नवलखा, जस्टीस राजिंदर सच्चर, दिलीप पाडगावकर, कुलदीप नय्यर, प्रफुल्ल बिडवई,  राजमोहन गांधी यांची असल्याचे सांगितले जाते. यातील काही जण फई यांनी आयोजित केलेल्या काही समारोहामध्ये हजर होते आणि खास करून गौतम नवलखा यांची फई यांनी एका पाकिस्तानी जनरलशी ओळख करून दिली होती अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. वरील उदारमतवादी बुद्धिवंत अनेकदा टीव्ही वाहिन्यांवर कशाप्रकारची भूमिका मांडत असतात हे आपल्याला नवे नाही. ह्यामधील काही मंडळी देशातील माओवाद्यांचेही समर्थन उघडपणे करत असतात. त्यातील ठळक नाव म्हणजे गौतम नवलखा हे आहे. 

जानेवारी २०१० मध्ये ८३ वर्षीय ज्येष्ठ स्वीडिश कम्युनिस्ट लेखक जॅन मर्डल यांच्यासमवेत गौतम नवलखा दंडकारण्यच्या घनदाट जंगलामध्ये सुरक्षादलांची नजर चुकवून वरिष्ठ माओवादी नेते आणि पक्षाचे जनरल सेक्रेटरी गणपथी यांना भेटले. याच दरम्यान सुप्रसिद्ध विचारवंत आणि बुकर पारितोषिक विजेत्या अरुंधती रॉयदेखील या दोघांसमवेत दंडकारण्यामध्ये राहिल्या. या भेटीचा सविस्तर वृत्तांत तिघांनीही आपापल्या पुस्तकामधून लिहिला आहे. नवलखा यांनी "डे अंड नाईटस् इन हार्टलॅंड ऑफ रिबेलियन - इन माओइस्ट लॅंड" या शीर्षकाखाली पुस्तक लिहिले तर अरुंधती रॉय यांनी "वॉकींग विथ द कॉम्रेडस्" हे पुस्तक लिहिले. मर्डल यांनी या भेटीच्या निमित्ताने "रेड स्टार ओव्हर इंडिया" असे एक पुस्तक लिहिले आहे. (भेट संपवून आम्ही परत निघालो तेव्हा माओवाद्यांनी आम्हाला अनेक कागदपत्रे एका चिपवर टाकून दिली होती असे मर्डल म्हणतात. पकडले गेलोच तर ती चिप सहज गिळून टाकण्याइतकी इवलीशी होती असेही त्यांनी म्हटले आहे. हा एक उल्लेख महत्वाचा असून एक तर पोलिसांची नजर चुकवून देशाबाहेर पाठवण्यासाठी अशी काय कागदपत्रे माओवाद्यांनी मर्डल यांच्याकडे दिली हा एक प्रश्न आणि दुसरे म्हणजे सहज गिळून टाकता येइल अशा चिपवरती कागदपत्रे टाकून देण्याची व्यवस्था माओवाद्यांकडे दंडकारण्याच्या त्या दुर्गम प्रदेशामध्येही आहे ह्याची नोंद घेतली पाहिजे. ह्यातील पक्षाची घटना व अशीच काही कागदपत्रे आपण आपल्या संकेतस्थळावर दिली असल्याचे मर्डल यांनी पुस्तकात नमूद केले आहे. मर्डल यांचा व्हिसा आता भारत सरकारने रद्द केला असून त्यांच्या भविष्यातील भारतभेटीवर बंदी घालण्यात आली आहे.)

गौतम नवलखा हे इकॉनॉमिक ऍंड पोलिटिकल वीकली (इपीडब्ल्यू) या सुप्रसिद्ध कम्युनिस्ट विचारधारेच्या नियतकालिकाचे सल्लागार संपादक म्हणून काम करत असत. काश्मिरच्या "स्वातंत्र्यलढ्या"चे ते खंदे समर्थक म्हणून वावरतात. नवलखा यांचे "उदारमतवादी" विचार प्रसिद्ध असून भारतीय सार्वभौमत्वाला आव्हान देणारी त्यांची भूमिका सतत विवादास्पद ठरली आहे. फई यांच्या अटकेच्या निमित्ताने त्यांचे पाकशी असलेले संबंध आता उजेडात आले आहेत. माओवाद्यांच्या सशस्त्र लढ्याचे उदात्तीकरण करणार्‍यांमध्ये ते अग्रेसर असतात. नवलखा यांच्याबद्दल सरकारकडे पुरेशी माहिती नाही असे मानणे मूर्खपणा ठरेल. मर्डल यांची दंडकारण्य भेट नवलखा यांनी आयोजित केली असा आरोप आहे - मर्डल यांना भारतभेटीवर बंदी घालण्यात आली आहे. नवलखा यांच्यावर मात्र कोणतेही बंधन नाही हे नमूद करणे अगत्याचे आहे. 

आपली मती कुंठित करणारे - दिशाभूल करणारे युक्तीवाद करणारे - एका बाजूला मानवाधिकाराची बोंब मारणारे आणि दुसर्‍या बाजूला हिंसेचे समर्थन करणारे हे बुद्धीवंत विचारवंत स्वयंसेवी संस्थाचालक आदि मंडळी आपले धैर्य खच्ची करण्याचे काम अगदी हळूहळू दिल्या जाणार्‍या विषासारखे करतात. चुकीच्या मार्गाने जाणार्‍या आपल्याच बांधवांवर कडक कारवाई करण्याची आपली राजकीय इच्छाशक्ती संपवतात. म्हणून प्रत्यक्ष माओवाद्यांपेक्षाही ते अधिक धोकादायक आहेत. त्यांच्या फसव्या रूपाने युक्तीवादाने भलत्याच गोष्टींना प्राधान्य देण्याची चूक न करण्याची खबरदारी घेणे आपल्याच हातात आहे. भारतीय समाजासमोर उदारमतवादी म्हणून वावरणार्‍या विद्वानांबद्दलचा हा आपला अनुभव आहे. इथले उदारमतवादी म्हणून वावरणारे माओवाद्यांचे समर्थन करतात. पण उदारमतवाद्यांविषयी खुद्द माओचे विचार काय होते ते वर उद्ढृत केले आहे. आपल्या म्हणण्याला स्वतः माओच दुजोरा देत नाहीत का?

1 comment:

  1. या शहरी नक्षलवाद्यांची एक चाल आहे की सर्व वसतीगृह असलेल्या विद्यापिठांत विद्यार्थ्यांना आपले सभासद करायचे. त्याचे भाडे स्वस्त असते आणि तेथे जेवण व इतर खाणे बाहेरपेक्षा माफक दरात असते. त्यामूळे JNU, IIT, FTTI इ. संस्थेत त्यांचे जाळे आहेत. प्रफुल्ल बिडवाई माझ्या बरोबरच्या काळात IIT मुंबईत शिकत होता. त्याच्या इतर सहाध्यायांची नावे मला माहित आहेत.

    ReplyDelete