Monday 19 November 2018

पहिले महायुद्ध आणि नंतरचे शतक

Changes to Europe after World War I


११ नोव्हेंबर १९१८ रोजी पहिले महायुद्ध संपले त्या घटनेला यावर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. एक शतकाच्या अवधीनंतरही त्या घटनेची पाळेमुळे आजच्या जीवनातही घट्ट रोवून उभी आहेत असे आपल्याला दिसते. त्याची मुळे किती खोलवर गेली आहेत आणि गेल्या शंभर वर्षांमध्ये आपले जीवन कसकसे बदलत गेले ह्याचा हा लेख म्हणजे एक धावता आढावा आहे.

ऑस्ट्रोहंगेरियन साम्राज्याचा भावी सम्राट आर्च ड्यूक फर्डिनांड २८ जून रोजी आजच्या बोस्नियन राजधानी सारायेवो शहरामध्ये गेला असता पत्नी सोफीसकट त्याचा खून करण्यात आला. उत्तर म्हणून बलाढ्य ऑस्ट्रोहंगेरियन साम्राज्याने बाल्कन राष्ट्रांना धडा शिकवण्यासाठी युद्ध छेडले.  युरोपातील सत्तासंघर्ष पेटला तसतसे जर्मनी रशिया फ्रान्स ब्रिटन इटाली तुर्कस्तान आदि अनेक देश ह्या युद्धामध्ये ओढले गेले. युद्धाची व्याप्ती अरेबिया आणि आफ्रिकेपर्यंत वाढत गेली. अमेरिकन व्यापारी कंपन्या युद्धसामग्री दोन्ही बाजूच्या देशांना विकत होत्या. जर्मनीने मेक्सिकोला युद्धात पाचारण केले आणि तुमची गेलेली जमीन आम्ही परत देऊ असे आश्वासन देणारा "झिमरमन टेलेग्राफ" पाठवला. तो ब्रिटनच्या व्यवस्थेने टिपला आणि त्यातील मजकूर जाहीर केला. ह्यानंतर अमेरिकेतील लोकमत जर्मनीच्या विरोधात गेल्याने अध्यक्ष वुडरो विल्सन ह्यांना निर्णय घेणे भाग पडले. अखेर १९१७ मध्ये युद्धामध्ये अमेरिका ओढली गेली. जमिनीवर - आकाशात आणि महासागरावरती युद्ध लढले गेले.  पन्नास लाखांहून माणसे मारली गेली - सत्तर लाख जखमी झाले तर आणखी साठ लाख लोकांना अपंगावस्थेत जीवन जगावे लागले. वित्तहानी तर बघायलाच नको. ब्रिटिश साम्राज्याचा एक भाग म्हणून भारतीय सैनिक युद्धामध्ये सामिल झाले होते. जर्मनीच्या ताब्यातील पूर्व आफ्रिका - इजिप्त - मेसोपोटेमिया - तुर्कस्तान आदि देशांमध्ये गेलेल्या सुमारे एक लाख सैनिकांनी आपले बलिदान दिले - भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम गाजवला. भारतीय सैन्य सोबत नसते तर ब्रिटिशांना युद्धामध्ये विजय प्राप्त करणे अशक्य होते. अमेरिकेच्या पदार्पणामुळे युद्धामध्ये ब्रिटनची सरशी झाली आणि जर्मनी हरला - त्याच्यावरती अनेक कडक आणि "अपमानास्पद" निर्बंध लावण्यात आले. युद्ध सुरू झाले तेव्हा अस्तित्वात असलेली जर्मनी -ऑस्ट्रोहंगेरियन - ऑटोमन आणि रशियन झार अशी चार साम्राज्ये लयाला गेली. चार राजघराणी संपुष्टात आली. युरोपातील देश बेचिराख झाले. नवे देश जन्माला आले. काहींना हरवलेले स्वातंत्र्य पुनश्च मिळाले. युनोचे आद्यरूप लीग ऑफ नेशन्स अस्तित्वात आले. झारशाहीचा अंत जवळ आला असतानाच जगामध्ये पहिल्यांदाच कम्युनिस्ट राज्यक्रांती होऊन १९१७ साली रशियामध्ये कम्युनिस्टांची राजवट आली. ब्रिटिशांनी जाहीर केलेल्या बालफर डिक्लेरेशननुसार ज्यूंना पॅलेस्टाईनमध्ये मायदेश मिळाला. मध्यपूर्वेचा चेहरामोहरा बदलला. ऑटोमन साम्राज्याविरुद्ध काम करणार्‍या बंडखोरांनी ब्रिटिशांची मदत मागितली होती. आता त्यांच्या सहकार्याने पाश्चात्यांनी बसून मध्यपूर्वेमध्ये कोणते देश असावेत हे नकाशावर ठरवले.

पहिल्या महायुद्धाने जन्माला घातलेले युरोपातील देश - झारच्या साम्राज्यामधून तोडून काढलेले देश - ऑटोमन साम्राज्याचा प्रभाव असलेले सर्बिया बोस्निया हर्जेगोविना अल्बेनिया क्रोएशिया आदि देश - रशियन बोल्शेविक राज्यक्रांती - ज्यूंना स्वतंत्र भूमी - जगामध्ये शांतता नांदावी म्हणून जन्माला आलेली लीग ऑफ नेशन्स - एक ना दोन. हे मोठे घटक आजही आपल्या जीवनामध्ये ठळक प्रभाव टाकत आहेत. त्या महायुद्धाने केलेल्या जखमा काही ठिकाणी अजूनही भरून निघालेल्या नाहीत. अनेक ठिकाणचे सशस्त्र संघर्ष वा नवी युद्धे ह्याच जखमांमधून परत परत डोके वर काढत आहेत. पहिल्या महायुद्धाचे आर्थिक परिणाम गंभीर होते. जर्मनी ऑस्ट्रिया रशिया ऑटॊमन साम्राज्य आणि फ्रान्स ह्याची जीडीपी ३० ते ४०% पर्यंत उतरली. युद्ध सुरू असेपर्यंत ब्रिटन आपला कोळसा तर अमेरिका युद्धसामग्री तसेच जगाच्या एकूण तेल उत्पादनापैकी ७५% हिस्सा विकत होती. साहजिकच युद्ध सुरू होते तोवर त्यांची अर्थव्यवस्था ठीक होती. युद्ध संपल्यावर परिस्थिती बदलू लागली. युद्धासाठी युरोपने अमेरिकेकडून कर्ज घेतले होते. आता ते परत करणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात येत होते. युद्धाचा बराचसा खर्च ब्रिटनच्या डोक्यावर बसला होता. त्याला अमेरिकेकडून ४०० कोटी डॉलर्सचे कर्ज घ्यावे लागले. महायुद्ध लढण्याची रशियाची खरे तर ताकद नव्हती. रशियाची परिस्थिती आणखीनच ढासळत गेली. १९१७ सालच्या रशियन क्रांतीनंतर तिथे परिस्थिती डळमळीत होती. म्हणजे खरे तर तिथे नागरी युद्धाची अवस्था होती. त्यात १९२१ मध्ये तिथे दुष्काळ पडला. कम्युनिस्ट विचारसरणीनुसार सरकारने सर्व खाजगी उद्योग व्यवसाय खाजगी संपत्ती ह्यांचे राष्ट्रीयीकरण केले. युद्ध संपल्यानंतर अमेरिकन कारखान्यांमध्ये तयार माल पडून राहिला - त्याला उठाव नव्हता. कंपन्यांचा पैसा त्यामध्ये अडकला. अशातूनच हळूहळू मंदीला सुरूवात झाली. १९२८ पासून अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशनचे युग सुरू झाले. मालाला उठाव नाही म्हणून कामगार वर्ग काढून टाकण्यात आला. नोकर्‍या गेल्यामुळे हातात पैसा नाही अशा अवस्थेमध्ये गरज असूनही लोकांची क्रयशक्तीच कमी झाल्याने पुन्हा विक्री थांबली. कारखाने बंद पडू लागले. जवळ जवळ एक कोटीहून अधिक अमेरिकन नागरिक बेरोजगार होते. अशा एका दुष्टचक्रामध्ये अर्थव्यवस्था अडकली. शेयर बाजार कोसळला. मध्यमवर्गीय समाजाचे नुकसान झाले. एकीकडे रशिया कम्युनिस्ट मार्गक्रमणा करतो म्हणून नाके मुरडणार्‍या अमेरिकेवरती सुद्धा तशाच काहीशा मार्गाने जाण्याची पाळी आली. सर्वस्वी खाजगी व्यवसायावरती अवलंबून न राहता सरकारला काही कामे स्वतःवरती ओढवून घ्यावी लागली. ह्याच काळामध्ये लोकांना रोजगार पुरवण्यासाठी अमेरिकेमध्ये रस्तेबांधणी - धरणे - गावागावामध्ये वैद्यकीय - शैक्षणिक आदि सुविधा उपलब्ध करून देणे आदि कामे सरकारने अंगिकारली. ह्यातून निदान पोटापुरता पैसा काही लोकांच्या हाती पडण्याची सोय झाली. तुटपुंज्या उत्पन्नावरती गुजराण करणार्‍या कुटुंबांच्या त्या काळामधल्या कथा अमेरिकेत आजही जागोजागी ऐकायला मिळतात. अशा परिस्थितीमध्ये हमखास हाती पगार मिळण्याची सोय म्हणजे सरकारी नोकरीच होती. पण सैनिकांना सुद्धा प्रचंड पगार नव्हते. महिन्याच्या खर्चाचे पैसे वेगळे काढून झाल्यावरती हातामध्ये शिल्लक उरेल की नाही ह्याची धाकधुक असे. ग्रेट डिप्रेशन - मंदीच्या काळामध्ये बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती चलन ओतण्याची गरज होती. पण त्यावेळपर्यंत अमेरिकेच्या चलनाची किंमत सोन्याशी जोडलेली होती. म्हणजेच अमुक एव्हढे चलन बाजारात ओतायचे तर त्याप्रमाणामध्ये तिजोरीमध्ये सोने असले पाहिजे असे बंधन होते. असे बंधन अनेक देशांनीही स्वीकारलेले होते. १९३३ मध्ये हे नाते तोडण्यात आले. म्हणजेच जवळ सोन्याचा साठा नसला तरीही नवे चलन छापण्याची सोय करण्यात आली. या निर्णयानंतर कोणत्याही अमेरिकन नागरिकाला आपले चलन अधिकृतरीत्या सोन्यामध्ये रूपांतरित करून घेण्याची सोय संपुष्टात आली. पण सरकार मात्र अन्य देशांना पैसा देताना सोने व चलन असे नाते ठेवू शकत होते कारण तसे केल्याने डॉलरची किंमत बाजारामध्ये कोसळणार नाही याची काळजी घेता येत होती. (त्या काळामध्ये साधारणपणे २०-२१ डॉलर्स देऊन एक औन्स सोने बाजारात मिळत होते. आज पुनश्च चलनाची किंमत सोन्याशी जोडायची झाली तर ही किंमत १०००० डॉलरही होऊ शकेल असे तज्ञ म्हणतात. १९७१ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या बदल्यात सोने असा व्यवहार चालू राहणार नाही अशी घोषणा अमेरिकेने केली आणि डॉलर व सोने ह्यांच्यामधले नाते कायमचे संपले.) तरी अमेरिकेची परिस्थिती अन्य देशांपेक्षा खूपच चांगली होती. किंबहुना जगातील एक नंबरचे स्थान अमेरिकेने तेव्हापासून आजपर्यंत हातचे जाऊ दिलेले नाही हे विशेष. (जगावरती अमेरिकेचे वर्चस्व टिकवणारा हा निर्णय होता.)

तिकडे जर्मनीमध्ये पहिल्या महायुद्धाच्या तहप्रसंगी घातलेल्या अटींमुळे अपमानित झालेली जनता हिटलरसारख्या खमक्या नेत्याच्या मागे उभी राहिली. अपमानाचा वचपा काढण्याच्या हेतूने पछाडलेल्या हिटलरने सर्वात प्रथम हाती घेतले ते शस्त्रास्त्र निर्मितीचे काम. हे काम लपून छपून करावे लागे. कारण जर्मनीवरती बंधने घालण्यात आली होती. कारखान्यामधले बेल्ट असे बनवण्यात आले की त्यांच्यावरती विविध उत्पादन निघते असे दाखवता यावे. इन्स्पेक्टर आले की समजा साध्या गाड्या बनवल्या जातात असे नाटक उभे करायचे - ते जाताच तिथेच लश्करी सामग्रीचे उत्पादन सुरू करायचे असा मामला होता. अपमानित जनताही आपल्या राज्यकर्त्याच्या मागे उभी होती म्हणून हे होऊ शकले. दोस्त राष्ट्रांच्या नकळत युद्धाची तयारी पूर्ण करण्यात हिटलरला यश आले. पुढच्या अवघ्या वीस वर्षात जगाला त्याने पुन्हा एकदा महायुद्धाच्या खाईमध्ये नेऊन सोडले. हिटलर महायुद्धाच्या दिशेने प्रयत्न करत आहे असे इंग्लंडमध्ये चर्चिल वारंवार सांगत होता परंतु चेंबरलेनचा मात्र त्यावर विश्वास नव्हता. अखेर युद्धाला तोंड फुटले तेव्हा डोळे उघडले. एकच धावपळ उडाली. ब्रिटनच्या हाती अजूनही जगाचे साम्राज्य होते. तिथल्या साधन संपतीच्या जोरावरती युद्ध लढण्याची त्याची खुमखुमी तशीच होती. दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि अमेरिकेला अच्छे दिन आले म्हणायचे. तेथील मंदी संपली. संरक्षण विषयक सामग्रीचे उत्पादन वाढले आणि कारखान्यांना उर्जितावस्था आली. 

हिटलर आणि त्याचे साथीदार फॅसिस्ट देश वि. लोकशाही मानणारे देश आणि जोडीला कम्युनिस्ट रशिया अशी फळी दुसर्‍या टप्प्यात युद्धात लढत होती. पराकोटीचा ज्यू द्वेष आणि त्यापायी करण्यात आलेला त्यांचा अनन्वित छळ आणि छळछावण्यांमध्ये केले गेलेले शिरकाण ह्या गोष्टी हिटलरला टाळता आल्या असत्या तर दोस्त राष्ट्रांना नैतिकतेचा बुरखा कधी चढवता आला नसता. पण ह्या झाल्या जर तरच्या गोष्टी. फॅसिस्ट देशांनी केलेल्या अत्याचारांमुळे युद्धाला तत्वनिष्ठेचे स्वरूप आले. हिटलरचा पाडाव म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जयजयकार - लोकशाहीचा जयजयकार असे समीकरण मांडता आले. मानवी स्वातंत्र्याचे रक्षणकर्ते म्हणून उच्च नैतिक स्थान प्राप्त झाल्याच्या रुबाबामध्ये पुढची अनेक दशके पाश्चात्य देश वावरत होते. इतिहास जेतेच लिहितात तेव्हा स्वतःचे अस्तित्व पणाला लावून युद्ध लढलेल्या देशांनी आपल्या कर्तृत्वासाठी स्वतःची पाठ थोपटून घेतली. जेत्यांची संस्कृतीही श्रेष्ठ ठरली. जगामध्ये जर्मनीची छिथू झाली. हिटलरच्या अत्याचारांना आपण थांबवू शकलो नाही ह्याचा ठपका समस्त जर्मनांवरती आला. ही खंत ते अजूनही विसरू शकलेले नाहीत.  आणि जेतेपणाच्या उन्मादात जपानवर एकदा नव्हे तर दोनदा अणुबॉम्ब टाकणार्‍या अमेरिकेला मात्र आपण केलेल्या कृत्याची खंत असल्याचे आजवर जाणवलेले नाही. अणुबॉम्ब टाकून जपानला शरणागती पत्करायला लावल्यानंतर जपानने आपला देश तळ म्हणून वापरायला द्यावा व त्याबदल्यात जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारली. 

दुसर्‍या महायुद्धाच्या अंती जगावरती राज्य करणार्‍या ब्रिटिशांची सत्ता कित्येक देशातून संपुष्टात आली. जगाचे नायकत्व अमेरिकेकडे झुकले. दुसरा ध्रुव अस्तित्वात आला तो रशियाचा. रशियाच्या आधिपत्याखाली असलेले पूर्व युरोपातील देश - चीन ह्यांनी कम्युनिस्ट विचारसरणी स्वीकारली होती. युद्धाच्या अंतीम टप्प्यामध्ये ज्या गतीने रशियाने युरोपाचा भाग गिळंकृत केला त्याने अस्वस्थ झालेल्या पश्चिम युरोपातील देशांना अमेरिकन गटामध्ये जाणे क्रमप्राप्त ठरले. त्यांच्या संरक्षणासाठी जो करार अस्तित्वात आला तो म्हणजेच नेटो. त्याविरोधात रशियाप्रणित देश वॉर्सा कराराने बांधले गेले. ह्या दोन गटांव्यतिरिक्त जे देश नेटो वा वॉर्सा कोणत्याच करारामध्ये सामील नव्हते त्यांना अलिप्त राष्ट्र म्हणण्याची पद्धत सुरू झाली. अलिप्त किंवा तिसर्‍या जगातील देशांनी स्वतःचे वेगळे व्यासपीठ तयार केले. तरीही हे देश मूलतः रशियाकडे झुकलेले होते. 

युद्धमय परिस्थितीने सामाजिक जीवनावरही खोलवर परिणाम घडले होते. उदा. घराघरामधले पुरूष युद्धभूमीकडे गेल्यामुळे स्त्रियांना नोकरी करण्यासाठी बाहेर पडावे लागले. हा एक मोठा सामाजिक बदल होता. अर्थार्जनाच्या निमित्ताने घराबाहेरचे जग आणि जबाबदार्‍या सांभाळणार्‍या सर्वसामान्य स्त्रिया आपापल्या अधिकारांबद्दल जागरूक होत गेल्या. अगदी मतदानाचा हक्कासाठीही याच काळामध्ये स्त्रिया विशेषाधिकाराच्या मागण्या करू लागल्या. अर्थाजन करणारी स्वयंपूर्ण स्त्रीचे रूप युरोपात आणि अमेरिकेत दिसू लागले. अनेक क्षेत्रांमध्ये सर्वसामान्य स्त्रियाही काम करू लागल्या. ह्याच काळामध्ये अमेरिकेमध्ये गोरे वि. काळे असा वर्णसंघर्षही चालू होता. बदलत्या काळानुसार अनेक गोर्‍यांनीही कृष्णवर्णियांवर अन्याय झाल्याचे मान्य करत त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज मान्य केली. ह्या काळानंतर अमेरिकेमध्ये आणि युरोपात "लिबरॅलिझम"चे फॅड सुरू झाले. तेथील शिक्षणाचे रूप बदलण्यात आले. वर्ण जात जमात पंथ धर्म भाषा लिंग ह्यातील भेदाभेद न मानता एक नवी समाजरचना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. लिबरल सेक्यूलर शिक्षणाचा पाया रचला गेला. ह्याचीच परिणती पुढच्या काळामध्ये ख्रिश्चॅनिटीचा प्रभाव पुसून टाकण्यात झाली. नोंद घ्यायची ती ही की ह्याच काळामध्ये आपल्या संकुचित राजकारणासाठी आणि नैमित्तिक विजयासाठी हेच पाश्चात्य कट्टरपंथी इस्लामला जवळ करत होते. म्हणजे एकीकडे त्यांच्या भूमीमध्ये लिबरॅलिझम स्वीकारल्यामुळे जनतेचा ख्रिश्चॅनिटीवरील विश्वास उडत होता तर दुसरीकडे जगातील मुस्लिम प्रजा मात्र अधिकाधिक धर्मभोळी बनवण्यात येत होती. युरोपात स्वस्त कामगार म्हणून घुसलेल्या मुस्लिम स्थलांतरितांना आपल्यामध्ये सामावून घेण्याच्या मजबुरीपायी लिबरॅलिझमच्या नावाखाली मूळच्या ख्रिश्चन प्रजेची मानसिक तयारी करून घेण्यात आली. त्यासाठी युरोपियन नागरिकांवर दबाव टाकला गेला आणि त्यांना देण्यात आलेल्या अगदी प्राथमिक पातळीपासून ते पदवीपर्यंतच्या शिक्षणामधून लिबरॅलिझमची तत्वे सांगत मल्टीकल्चरॅलिझमसाठी ही प्रजा तयार झाली.   दुसर्‍या महायुद्धानंतर फ्रान्सचे प्रमुख द गॉल ह्यांनी तर युरेबियाचे स्वप्न पाहिले होते ज्याकरवी अमेरिकेला शह देण्यासाठी म्हणून युरोप व अरेबियाने एकत्र येण्याची कल्पना मांडली गेली होती. अशा कारवायांमधूनच कधी नव्हे तेवढे इस्लामसाठी युरोपात "तत्वाधिष्ठित" मोकळे रान ह्याच विचारसरणीतून उपलब्ध झाले. 

दुसर्‍या महायुद्धानंतर सर्व देशांच्या पुढाकाराने काही जागतिक व्यवस्था अस्तित्वात आल्या. विविध राष्ट्रांच्या सहचर्यासाठी लीग ऑफ नेशन्स जाऊन युनोची स्थापना झाली. जुन्या परमनंट कोर्ट ऑफ जस्टिसच्या जागी हेग शहरामध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसची स्थापना झाली. हिटलरने केलेल्या ज्यूंच्या वंशविच्छेदाच्या गुन्ह्याला शिक्षा मिळालीच पाहिजे म्हणून जर्मनीच्या न्यूरेंबर्ग येथे खास न्यायालयाची स्थापना झाली. इथे अनेक नाझींना शिक्षा ठोठावण्यात आली. युनोने चार्टर ऑफ ह्युमन राईटस संमत करून घेतला. तसेच युद्धकैद्यांना कशी वागणूक देण्यात यावी इथपासून ते मानवजातीसमोर असलेल्या अनेक प्रश्नांवरती जगात पहिल्यांदाच युनो हे मानवी अधिकारांचा उच्चार करणारे व्यासपीठ बनले. जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्याची स्थापना झाली. हे उद्दिष्ट साध्य झाले की नाही हा विवाद्य मुद्दा असू शकतो पण सर्व देशांनी एकत्र येऊन असा प्रथमच प्रयत्न केला हेही कमी नव्हते. ह्याच जोडीला (ड्ब्ल्यूबीसी) वर्ल्ड बॅंक आणि (आयएमएफ) इंटरनॅशनल मॉनेटरी फंड ह्या संस्थांची स्थापना झाली. ह्या योगे गरीब देशांना विकासकामांकरिता कर्ज रूपाने भांडवल उपलब्ध करून देण्याची यंत्रणा उभारण्यात आली. दुसर्‍या महायुद्धामध्ये युरोप बेचिराख झाला होता. अमेरिकेने मार्शल प्लॅन बनवून पश्चिम युरोपीय देशांना पुन्हा एकदा विकसित देशांच्या पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे रशियाने आपल्या साम्राज्यामध्ये आपले नियम बनवले होते. कम्युनिस्ट देशांना अमेरिकेची धास्ती वाटत असल्यामुळे दोन राष्ट्रांमध्ये शस्त्रास्त्रस्पर्धेचे नवे युग जन्माला आलेल्या विकोपापायी प्रत्यक्षामध्ये रीतसर युद्ध छेडले गेले नाही तरी तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थिती कायम राहिली. ह्यालाच शीतयुद्ध म्हटले जाऊ लागले. अमेरिका व रशिया हे दोन देश थेट एकमेकासमोर भिडले नाहीत पण पुढच्या काळामध्ये कधी कोरियन युद्ध तर कधी व्हिएतनाम अशा परकीय भूमीवरती युद्ध लढली गेली. त्यामध्ये दोन्हीकडचे सैन्य रणभूमीवरती एकमेकासमोर येत होते. ह्या दोन ध्रुवांमध्ये आपले वर्चस्व टिकवण्याच्या मोहापायी एक शस्त्रास्त्रस्पर्धा जन्माला आली. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या मनीषेने अधिकाधिक घातक संहारक शस्त्रा - अस्त्रांनी जन्म घेतला. त्यातच आण्विक शस्त्रास्त्रांची भर पडली होती. काही मोजक्या देशांच्या हाती अणुतंत्रज्ञान राहावे म्हणून न्यूक्लियर प्रॉलिफरेशन ट्रीटी द्वारा काही संकेत पाळण्यात आले पण ते धाब्यावर बसवल्यामुळे आणि वरिष्ठांनी त्याकडे काणाडोळा केल्यामुळे अनेक देशांच्या हाती अणु तंत्रज्ञान आणि अणुबॉम्ब आले. शेवटी शस्त्रास्त्रांवर मर्यादा असावी म्हणून अमेरिका व रशियाला स्ट्रॅटेजिक आर्म्स लिमिटेशन ट्रीटी (SALT) साठी प्रयत्न करावे लागले. 

शीतयुद्धाचे एक महत्वाचे रणांगण होते मध्यपूर्वेतील देश. पहिल्या महायुद्धानंतर मध्यपूर्वेमध्ये जेत्यांना हवे तसे देश जन्माला घालण्यात आले होते. पण मध्यपूर्वेची खरी सत्ता ब्रिटिशांच्या हाती होती. महत्वाचे म्हणजे ही सत्ता भारतामधून राबवली जात होती. कारण मध्यपूर्वेतील ब्रिटिश प्रमुख प्रतिनिधीचे रिपोर्टींग भारतामधील व्हाईसरॉयकडे देण्यात आले होते. मध्यपूर्वेतील मित्र राजघराण्यांच्या संरक्षणासाठी भारतीय सैन्य तेथील महत्वाच्या शहरांमध्ये तैनात करण्यात आले होते. दुसर्‍या महायुद्धानंतर कमकुवत झालेल्या ब्रिटिशांची सत्ता मागे पडली आणि सूत्रे अमेरिकेच्या हाती गेली. अमेरिकेने तेथील अनेक देशांमध्ये आपली बाहुली सत्तेमध्ये बसवली होती. तर काही ठिकाणी सत्ताधीश रशियाला जवळचा होता. त्यांच्यातील वैमनस्याचा फायदा घेत अमेरिका आणि रशिया हे दोन ध्रुव मध्यपूर्वेतील राजेघराण्यांना हाताशी धरून शीत युद्धाच्या खेळी खेळत होते. ह्यामध्ये सौदी अरेबिया जॉर्डनसारख्या देशांनी कायमच अमेरिकेला साथ दिली. पॅलेस्टाईनच्या प्रश्नाबाबत रशियाने तेथील कट्टरपंथी मुस्लिम गटांना हाताशी धरले होते. 

१९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानमधील शेख मुजिबुर रेहमान ह्यांच्या अवामी लीगला बहुमत मिळून सुद्धा पाकिस्तानी सेनाप्रमुखांनी पाकिस्तानच्या सत्तेची सूत्रे हाती दिली नाहीत. ह्या निमित्ताने उपखंडात ठिणगी पडणार अशी चिन्हे होती. त्यात रशियाही लुडबुड करत होता आणि भारत त्याला साथ देत होता. ह्याच काळामध्ये चीनचे सत्ताशीध माओ ह्यांचे आणि रशियन राज्यकर्ते ह्यांचे संबंध ताणले गेले होते. त्याचा फायदा घेत जुलै १९७१ मध्ये श्री हेन्री किसिंजर ह्यांनी पाकिस्तान मार्गे चीनला गुप्त भेट दिली आणि माओ ह्यांची भेट घेतली. ह्या भेटीमधून अमेरिका चीन मैत्रीचे एक नवे पर्व सुरू झाले. अमेरिकनांचे डावपेच अर्थातच रशियाला कोंडीत पकडण्याचे होते. युद्ध सुरू होऊ नये म्हणून भारतावर चीनचा दबाव ठेवण्याचे डावपेच होते. त्यावरती मात करत श्रीमती इंदिरा गांधी ह्यांनी अमेरिकन मनसुब्यांना आव्हान देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून १९७१ च्या डिसेंबरमध्ये बांगला देशाच्या निर्मितीचा महापराक्रम गाजवला. 

ह्यानंतर १९७३ पासून ऑईल प्रोड्युसिंग एक्सपोर्टींग कन्ट्रीज OPEC ने आपल्या हाती असलेल्या पेट्रोलवरील नियंत्रणाचा वापर करून जगावर आधिपत्य गाजवण्याचा काळ सुरू झाला. ह्यातून अरबी देशांकडे पेट्रोडॉलरचा महापूर लोटला. ह्या पैशाच्या जोरावरती अरबी देशांकडे वहाबी इस्लामच्या प्रसारासाठी अमाप पैसा उपलब्ध झाला. दुसरीकडे रशिया आणि अमेरिका दोघांनाही लट्टरपंथी मुस्लिमांना हाताशी धरून शीत युद्ध खेळायचे होते. १९७९ मध्ये अमेरिकेचा दोस्त इराणचा शहा पेहेलवी ह्याला तिथे झालेल्या रशियाप्रणित उठावाने परागंदा होण्यास भाग पाडले. ह्यानंतर कट्टरपंथी मुस्लिम अयातोल्ला खोमेनी सत्तेवर बसला. त्याने सर्वात प्रथम इराणमधील कम्युनिस्टांना पकडून त्यांना एक तर तुरूंगात टाकले किंवा फाशी दिले. अशा तर्‍हेने प्रथम डाव्यांचा बंदोबस्त केल्यावर आपली पकड सत्तेवर बसवून कट्टरपंथी इराणने अमेरिकाविरोधी राजकारणाचे युग सुरू केले. इराणमधील सत्ताधीश हातातून गेला तसेच रशियाने त्याच वर्षाच्या अखेरीला अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य घुसवले आणि तिथे कम्युनिस्टांना जवळचा असलेला सत्ताधीश गादीवर बसवला. त्यामुळे जो सतासमतोल ढळला होता तो पुनश्च स्थापन करण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने रशियाप्रणित सत्ता अफगाणिस्तानमधून हुसकावून लावण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. हेच राजकारण आजतागायत चालू असल्याचे आपल्याला दिसते.

अशा तर्‍हेने ७०च्या दशकापासून पेट्रोल - कट्टरपंथी इस्लाम - दहशतवाद आणि त्याभोवती फिरणारे जागतिक राजकारण असे युग सुरू झाले. आर्थिक पाया दुबळा असताना न परवडणार्‍या कारवाया करणारा रशिया हळूहळू आर्थिक कचाट्यामध्ये सापडत गेला. कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वंकष हुकूमशाहीचा परिणाम म्हणून रशियन राज्यव्यवस्थेमध्ये एक प्रकारची भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली होती. हे ओझे असह्य झाले तेव्हाच म्हणजे ८० च्या दशकामध्ये रशियन सत्तेवरती आलेल्या गोर्बाचेव्ह ह्यांनी ग्लासनॉस्त आणि पेरेस्त्रोइका हे परवलीचे शब्द वापरत प्रचलित रशियन व्यवस्थेला आव्हान दिले आणि त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू केले. गोर्बचेव्ह ह्यांना कम्युनिस्ट राज्यव्यवस्थाच हवी होती पण मोकळा श्वास घेता यावा ही इच्छा होती. अर्थात रशियामध्ये हे युग सुरू झाले तेव्हाच अफगाणिस्तानमधील आपली लष्करी कारवाई फोल ठरत असल्याचे वास्तव तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या लक्षात येत होते. रशियन सैन्य माघारी बोलावण्याचे अवघड पाऊल रशियाने उचलले. इथे कट्टरपंथी इस्लाम जिंकल्याचे दृश्य उभे राहिले. इथून पुढे जगाच्या राजकारणावरती आपण आपली छाप पाडू शकतो आणि सत्ता हाती घेऊ शकतो असा आत्मविश्वास कट्टरपंथी मुस्लिमांमध्ये निर्माण झाला. गोर्बाचेव्ह ह्यांच्या सोव्हिएत रशियातील सुधारणा युग आणण्याच्या प्रयत्नांमध्ये पूर्व जर्मनीमध्ये उठाव झाला त्यात सुप्रसिद्ध बर्लिनची भिंत लोकांनीच पाडून टाकली आणि दुसर्‍या महायुद्धापूर्वी जसा एकसंध जर्मनी होता तसा जर्मनी अस्तित्वात आला. त्या राजकीय प्रक्रियेमध्ये गोर्बाचेव्ह ह्यांच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत रशियाने लष्करी हस्तक्षेप करण्याचे टाळले. त्यातून इतरही देशांची भीड चेपली आणि पूर्व युरोपियन देश रशियातून बाहेर पडले. त्याच बरोबरीने किरगिझिस्तान अझरबैजान तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान उझ्बेकीस्तान आदि मुस्लिम बहुल देशसुद्ध सोव्हिएत रशियातून फुटून बाहेर पडले. अशा तर्‍हेने ९० चे दशक आणि विसावे शतक संपेपर्यंत जगातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलून गेली. 

ह्या काळाचा सर्वोत्तम वापर केला तो चिनी सत्ताधीशांनी. अमेरिकेची दोस्ती त्यांनी पदरात पाडलीच होती. त्यावर आपल्या अर्थव्यवस्थेला थोडी मोकळीक देत पक्षीय सरकारच्या नियंत्रणातील पण खाजगी मालकीला वाव देत अर्थव्यवस्था मुक्त करत चीनने जगामध्ये इनफ्रास्ट्रक्चर आणि उत्पादन ह्या क्षेत्रामध्ये प्रचंड गुंतवणूक करून जगाची बॅकयार्ड फॅक्टरी बनण्याचे ध्येय स्वीकारले आणि त्याला प्रत्यक्ष रूप दिले. ह्यातून हाती आलेल्या पैशांमधून एक सक्षम संरक्षण व्यवस्था उभी करून आशियामधील एक नंबरचा आणि कालांतराने अमेरिकेला डच्चू देऊन जगाचा नेता होण्याचे स्वप्न चीनने पाहिले आणि त्यातील काही उद्दिष्ट साध्यही केली. सोव्हिएत रशिया कोसळल्यानंतर जगभरातील गटागटांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट व्यवस्थेबाबत असलेला भोळसट आशावाद संपला. ह्याच दरम्यान भारतामधील कामगार चळवळीचे युगही उताराला लागले. चळवळीतून सामर्थ्य उभे करण्याच्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल न करता आल्यामुळे भारतामधील डाव्या पक्षांची राजकीय "स्पेस" मर्यादित होऊ लागली. 

दुसरीकडे फाजिल आत्मविश्वास वाढलेल्या कट्टरपंथी इस्लामी दहशतवाद्यांनी सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती हल्ला चढवून आपल्या ताकदीपेक्षा "निर्धारा" ची चुणूक जगाला दाखवून दिल्यावरती एकच धावपळ उडाली. सोव्हिएत रशियाला संपवण्याच्या नादात आपल्या राज्यकर्त्यांनी केव्हढा मोठा महाराक्षस जन्माला घातला आहे ह्याची निदान अंतर्यामी जाणीव आज अमेरिकेच्या सामान्य जनतेला झाली आहे. असे असले तरीही आजदेखील जगाचे राजकारण पेट्रोल - कट्टरपंथी इस्लाम आणि इस्लामी दहशतवाद ह्यांच्याभोवती फिरते आहे. २०१६ साली अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर अध्यक्ष ट्रम्प ह्यांनी अनेक प्रकारे गेल्या शतकामधल्या राजकारणामध्ये बदल घडवण्याचे प्रयत्न चालवले आहेत.

राजकीय उलथापालथींशिवाय मानवजातीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल जर कोणत्या बाबीने केला असेल तर त्याचे श्रेय अर्थातच विज्ञानाला जाते. शंभर वर्षांपूर्वीचे विज्ञान तंत्रज्ञान आणि आताचे ह्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. आपला ग्रह सोडून चंद्रावरती माणूस भ्रमण करून आला तो ह्याच काळात. एका वैद्यकीय सेवेचा विचार केला तर नॅनो तंत्रज्ञान आणि जेनेटिक्स वापरून प्रचलित उपचार पद्धती आणि औषध पद्धतीला आव्हान देणार्‍या नव्या युगाबद्दल काय म्हणायचे? माणूस अमरत्वाकडे वाटचाल करू लागला आहे आणि ते युग कधी अवतरेल सांगता येत नाही इतके नजिक येऊन ठेपले आहे.  दुसरीकडे संगणकाचा जन्म आणि त्यावर आधारित जीवनातील एकूण एक कामे ह्याचा विचारही कोणी पहिल्या युद्धाच्या शेवटाला केला असेल काय? युरोपातील एका कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर आज एका रोबोची डायरेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. अशा तर्‍हेने माण्साबरोबरच कंपनीचे निर्णय घेण्यासाठी एका रोबोचा प्रवेश झाला आहे. असा रोबो कोणते निर्णय घेतो आणि त्याच्या बर्‍या वाईट परिणामांची जबाबदारी कोणावर टाकावी - त्यासाठी आजची न्यायव्यवस्था सज्ज आहे का अशा स्वरूपाचे कितीतरी प्रश्न इथून पुढे उपस्थित होणार आहेत. आज रॉबॉटिक्स - इंडस्ट्रियल ऑटोमेशन - आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील क्रांतीने जर अशी कामे माणसाच्या हातून हिरावून घेतली तर इथून पुढे जगामध्ये जन्मणार्‍या प्रत्येक बालकाला पोट भरण्यासाठी काम तरी उरेल काय - जर माणसाने करायची कामे संगणक रोबोज करणार असतील तर हात रिकामे राहतील त्यापेक्षा मने रिकामी राहतील आणि बिनकामाच्या माणसाचा राक्षस तर बनणार नाही ना असे प्रश्न आज पाश्चात्य जगातील सत्ताधार्‍यांना पडत आहेत. कारण ही समस्या अगदी पुढच्या तीस ते चाळीस वर्षात त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड रूप धारण करणार आहे अशी चिन्हे आहेत. 

राजकारण आणि विज्ञान तंत्रज्ञान समस्या निर्माण करतात आणि त्या सोडवण्याची जबाबदारी कदाचित पुन्हा एकदा धर्मच नाकारणार्‍या लिबरल्सना धर्मावर टाकावी लागेल. २०१४ साली योग दिवस पाळण्याची सूचना श्री नरेंद्र मोदी ह्यांनी युनोला केली आणि ती भरघोस पाठिंब्याने स्वीकारली गेली त्याची पार्श्वभूमी हीच असावी. असतो माम् सद् गमय तमसो माम् ज्योतिर्गमय मृत्योर्माम् अमृतम् गमय सांगणारा आणि त्यातून विज्ञानाची कास धरत अध्यात्म सांगणार्‍या हिंदू धर्माकडे पुढच्या दशकांना वळावे लागेल असे नाही का तुम्हालाही वाटत? 

3 comments:

  1. विज्ञान मनुष्याला अमर बनवू शकेल, परंतु पृथ्वीची अवस्था मनुष्याला जगायला योग्य ठेवेल का हा प्रश्न आहे. पृथ्वी वाचवायची असेल तर हिन्दुत्वाकडे वळण्याशिवाय अन्य पर्याय आत्तातरी दिसत नाही.

    ReplyDelete
  2. मुस्लीमांचा वापर केल्याची किंमत इस्लाम वसूल करतो हे राजकारण्यांना समाजात नाही का ?

    ReplyDelete