Thursday 20 September 2018

सत्ताधीशाने छेडलेले आंदोलन

Image result for mann ki baat



बुद्धिवंतांवरील कालच्या पोस्टमधली मेख त्यावरती आलेल्या कॉमेंटमधून वाचकांच्या लक्षात आलेली दिसली नाही म्हणून ही दुसरी पोस्ट. मोदी लोकांना बदलासाठी प्रेरित करत आहेत म्हणजेच समाजसुधारणेची चळवळ उभारत आहेत असे मला म्हणायचे होते. 

सामान्यतः चळवळ ही "सत्तेच्या" विरोधात उभारली जाते. जनतेच्या न्याय्य मागण्या जेव्हा सरकार डोळ्याआड करते तेव्हा जनता आंदोलनात उतरते. (भाडोत्री आंदोलने नव्हे) म्हणजेच सरकारच्या धिम्म्या कारभारामधून आपल्याला त्वरित न्याय मिळणार नाही अशी लाखो लोकांची खात्री पटते तेव्हा कुठे काही शेकडा माणसे तुम्हाला मोर्चात आलेली दिसतात. खर्‍याखुर्‍या मोर्चामध्ये माणसे तेव्हाच सामिल होतात जेव्हा एखादी समस्या व्यापक प्रमाणात जनतेला डाचत असते आणि आपण आपले दुःख जर जाहीरपणे मांडले नाही तर त्याची कोणी दखलही घेणार नाही अशी भावना जेव्हा जागृत होते तेव्हा यशस्वी मोर्चा निघतो किंवा अन्य स्वरूपाची आंदोलने बघायला मिळतात. उदा. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रत्यक्ष रस्त्यावरती येऊन ब्रिटिशांशी लढणारी जनता अर्धा टक्का सुद्धा नव्हती पण भावनिक दृष्ट्या मात्र एकूण एक जनतेचा नेते मंडळींना पाठिंबा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोजकी माणसे रस्त्यावरती होती पण संपूर्ण देशामध्ये निर्माण केलेले एकच द्विभाषिक राज्य आपल्या माथी मारून आपल्यावर पराकोटीचा अन्याय करण्यात आला आहे ही सार्वत्रिक भावना मराठी मनात होती म्हणून एक यशस्वी आंदोलन उभे राहिलेले दिसले. जेव्हा जनतेच्या भावना तीव्र असतात तेव्हा चळवळ जन्म घेते. मग ती व्यक्त करण्यासाठी हाक देणारा नेता कोण आहे आणि त्याची क्षमता काय त्याचे हेतू काय हे तपासत बसण्यात जनता वेळ घालवत नाही. त्याच्या हाकेला उत्तर देऊन ती चळवळीत उतरते. म्हणून एका अर्थाने चळवळ आपला नेता जन्माला घालत असते कारण असा नेता त्याच पीडित जनतेमधून नेतृत्व हाती घेतो. 

लोकशाहीमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नेते राज्यावर बसलेले असतात मग त्यांनाच जनतेच्या भावना कशा काय समजत नाहीत असा प्रश्न पडेल. सत्तापदावर पोचलेल्या माणसाला तिथे बसल्यावर जनतेचे अस्तित्व जाणवत नाही कारण अवतीभवती प्रशासनातील बाबू लोक, फायदे उकळण्यासाठी अधीर असलेले लबाड धनिक आणि खुशमस्कर्‍यांचा वेढा सत्ताधार्‍याच्या भोवती पडलेला असतो. जसे एखाद्या खोलीमध्ये हवा असते पण आपल्या डोळ्याला दिसत नाही तशी ही अवस्था असते. पण पंखा लावला आणि हवा हलू लागली की ती आहे असे जाणवू लागते. हवेचे अस्तित्व पटवण्याकरिता पंख्याची गरज भासते. म्हणून पंखा म्हणजे ते आंदोलन ती चळवळ असते असे आपण म्हणू शकतो. जनता जेव्हा रस्त्यावर उतरते तेव्हा हवा हलू लागते - सत्ताधार्‍यांना तिची आठवण येते. आणि तिच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ लागते. 

जनतेच्या मनामधली ही चुळबुळ कोणतेही "दृश्य" आंदोलन नसताना देखील जो सत्ताधीश टिपतो - ओळखतो त्याला जनमानसाची नाडी कळते असे आपण म्हणतो. स्व. इंदिराजी अशाच एक मोठ्या नेत्या होत्या ज्यांना अशा लाटांची चाहूल लागत असे. अटलजीही हे जाणू शकत होते. कितीही वेडगळपणाचे वाटले तरी आजच्या घडीला ही स्पंदने कळणार्‍या नेत्यांमध्ये मी श्री शरद पवार - मुलायम आणि लालू ह्यांचेही नाव घालेन. एकीकडे इंदिराजी - अटलजी आणि दुसरीकडे शरद पवार लालू मुलायम अशी नावे मी घेणे वाचकांना आवडणार नाही. ह्यामध्ये त्यांना निश्चितच मोठी विसंगती दिसेल. पण ह्या नेत्यांना अशी स्पंदने कळतात ही वस्तुस्थिती आहे.

स्पंदने कळणे ही एक गोष्ट आहे. प्रामाणिकपणे ती कळल्यानंतर ती जाहीररीत्या स्वीकारणे - त्यानुसार आपण काय करायचे ते ठरवणे - त्यावरती उघड अथवा छुपे धोरण बनवणे आणि ते अंमलात आणणे वेगळे. स्पंदने कळून सुद्धा तिच्याकडे काणाडोळा करणारे किंवा त्या लोकभावनेचा उपयोग स्वतःच्या क्षणिक व संकुचित स्वार्थापुरता ठेवणार्‍या नेत्यांमध्ये पवार वा मुलायम लालू बसतील. अशा नेत्यांना स्पंदने कळण्यातून जनतेचे भले मात्र होऊ शकत नाही. पण इंदिराजी अशा नेत्यांमध्ये नव्हत्या. काही प्रसंग असे दिसतील की भावना स्पंदने कळून सुद्धा आणि त्यावरती काही करावे वाटत असून सुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित कारवाई केली गेली नाही. ह्याला कारण होते ते अर्थातच त्यांचे वैयक्तिक कौटुंबिक पक्षीय स्वार्थ. अटलजींच्या हाती परिस्थितीने जेव्हढे स्वातंत्र्य दिले होते तेव्हढ्याचा वापर त्यांनी केल्याचे दिसेल. 

ह्या प्रकारात मोदी कुठे बसतात? आज देशाच्या सर्वोच्च सत्तास्थानी बसलेला हा नेता - त्याचे मूल्यमापन काय आहे?  अर्थातच जनमानसाची नाडी नस कळण्याची कला मोदींना उपजत प्राप्त झाली आहे. ते सत्ताधीश आहेत. त्यांच्याही भोवती लबाड धनिक स्वार्थी आप्पलपोटे राजकारणी ढोंगी प्रशासनिक बाबू ह्यांचा गराडा आहे. जसे मधुमेहाच्या रोग्याच्या रक्तामध्ये साखर तर असते पण रक्तातील सेन्सर्सना तिचे अस्तित्व जाणवण्याचे मार्ग बंद होतात तशी  सत्ताधार्‍याची अवस्था असते. तिचे अस्तित्व जाणवण्याचे मार्ग खुले ठेवणे हे अवघड काम रोग्याला कडक आहार बंधने स्वीकारून करावे लागते. मोदींसमोरचे कामही असेच अवघड आहे. पण सत्तेमध्ये बसले म्हणून मोदी "सत्ताधीश" झालेले नाहीत. ते मनाने अजून आपली कार्यकर्त्याची भूमिका विसरलेले नाहीत. खरे तर ते सत्ताधीश आहेत तेव्हा पंखा हलवून वारे निर्माण करून जनतेचे अस्तित्व त्यांना जाणवू देण्याचे काम विरोधकांचे आहे. चळवळ सत्ताधीशाच्या विरोधात उभारायची असते ना? मग स्वतः मोदीच चळवळ उभारत आहेत असे मी का म्हणते त्याची पार्श्वभूमी काय? त्याचे कारण काय? त्याला आधार काय?

प्रथम आधारापासून सुरुवात करू. २०१४ च्या प्रचारादरम्यान भाषण संपता संपता मोदी स्वतःशीच पुटपुटल्यासारखे म्हणाले होते की आंदोलन उभारल्याशिवाय हे काम होणार नाही. लोकांचा स्वाभिमान जागृत केल्याशिवाय हे काम होणार नाही. मोदींना जे काम अपेक्षित आहे त्यामध्ये लोकांचा उत्स्फूर्त सहभाग नसेल तर ते पूर्ण होणार नाही ह्याची जाणीव गादीवरती बसण्यापूर्वी त्यांना होती. कारण आपल्याला जे काम करायचे आहे त्यामध्ये अडथळे आणणारेच आपल्या अवती भवती असणार आणि ते फसेल कसे ह्याची कारस्थाने ते करणार हे त्यांना दिसत होते. विरोधक मोदींवरती काय आरोप करतात? मोदींच्या राज्यामध्ये स्त्रिया - दलित आणि अल्पसंख्यक समाज "सुरक्षित" नाहीत ह्या एका सूत्राभोवती यूपीएने आपले विरोधाचे सूत्र बांधले आहे. समाजामधल्या पूर्वापार चालत आलेल्या विकृती जणू काही मोदींमुळेच रूढ झाल्या आहेत असा बनाव यूपीए करत आहे. पण प्रत्यक्षात बघितले तर शेकडो वर्षांच्या परंपरेतून निर्माण झालेल्या मानसिकतेचा वाटा ह्या समस्यांमध्ये नाही असे आपण म्हणू शकतो का? 

उदा. कुटुंबामधले स्त्रीचे स्थान काय असावे - धर्म तिला काय मानतो हे बाजूला ठेवून बघितले तर तिच्यावरचा अन्याय हा रूढींमुळे होत आहे हे खरे नाही काय? मग अशा पद्धतीच्या रूढींच्या विरोधात सत्तेवरती बसलेल्या व्यक्तीकडून काय काम होऊ शकते? ते काम तर समाजसुधारणा करणार्‍या समाजसुधारकांनी करायला हवे. पण स्वतःला समाजसुधारक म्हणवून घेणारे पुरोगामी प्रत्यक्षात मोदी विरोधाने हिरवे पिवळे पडले आहेत. रूढींच्या विरोधात समाजाचे मन बनवण्याचे काम राहिले दूर - ते तर आगीत तेल ओतल्यासारखे ही समस्या मुळात मोदींनी निर्माण केली आणि आता ते त्यावरती कारवाई करत नाहीत असे खोटे दृश्य उभे करण्यात स्वतःला धन्य मानत आहेत. हीच बाब दलितांवरील अत्याचाराबाबत म्हणता येईल. 

मग समस्या जाणवत असून सुद्धा मोदी स्वस्थ बसले तर ते राज्यकर्त्याच्या धर्माला अनुसरूनच होईल. पण पुरोगामी हे काम करत नाहीत - करणार माहीत हे जाणून समाजप्रबोधनाचे मोठे काम मोदींनी स्वतःवरती ओढून घेतले आहे. "मन की बात" ह्या कार्यक्रमातून त्यांनी ज्या ज्या विषयांना हात घातला आहे ते बघितले तर राष्ट्रउभारणीसाठी सरकारने बरेच काही करायचे असले तरी सामान्य जनतेची देखील काही कर्तव्ये आहेत - तिच्याही वैयक्तिक जीवनातील काही वाईट सवयी समस्या उभ्या करतात - असलेल्या समस्या आणखी जटील करतात हे सत्य नाही काय? उदा. देशामधल्या विविध देवळाच्या गाभार्‍यामध्ये स्त्रियांना प्रवेश द्यायला हवा असे वाटणार्‍यांची संख्या मोठी आहे. समाजाने समलिंगी संबंधाचे समर्थन करावे वाटणारे पण खूप आहेत. ही कामे समाजाची टिंगल टवाळी करून साध्य होत नाहीत. त्यासाठी प्रचंड पेशन्स लागतो. तेव्हढा पुरोगाम्यांकडे नाही. आपले म्हणणे समाजाच्या गळी उतरवण्यासाठी त्यांना आपले म्हणणे पटवण्यासाठी जे कष्ट घ्यायला हवेत ते घेण्याची तयारी आजचे पुरोगामी दाखवत नाहीत. माध्यमांचा फौजफाटा घेऊन जायचे आणि विवादाचा प्रचंड धुरळा उडवायचा ही त्यांची कार्यपद्धती आहे. ह्यातून समाजाचे मन केवळ दुखावले जाते. सांधले जात नाही की सुधारणेकडे स्वीकृतीच्या दिशेने समाजाची पावले प्डत नाहीत त्याऐवजी संशयाने बघण्याची प्रतिक्रिया उमटते. नाटकी पुरोगाम्यांना तेच हवे असते. हिंदू समाज बदलायला सुधारणेला तयार नाही असे डंका पिटून सांगणे एव्हढेच त्यांचे ध्येय आहे -- सुधारणा गेली बोंबलत. अशा पार्श्वभूमीवरती आपली विश्वासार्हता वापरून हा "कटू" डोस जनतेला पाजण्याचे धाडस मोदी करतात आणि मोदी सांगतात म्हणून जनता ते हळूहळू आनंदाने स्वीकारते हे आपल्यासमोर आलेले नाही काय? समाजसुधारणेच्या ह्या प्रयोगाला काय म्हणायचे? तेही एक आंदोलन नाही काय? ते कोणाविरोधात आहे? ते आहे प्रस्थापितांविरुद्ध. मोदी सत्तेमध्ये असूनही प्रस्थापित नाहीत. ते प्रस्थापित नाहीत आणि आपणही प्रस्थापित होऊ नये म्हणून काटेकोर असलेले मोदी ही चळवळ उभारत आहेत चालवत आहेत हे तुम्हाला पटते का? म्हणूनच सत्ताधार्‍याने छेडलेले हे अद् भूत आंदोलन आहे असे मी म्हणते.

सामाजिक जीवनामध्ये बदल घडवून आणायचा तर सर्वसामान्य लोकांनाच स्वच्छतेचे - घरच्या स्त्रिला सन्मानाने वागवण्याचे गावातील दलित समाजाला आपलेसे करण्याचे दिव्य पार पाडायचे आहे. त्यांची मानसिकता तशी घडवणे हे आव्हान आहे. केवळ कायदे करून समाजसुधारणा होत नसतात. ते जनता जेव्हा स्वीकारते तेव्हा आपल्याला बदल होताना दिसतो. 

अर्थात सामान्य माणसाच्या वैयक्तिक आयुष्यातील ह्या क्रांतिकारी बदलाखेरीज मोदी आणखी एक मोठे आंदोलन छेडत आहेत. ते आंदोलन आणि त्याचे आव्हान अधिक गंभीर आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकींनी मोदींना शीर्षस्थानी बसवले असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या हाती सत्ता कितपत आहे हे खोलात जाऊन बघावे लागेल. ज्याला डीप स्टेट म्हटले जाते तेच अजूनही आपल्याला वाटेल ते निर्णय सरकारकडूनच नव्हे तर प्रशासन - घटनात्मक स्थळी बसलेल्या व्यक्ती - अगदी न्यायालये - माध्यमे ह्यांच्याकडूनही पदरात पाडून घेताना दिसतात. फार काय तर परदेशस्थित आपल्या "हितचिंतकांनाही" डीप स्टेटने कामाला लावले आहे. मोदी सत्तेमध्ये आले तेव्हा ते असावियाचा बंदोबस्त करतील असे भाऊने लिहिले होते. नेहरूप्रणित ल्यूटन्स दिल्लीची मक्तेदारी कायमची मोडून काढण्याचे अवघड काम यशस्वी केले नाही तर भले कागदोपत्री मोदीच पंतप्रधान असले तरी धोरण मात्र डीपस्टेट ठरवतील - निर्णय मात्र डीप स्टेट घेत राहील हा धोका आहे. दुसर्‍या शब्दात सांगायचे तर आजच्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या तख्तावरती प्रस्थापित कोण आहेत ह्याचे उत्तर ल्यूटन्स दिल्लीकर असेच द्यावे लागत आहे. ही मक्तेदारी मोडणे सोपे नाही. मोदी त्यावरती घणाघात करत आहेत. एनजीओ - रियल इस्टेट - बॉलीवुड - हवाला आणि परदेशस्थित व देशांतर्गत काळा पैसा - माध्यमे - क्रिकेट ह्या भक्कम खांबांवरती आधारित डीप स्टेट आपले साम्राज्य अजून टिकवून आहे. आणि तीच ताकत वापरून मोदींना दिल्लीतून परागंदा करण्याचे आयोजन आणि कारस्थान हे डीप स्टेट यशस्वीरीत्या पार पाडत आहे. २०१९ मध्ये "कोणत्याही परिस्थितीत" आम्ही मोदींना पुन्हा सत्तेमध्ये येऊ देणार नाही असे ठामपणे आणि विश्वासाने सोनियाजी का बोलू शकल्या ह्याचा विचार करा. बारकाईने बघितले तर मोदींनी ह्या प्रत्येक आधारस्तंभाला सुरुंग लावला आहे. पण ते नष्ट झालेले नाही. हे काम सोपे नाही आणि एकटे मोदी ते करू शकत नाहीत. व्यापक प्रमाणावरती मोदींना जनतेची साथ मिळाली म्हणूनच एनजीओ बॉलीवुड रियल इस्टेट हवाला काळा पैसा ह्या प्रत्येकावरील कारवाईला यश मिळाले. त्यात मोदींनी जनतेची साथ मागितली आणि जनतेने ती खुशीने दिली. हे घणाघात घालताना लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेण्याची एक - म्हटले तर - अदृश्य - अद् भूत चळवळ मोदी सत्तास्थानी बसून चालवत आहेत. म्हणजेच सत्तेमध्ये असूनही त्यांना प्रस्थापित "डीपस्टेट"च्या विरोधात आंदोलन छेडावे लागले आहे.

सत्ताधीशाने चळवळ उभी करण्याचे हे न भूतो न भविष्यति कार्य मोदी करत आहेत आणि आपण ह्या इतिहासाचे साक्षिदार आहोत ही बाबच सुखावणारी आहे. 



मूळ पोस्ट 

आजकालच्या बुद्धिवंतांचे एक बरे असते. ते आपापल्या घरी बसून चिंतन करतात आणि सिद्धांत ठरवतात. सर्व बाजूने विचार करून गणित सोडवले की ते त्यांना अंतीम उत्तर वाटते.

सामान्य माणूस असे करत नाही. कोणत्याही नव्या सिद्धांताने आपला हात तर भाजणार नाही ना याचा विचार करत निरीक्षण करत नव्या कल्पनेकडे बघतो. ती स्वीकारायला कधीकधी एखादे शतकही लावतो.

सामान्य जनतेसाठी "थांबण्याचा" पेशन्स बुद्धिवंतांकडे नसतोच. त्यांना टिंगल टवाळीत रस असतो. म्हणून बुद्धिवंतांना समाजमान्यता मिळत नाही.

आपल्या विचारांच्या मागे समाजाला खेचून नेणारे नेते वरचढ असतात. पण असे नेते देखील बुद्धिवंतांना ओळखता येत नाहीत.

मन की बात या कार्यक्रमातून मोदींनी समाजसुधारणेसाठी जितक्या सामान्य जनतेला प्रेरित केले त्याच्या एक टक्का काम सुद्धा बुद्धिवंत गेल्या शंभर वर्षात करू शकलेले नाहीत.

त्याचे कारण एकच आहे. मोदींच्या शब्दामागे त्यांची तपश्चर्या आहे. कमावलेली विश्वासार्हता आहे. नेमक्या याच दोन गोष्टींची आजच्या बुद्धिवंतांकडे वानवा असते.

6 comments:

  1. विचार व निर्णय क्षमता तसेच दूरदृष्टी हे जे मोदि जवळ आहे त्याचा इतरांकडे थांगपत्ता नाहि .तसेच मोदि जसे सामान्य नागरिकांशी direct conected आहेत तसे मनमोहनसिंग सुधा नव्हते .
    राहुल गांधी ज्यांना कॉंग्रेस नेतृत्व म्हणून पुढे आणते आहे त्यांच्या धरसोड व्रुत्तिने कॉंग्रेसचेच वाटोळं केले आहे .कॉंग्रेसने कितीही अडथळे निर्माण केले तरी मोदिच जिंकतील.

    ReplyDelete
  2. Related to para 2. अण्णा हजारेंची चळवळ ही याच पठडीतली म्हणता येईल ।

    ReplyDelete
    Replies
    1. सुरुवातीला होती म्हणून तर मध्यमवर्गाला आम आदमी पक्षात तारणहार दिसू लागला होता. मात्र अण्णा हजारेचां लवकरच गुळाचा गणपती झाला आणि केजरीवाल ही लवकरच एक्ष्पोज झाला.

      Delete
  3. आता जमा झालेला गणंगांचा गोतावळा ही सर्वात मोठी अडचण आहे. खरं तर भाजपानेच आंदोलने करून जनमताचा रेटा आपल्या पाठीशी आहे हे दाखवून बदल घडवून आणायला हवेत, पण त्यांच्याकडे तशी माणसे नाहीत, आहेत त्यांना काही करण्याची इच्छा नाही. डीप स्टेटला दोष देऊन ते थंड बसतात आणि इथे डीप स्टेट व्यवस्थित उलटा प्रचार करते की सगळी ताकद हाताशी असूनही मोदी हिंदूंसाठी काही करत नाहीत.

    ReplyDelete